घराण्यांचा राजकारण -- कार्यकर्ते वाऱ्यावरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 08:19 PM2019-01-12T20:19:25+5:302019-01-12T20:24:11+5:30

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या चाचपणीत आपल्याही नावाची चर्चा व्हावी, अशी भाबडी आशा बाळगणारा अन् अर्धे आयुष्य पक्षासाठी वाहिलेला कार्यकर्ता नावाचा माणूसही आहे. मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर गुलालाची पोती वाहणाºया याच कार्यकर्त्याला

Family Politics - Activists on the Voices | घराण्यांचा राजकारण -- कार्यकर्ते वाऱ्यावरती

घराण्यांचा राजकारण -- कार्यकर्ते वाऱ्यावरती

googlenewsNext
ठळक मुद्देअन्यथा सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता बंडाच्या भूमिकेत गेल्यास घराणेशाहीच्या रक्तातील सरंजामशाही कायमची नष्ठ होऊ शकते...

- पोपट पवार
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या चाचपणीत आपल्याही नावाची चर्चा व्हावी, अशी भाबडी आशा बाळगणारा अन् अर्धे आयुष्य पक्षासाठी वाहिलेला कार्यकर्ता नावाचा माणूसही आहे. मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर गुलालाची पोती वाहणाºया याच कार्यकर्त्याला डावलून सर्वच पक्षांनी बहुतांश उमेदवारीची मनसबदारी पारंपरिक घराण्यांच्या पदरात द्यायला सुरुवात केली आहे.

पुण्याजवळच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे, तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीची सूत्रे खा. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हाती एकवटली आहेत. आता पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणाची पायरी चढू पाहतेय. याआधी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात चंचूप्रवेश केलाच आहे.

मुळात लोकशाही देशात कुणाला कुठेही निवडणुकीत उभे राहता येत असले, तरी पक्षीय पातळीवर उमेदवारी मिळविताना पूर्वी प्रत्येकाला मर्यादा येत होत्या. त्याची पक्षीय निष्ठा, पक्षातील स्थान, पक्षासाठी केलेले काम याचे मापदंड ठरविले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात पक्षीय निष्ठेची सगळी गृहितके धाब्यावर बसवली जात असल्याने पक्षासाठी आयुष्यभर पखाली वाहणारे कार्यकर्ते वाºयावर आहेत. मावळही याला कसा अपवाद ठरेल? त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यकारिणीवर नसलेल्या उण्यापुºया २६ वर्षांच्या पार्थ पवार यांची थेट लोकसभेसाठीची होणारी चर्चा ही वारसाहक्कातून आली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

तिकडे प्रवरेच्या काठीही यापेक्षा वेगळे काही घडत नाही. राज्याच्या राजकारणात सर्वप्रथम घराणेशाही ज्या घराण्यापासून सुरू झाली त्या विखे-पाटलांची तर चौथी पिढी राजकारणातील शिडी सर करणार आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा करणारे विठ्ठलराव विखे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब विखे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि आता सुजय विखे-पाटील राजकीय पटलावर आपले नशीब आजमावू पाहत आहेत. याआधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे-पाटील यांनीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र आपल्या घराण्याभोवती केंद्रित केले होते. नगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्येकाने आपापली छोटी-छोटी संस्थानं उभी केली आहेत.

गेल्या २५-३० वर्षांत काळे, गडाख, कोल्हे, थोरात, विखे-पाटील, तणपुरे या नावांभोवतीच नगरीचे राजकारण फिरताना दिसते. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता यांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे सत्तेपासून खूप दूर गेला आहे. अर्थात हे बारामती आणि नगरमध्येच घडतंय असं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत घराणेशाहीची मूळं घट्ट रुजली आहेत. त्यामुळेच सोलापूर म्हटलं की, मोहिते-पाटील, शिेंदे यांच्या नावांव्यतिरिक्त तिसरं नाव आजही आठवत नाही, तर साताºयात भोसले, निंबाळकर, पाटील या घराण्यांनीच येथील सत्ताकेंद्रे काबीज केली आहेत. कोकणात नारायण राणेंना लोकसभा-विधानसभेला उमेदवारी देताना पुत्रांशिवाय तिसरा कार्यकर्ता सापडत नाही.

तिकडे रायगडात बहुजनांचे नेतृत्व करण्यासाठी धडपडणाºया सुनील तटकरेंनी एकाच घरात तीन आमदार आणि मुलीच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ठेवून रायगड जिल्ह्यात सत्तेचं रूपांतर ‘तटकरे अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये केले आहे. कार्यकर्ता हाच माझा प्राण आहे, असे सांगणाºया गोपीनाथ मुंडेंनीही वारसा ठरवण्यााची वेळ आल्यानंतर लेकीच्या पारड्यातच दान टाकलं, तर जनतेचे मुख्यमंत्री अन् कार्यकर्त्यांची वाघीण म्हणवून घेणाºया पंकजा मुंडेंनाही बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांपेक्षा बहीण जास्त महत्त्वाची वाटते. याच बीड जिल्ह्यात केशरकाकू क्षीरसागर यांच्यानंतर जयदत्त क्षीरसागर, सुंदरराव सोळुंके यांच्यानंतर प्रकाश सोळुंके, शिवाजीराव पंडितांनंतर अमरसिंह पंडित राजकीय वारसा चालवित आहेत.

तिकडे विलासराव गेल्यापासून बाभूळगावची गढी फार शांत-शांत वाटत असली, तरी या गढीवरील देशमुखीचा मान आजही देशमुखांभोवतीच केंद्रित आहे. लातूरच्या राजकारणात कार्यकर्त्यांपेक्षाही बाभूळगावची गढी अन् गढीवरचा देशमुख महत्त्वाचा ठरत आला आहे. दुसरीकडे भाजपवर काहीअंशी खट्टू झालेले एकनाथराव खडसे तरी या घराणेशाहीच्या खेळात मागे कसे राहतील? सून रक्षा खडसे यांना खासदारकी, पत्नीला ‘महानंदा’चे अध्यक्षपद, तर मुलीला साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर बसवून खान्देशात घराणेशाहीचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे. नाशिकमध्ये भुजबळांनी घरातच राजकीय बळ दिलं.

देशाच्या राजकारणात घराणेशाहीचा उगम गांधी घराण्यापासून सुरू झाला असला, तरी आज तो सर्वच राष्ट्रीय-प्रादेशिक पक्षांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळेच काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करीत राजकारणात स्थिरस्थावर झालेल्या आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाºया भाजपलाही उमेदवारीसाठी मुंडे-महाजनांचेच वारस सापडतात, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर तोंडसुख घेणारी शिवसेनाही ‘मातोश्री’वरील बाळासाहेब-उद्धव-आदित्य ही राजकीय वारसाहक्काची उतरंड आपसूकच विसरून जात ठाण्यात लोकसभेलाही शिंदेशाही झेंडा फडकवते, तर अमरावतीत अडसुळांचे साम्राज्य वाढू देते.

संघर्षातून पक्षाची बांधणी केलेल्या रा. सु. गवर्इंपासून ते कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाची मजबूत पकड निर्माण करून मंत्रिपद उपभोगणाºया रामदास आठवलेंपर्यंत सर्वांनाच राजकीय वारसदार ठरवताना रक्ताचं नातं अधिक दृढ वाटतं. अर्थात, राजकीय साठमारीत पक्ष वाढविताना जनाधार अधिक महत्त्वाचा आहे अन् भारतीय जनता भावनिकतेवर स्वार होणारी आहे. त्यामुळे या भावनिकतेचा फायदा सत्ताकेंद्रित घराण्यांनी न घेतला तरच नवल. येथील बड्या घराण्यांविषयी जनतेच्या मनामध्ये असलेले अवास्तवी अप्रूपही राजकीय घराणी मोठी होण्यास कारणीभूत ठरलं आहे. त्यामुळे नीतेश राणेंपासून ते राजीव सातवांपर्यंत आणि विश्वजित कदम यांच्यापासून ते पूनम महाजन, पंकजा मुंडे या सर्वांच्या वयाएवढे अनुभव असलेले असंख्य कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये आजही पदाच्या आशेने पखाली वाहताहेत. अर्थात, लोकशाहीच्या गोंडस नावाखाली राजकारणाचा प्रवास घराणेशाहीच्या पुढे जात नसल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. त्यामुळे ‘होऊया पालखीचे भोई’ यातच ते धन्यता मानतात.

माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातील संस्थाने खालसा केली खरी; मात्र लोकशाहीच्या मार्गाने ही राजकीय संस्थाने पुन्हा उदयाला आली. याच राजकीय संस्थानिकांच्या हातात देशातील सत्ताकेंद्राच्या नाड्या आहेत. त्यामुळे सत्तेचा केंद्रप्रमुख गेला तरी सत्तेला हादरा बसत नाही. त्याच्या माघारी सहानुभूतीच्या लाटेवर नवा युवराज सुभेदारी सांभाळण्यासाठी सज्ज असतो; नव्हे तर जनताच त्याचा राजकीय राज्याभिषेक घडवून आणते. व्यक्तिकेंद्रित, कुटुंबकेंद्रित राजकारणाची ही वाटचाल लोकशाहीसाठी घातक नसली, तरी निकोपही नाही हे नक्की...

त्यामुळे युवकांनी राजकारणात पुढे आले पाहिजे, असे सांगणाºया घरंदाज पुढाºयांनी आता राजकारणात घराणेशाहीचा गोतावळा तयार न करता निष्ठावान पक्षीय कार्यकर्त्यालाच राजकीय वारसदाराची शिदोरी द्यायला हवी. अन्यथा सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता बंडाच्या भूमिकेत गेल्यास घराणेशाहीच्या रक्तातील सरंजामशाही कायमची नष्ठ होऊ शकते...
(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)

Web Title: Family Politics - Activists on the Voices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.