पहिल्या पदाकाच्या स्मृती; खाशाबा जाधवांच्या वारसदारांची अस्वस्थ तडफड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 03:33 PM2017-07-29T15:33:00+5:302017-07-29T15:40:00+5:30

खाशाबा जाधवांनी भारताला पहिलं वैयक्तिक आॅलिम्पिक पदक मिळवून दिलं, पण त्यांच्या स्मृती जागवण्यात कोणालाच रस नाही.

memories of khashaba jadhav | पहिल्या पदाकाच्या स्मृती; खाशाबा जाधवांच्या वारसदारांची अस्वस्थ तडफड

पहिल्या पदाकाच्या स्मृती; खाशाबा जाधवांच्या वारसदारांची अस्वस्थ तडफड

Next
ठळक मुद्देखाशाबा जाधवांनी भारताला पहिलं वैयक्तिक आॅलिम्पिक पदक मिळवून दिलं, पण त्यांच्या स्मृती जागवण्यात कोणालाच रस नाही. त्यांच्या मूळ गावी एक स्मारक आहे, पण त्यावर साधा फलकही नाही.काही वर्षांपूर्वी खाशाबांच्या नावानं राष्ट्रीय  कुस्ती स्पर्धा सुरू झाली होती, पण तीही अचानक बंद पडलीच्या नावानं कुस्ती संकुल होणार होतं, त्याचीही काहीच हालचाल नाही.हे संकुल होण्यासाठी खाशाबांचं पदक विक्रीला काढण्याची वेळ आता त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे.

- सचिन जवळकोटे

खाशाबा जाधवांनी भारताला पहिलं वैयक्तिक आॅलिम्पिक पदक मिळवून दिलं, पण त्यांच्या स्मृती जागवण्यात कोणालाच रस नाही. त्यांच्या मूळ गावी एक स्मारक आहे, पण त्यावर साधा फलकही नाही.काही वर्षांपूर्वी खाशाबांच्या नावानं राष्ट्रीय  कुस्ती स्पर्धा सुरू झाली होती, पण तीही अचानक बंद पडली.त्यांच्या नावानं कुस्ती संकुल होणार होतं, त्याचीही काहीच हालचाल नाही.हे संकुल होण्यासाठी खाशाबांचं पदक विक्रीला काढण्याची वेळ आता त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे.

स्थळ : हरियाणा. ‘दंगल’फेम महावीरसिंग फोगटचं गाव. पाच-पाच मुलींना कुस्तीच्या फडात उतरविणाऱ्या या गावात शड्डूचा आवाज रात्रंदिवस घुमणारा. ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’साठी या फोगट फॅमिलीचं कव्हरेज करण्यासाठी मी गेलो होतो, तेव्हा पहिला प्रश्न कानावर आदळला.. ‘अरेऽऽ मीडियावालों.. कहाँ से आये हो?’
मी साताऱ्याचं नाव सांगताच त्यातल्या एका पहिलवानाच्या चेहऱ्यावरचे भाव झर्रऽऽकन बदलले. त्याच्या डोळ्यात प्रचंड आदर दिसू लागला. मला सुरुवातीला काहीच समजलं नाही. मात्र त्यानं पुढचा प्रतिप्रश्न करताच कौतुकाश्चर्याचा धक्का बसला. ‘खाशाबाजी के गांव से आये हो? बहुतही बड्डे पहेलवान थे वोऽऽ’
कऱ्हाडच्या खाशाबा जाधवांची ख्याती अटकेपार झेंडा फडकवतेय, याचा साक्षात्कार हरियाणातल्या एका दूरवरच्या गावात आम्हाला झाला. देशासाठी आॅलिम्पिकचं पहिलं मेडल मिळविणाऱ्या खाशाबा जाधवांचा फोटोही तिथल्या काही तालमीत बघायला मिळाला. अनेक हिंद केसरी अन् पंजाब केसरी पहिलवानांच्या रांगेत खाशाबांचा फोटो वरच्या रांगेत लावलेला. पण... उत्तर भारतातील कुस्तीपटूंसाठी अत्यंत गौरवाचा केंद्रबिंदू असलेल्या खाशाबांच्या गावी काय परिस्थिती आहे, याची माहिती समोर आली ती मात्र अत्यंत धक्कादायक, मन पुरतं विषण्ण करणारी.. कारण ज्या गावानं खाशाबांसारखा कर्तृत्ववान सुपुत्र देशाला दिला, त्याच गावाला आजही कुस्तीच्या अद्ययावत तालमीसाठी मायबाप सरकारकडं मदतीची याचना करावी लागतेय. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून मंत्रालयाच्या पायऱ्यांवर त्यांच्या वारसदारांना आपले जोडे झिजवावे लागताहेत.
खाशाबा जाधव मूळचे कऱ्हाडजवळच्या गोळेश्वर गावचे. आज या गावात खाशाबांच्या नावानं एक स्मारक उभारलंय; पण हे स्मारक कशाचं आहे, कुणाचं आहे, काहीच समजत नाही. त्याठिकाणी साधा फलकही नाही. या स्मारकाची देखभाल करण्यासाठीही कुणी पुढं येत नाही. खाशाबांचे चिरंजीव रणजित जाधव सांगत होते, ‘माझ्या वडिलांनी जेव्हा आॅलिम्पिकचं पदक पटकावलं, तेव्हापासून गोळेश्वर जगाच्या नकाशावर आलं. इथं आजपावेतो कैक मंत्री आले, अनेक मोठ्या मंडळींनी इथे पायधूळ झाडली; परंतु खाशाबांच्या नावाची अवहेलना अलीकडं जी सुरू झालीय ते पाहून डोळ्यात पाणी येतं. शासनदरबारी दिरंगाई असते हे आम्हाला माहितीय.. परंतु एवढी वर्षे? सहनशीलतेला काही अंत असतो की नाही?’
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १९९८ मध्ये ‘खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप’ सुरू केली. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरचे मल्ल उतरत. या स्पर्धेतच नरसिंग यादवसारखे अनेक मल्ल चमकले. आॅलिम्पिकपर्यंत जाऊन धडकले; परंतु २०१२ मध्ये काय चमत्कार घडला कुणास ठाऊक.. राष्ट्रीय पातळीवरची ही स्पर्धा थेट राज्यस्तरीय करण्यात आली. त्यानंतरही दोन-तीन वर्षांत पूर्णपणेच गुंडाळली गेली. शेवटची स्पर्धा नाशिकमध्ये खेळविली गेली. याठिकाणी काहीतरी वाद झाला म्हणून त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन थांबविलं गेलं. ही स्पर्धा पुन्हा सुरू करावी म्हणून रणजित जाधवांनी पुण्याच्या क्रीडा आयुक्तांपासून ते मंत्रालयीन क्रीडा सचिवांपर्यंत प्रत्येकाशी संवाद साधला. क्रीडामंत्र्यांनाही वारंवार विनवण्या केल्या. जणू आॅलिम्पिकवीर खाशाबांचं नाव टिकविण्याची जबाबदारी फक्त त्यांच्या कुटुंबाचीच होती, बाकीच्यांना जणू काहीही देणं-घेणं नव्हतं.
महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग अन् महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केली जाणारी ही स्पर्धा सोलापूरला होणार म्हणून नुसतीच चर्चा केली जातेय; परंतु गेल्या दोन वर्षांत त्याला कसलाच मुहूर्त न लागलेला. जी गत खाशाबा कुस्ती स्पर्धेची, तीच त्यांच्या गावातल्या नियोजित कुस्ती संकुलाची. कृष्णा-वारणा-पंचगंगेच्या काठावर आजपावेतो हजारो मल्ल तयार झालेले. अनेकांनी या खोऱ्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलेलं... म्हणूनच या मातीचा वारसा पुढंही चालू राहावा यासाठी गोळेश्वरमध्ये आधुनिक पद्धतीचं कुस्ती संकुल व्हावं, ही मागणी गेल्या तीन-चार दशकांपासून होती. त्याची घोषणा होण्यासही अनेक वर्षे वाट पाहावी लागली. तत्कालीन क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी २००९ मध्ये या गावात झालेल्या एका सोहळ्यात आंतरराष्ट्रीय धर्तीवरच्या आधुनिक संकुलाची घोषणा केली.
कऱ्हाडच्या पंचक्रोशीला याचा आनंद झाला. लाल मातीच्या आखाड्यासोबतच अत्याधुनिक यंत्रणेनं सुसज्ज अशी जीम अन् मल्लांना राहण्यासाठी व्यवस्था असलेला प्रारूप आराखडाही तयार केला गेला. या नियोजित कुस्ती संकुलाचं डिझाइनही कऱ्हाडच्या सारंग बेलापुरे यांनी स्वत: तयार केलं. बेलापुरेंचे वडील गुंडोपंत हे खाशाबांचे पहिले मल्लगुरू होते. कऱ्हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना खाशाबांना गुंडोपंतांनीच कुस्तीविद्येचे धडे दिले होते. कैक बारकावे शिकविले होते. खाचाखोचा सांगितल्या होत्या; मात्र गुरुपुत्रानं तयार केलेला हा आराखडा मंजूर व्हायला दोन वर्षे वाट बघावी लागली. अखेर २०१२ मध्ये एस्टिमेट तयार केलं गेलं. २०१३ मध्ये पावणेदोन कोटी रुपयांची तरतूद केली गेली.
त्यावेळी कऱ्हाडचेच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वत: लक्ष घालून या कुस्ती संकुलासाठी १ कोटी ५८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, मुंबईतून टेंडर निघूनही कुणीच पुढं आलं नाही. पुन्हा टेंडर काढलं गेलं; मात्र जुनाच अनुभव पुन्हा पाठीशी राहिला. यातच दोन वर्षे गेली. सरकार बदललं. धोरणं बदलली. खाशाबा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाची फाइलही कुठंतरी कोनाड्यात धूळ खात पडली. या संकुलासाठी खाशाबांच्या कुटुंबानं गोळेश्वरमधील स्वत:ची बावीस हजार स्क्वेअर फूट जागा शासनाला मोफत देऊन टाकली, ज्याची किंमत आज अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, याच्या रजिस्ट्रेशनसाठी खिशातून केलेला पन्नास हजारांचा खर्चही शेवटपर्यंत शासनानं रणजित जाधव यांना दिलेला नाही.
वारंवार हेलपाटे मारून दमलेले रणजित जाधवही अखेर थकले. खचले. मॅटअभावी लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती खेळणारी इथली पोरंही गावातल्या गावातच शड्डू ठोकू लागली; कारण आता जमाना ‘मॅट’चा होता. राज्य अन् राष्ट्रीय पातळीवर पुढं सरकायचं असेल तर ‘मॅट’शिवाय पर्याय नव्हता.
अखेर अस्वस्थ रणजित जाधवांनी नाइलाजानं एक दुर्दैवी निर्णय घेतला. खाशाबांना मिळालेलं पदक विकून पैसे जमवायचे अन् त्यात अजून थोडी इकडची-तिकडची भर टाकून स्वत:च हे कुस्ती संकुल उभं करायचं. हा निर्णय जाहीर करतानाही रणजित जाधवांच्या डोळ्यात पाणी आलेलं..
‘मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं भावुक होऊन सांगताना खाशाबा जाधव म्हणे हातात पदक घेऊन बसायचे. आता मनावर दगड ठेवून ती हळवी आठवण बाजूला सारणारे रणजित आपल्या कर्तृत्वान पित्याचं पदक लिलावात विकायला निघालेत. पाहू या आता. देशाचं पहिलं वाहिलं आॅलिम्पिक पदक शानमध्येच राहणार, की भावी मल्ल तयार करण्यासाठी स्वत:चा बळी देणार?
 

Web Title: memories of khashaba jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.