भावनांचे व्यवस्थापन नियंत्रणापेक्षा महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:14 AM2019-06-30T00:14:16+5:302019-06-30T00:24:07+5:30

जोश, उत्साह आणि प्रगल्भता असलेली तरुणपिढी देशाच्या प्रगतीचा मोठा हिस्सा आहे. असे असले तरी बऱ्याच तरुणांमध्ये प्रचंड भावनिक गोंधळ आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक, सामाजिक आणि कार्यनिष्पादनावर होतो. म्हणून तरुणांमध्ये योग्य बीजे पेरल्यास

Emotion management | भावनांचे व्यवस्थापन नियंत्रणापेक्षा महत्त्वाचे

भावनांचे व्यवस्थापन नियंत्रणापेक्षा महत्त्वाचे

Next

- डॉ. अश्विनी पाटील

जोश, उत्साह आणि प्रगल्भता असलेली तरुणपिढी देशाच्या प्रगतीचा मोठा हिस्सा आहे.
असे असले तरी बऱ्याच तरुणांमध्ये प्रचंड भावनिक गोंधळ आहे. त्याचा परिणाम
वैयक्तिक, सामाजिक आणि कार्यनिष्पादनावर होतो. म्हणून तरुणांमध्ये योग्य बीजे पेरल्यास त्याचा काही प्रमाणात का असेना समाजात सकारात्मक परिणाम दिसून येतो. यासाठी त्याच्यात भावनिकतेचे व्यवस्थापन करणे आणि भावनिक बुद्धिगुणांक वाढविण्यावर भर देणे आज काळाची गरज आहे.

सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकामुळे जरी मोठ्या प्रमाणावर भौतिक प्रगती झाली असली, तरी माणसा-माणसांमधील अंतर वाढत चालले आहे. हे अंतर कमी करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. भावनिक बुद्धिमत्तेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅनियल गोलमन. त्यांनी पारंपरिक बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता अधिक असल्यामुळे व्यक्ती समाजात कौशल्यपूर्ण वागू शकते, हे सिद्ध केले आहे.

गोलमन यांच्या मते, कामाच्या ठिकाणी व्यक्तीची कामगिरी कशी असेल ते बुद्ध्यांकामुळे २५ टक्के, तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे ७५ टक्के कळते. या बुद्धिमत्तेमध्ये चार मूलभूत क्षमतांचा समावेश होतो, तो म्हणजे स्वत:ला व लोकांना ओळखण्यासोबत स्वत:च्या व इतरांच्याही भावनांचे व्यवस्थापन करणे.

बुद्धिमत्ता ही जन्मजात असते. त्यामुळे तिची वाढ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. मात्र, भावनिक बुद्धिमत्ता ही प्रयत्नपूर्वक वाढविता येते. त्याला वयाचे बंधन नसते. रामायण लिहिणारे वाल्मिकी हे अत्मानुभूतीनंतर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाले, हे जगप्रसिद्ध उदाहरण पाहता, आपणास भावनिक बुद्धिमत्तेची प्रचिती येईल. म्हणूनच असे म्हणता येईल की, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. कारण ती अर्जित क्षमता आहे. आपल्या क्षमतेनुसार, इच्छेनुसार आपल्या दृष्टिकोनात आणि वर्तनात बदल करणे भावनिक बुद्धिमत्तेमुळे सहज शक्य होते.

भावनिक बुद्धिमत्तेत विविध घटकांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यात वेगवेगळे रंग असतात, ही रंगसंगती आपणास आनंदच देते. त्याचप्रमाणे भावनिक बुद्धिमत्तेच्या सहायाने स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरंगाचा शोध घेऊन एक प्रभावी समाज आपण घडवू शकतो. व्यक्तीची ध्येये काय आहेत, हे निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता प्रभावी ठरते.

अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, भावनिक बुद्धिमत्ता उच्च असणाºया व्यक्तींची मानप्रतिष्ठा उच्च दर्जाची असते. या लोकांना नैराश्यही कमी येते आणि त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढण्यास मदत होते.

उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्यांना आपण प्रत्येक परिस्थितीत कोणत्या भावना अनुभवत आहोत, आपल्या भावनांचा परिणाम कार्यनिष्पादनावर कसा होतो, याची पूर्ण जाणीव असते. त्यांच्या विचार आणि कृतीमध्ये एकसंधपणा पाहावयास मिळतो. त्यांना स्वत:च्या उणिवांची आणि बलस्थानांचीही जाणीव असते. अशा व्यक्ती बहिर्मुख स्वभावाच्या असल्याने आपल्या आकर्षक बोलण्याने आणि खेळकर वृत्तीने त्या इतरांवर छाप पाडतात. अगदी विचारांती निर्णय घेतले असल्याने ते आपले निर्णय सहसा बदलत नाहीत. कोणत्याही प्रसंगी भावनाविवश न होता इतरांना आपल्या बोलण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी ते घेतात. अशा व्यक्ती जीवनाविषयी आशादायी दृष्टिकोन बाळगतात.

आपले मानसिक आरोग्य चांगले राखायचे असेल, तर स्वत:च्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या वृत्तीप्रमाणे इतरांच्या भावनांसोबत समायोजन करता आले पाहिजे. इतरांच्या समस्या समजूतदारपणे व सहजतेने जाणून घेणे, नकारात्मकतेतून सकारात्मक होणे, हे सर्व भावनिक बुद्धिमत्तेमुळेच शक्य होते.

आयुष्यात आपल्याला हरप्रकारचे लोक भेटत असतात. याचा अर्थ असा नाही की, सर्वांनाच आपण प्रतिसाद द्यायला हवा. जे लोक अडचणी निर्माण करतात अशा लोकांपासून जाणीवपूर्वक दूर राहायला शिकले पाहिजे; पण काही वेळेला एखाद्या प्रसंगामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण राहत नाही. उदाहरणार्थ मित्राला येण्यास उशीर झाल्यामुळे विमान प्रवास चुकला म्हणून तुम्ही महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकला नाही. साहजिक अशा वेळी आपल्याला राग येतो. वैफल्यही येते. अशावेळी आपण शांत राहून परिस्थिती कौशल्यपूर्ण हाताळून ताण कमी करणे महत्त्वाचे असते.

प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असतातच. त्यांचा वापर करताना भावनांचा उद्रेक काही प्रसंगामध्ये होत असतो. अशा वेळी आपल्या भावनांवर लक्ष ठेवा व त्यांचे योग्य पद्धतीने प्रकटीकरण होईल याची काळजी घेणे आवश्यक असते.

 

  • मन सुदृढ असेल तर शरीरदेखील सुदृढ राहते. असे असल्याने सर्वांगीण विकासाकरिता मन परिपूर्णरीत्या सक्षम बनविले पाहिजे. मैदानी खेळ खेळल्याने भावनांना वाट मोकळी करून दिली जाते. शाळेतील उपक्रमांच्या माध्यमातून भावनिक बुद्ध्यांक वाढण्यास मदत होते. त्यामुळे शाळांमध्येच काही योजना आखणे गरजेचे आहे.

 

  • मुलांच्या बाबतीत भावनिक विकास हा व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमच न शिकवता आपल्या ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग तो कसा करेल, तसेच वैयक्तिक जीवनात भावनांचे व्यवस्थापन कसे करेल, यावर विशेष भर देणे गरजेचे असते.
  • विद्यार्थी अनुकरणाने, निरीक्षणाने अनेक गोष्टी शिकत असतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर रोल मॉडेलची भूमिका करावी. विविध प्रकारची मूल्ये उदा. वडीलधाऱ्यांचा मान ठेवणे, संयमाने वागणे, नैतिकतेचे पालन करणे, नियमितपणा यांसारख्या गोष्टींमुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल.
  • प्रत्येक विद्यार्थी हा इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या क्षमता ओळखून त्याचा विकास करावा. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक नाते निर्माण करावे.
  • टी.व्ही., मोबाईल, संगणक यांसारख्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराने भावनिक उद्रेक कसा होतो? त्यामुळे मानसिक आजार बळावतात. याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये करून द्यावी.
  • विद्यार्थ्यांवर छोट्या-मोठ्या जबाबदाºया सोपवून त्यांना कार्यरत करावे. त्यासाठी मार्गदर्शन करावे.
  • समूहाची आवड निर्माण व्हावी. यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. पथनाट्य, समूहगीत, नाटक, नृत्य या माध्यमांतून इतरांचे विचार, भावना समजून घेता येतात.
  • मुलांच्या भावनिक, मानसिक संतुलनासाठी योगासने, मौन, व्यायाम, खेळ, प्राणायाम यांचा वापर करता येतो. अशा कार्यातून स्वविकास साधणे, स्वत:वर विजय मिळवणे कसे कठीण आहे, हे मुलांच्या लक्षात येईल. त्यातूनच स्वभावनांची जाणीव होईल.
  • विविध विषयांची पुस्तके वाचण्याची आवड पालक व शिक्षकांनी निर्माण करावी. त्यामुळे समाजात वावरताना इतरांच्या भावनांची किंंमत मुलांना कळेल. अशा उपक्रमांनी मुलांची भावनिक बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल.


(लेखिका मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहेत.)


.

Web Title: Emotion management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.