बारा वर्षानंतर पाकिस्तानात ‘बसंत मुबारक’

By meghana.dhoke | Published: December 23, 2018 07:50 AM2018-12-23T07:50:34+5:302018-12-23T07:55:03+5:30

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात गेली बारा वर्षं ‘बसंत’ साजरा करायला मनाई होती. आता ही बंदी उठली आहे आणि सीमापार एक नवं दार उघडतं आहे!

'Basant celebration ' in Pakistan after 12 years | बारा वर्षानंतर पाकिस्तानात ‘बसंत मुबारक’

बारा वर्षानंतर पाकिस्तानात ‘बसंत मुबारक’

Next

-मेघना ढोके

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात 12 वर्षांपूर्वी बसंत फेस्टिव्हलवर बंदी घालण्यात आली होती. ती याच आठवड्यात उठवण्यात आली. या बातमीने सीमेपल्याडच्या पंजाबात थंडीसह आनंदाची लाट आली आहे.

माघाच्या दणदणीत पंजाबी थंडीत दरवर्षी बसंत पंचमीला लागून दोन दिवस हा ‘बसंत’ साजरा केला जातो. आपल्याकडच्या पंजाबात तर तो साजरा होतोच; पण बॉर्डरपार पाकिस्तानातल्या पंजाबातही त्याचकाळात मोहरीची शेतं फुललेली असतात. आणि लहानथोर, बायाबापड्या पिवळे कपडे परिधान करून घरांच्या छतावर जातात आणि पतंग उडवतात. तोच हा बसंत. त्याच्या येण्याचं पिवळ्याधमक उष्ण रंगात होणारं स्वागत आणि त्यासाठी पतंगांनी सजणारं आकाश. एकेकाळी महाराज रणजीत सिंग यांनी लाहोरमध्ये वसंताचं स्वागत म्हणून ही पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. महाराज स्वत: राणीसाहेबांसह पिवळा पोशाख परिधान करून पतंग उडवत असत. त्यानंतर लाहोर मेला सजू लागला. या जत्रेत देश-विदेशांतून लोक येत. आधीच लाहोरची खुबसुरती, त्यात पंजाबी माणसांची दर्यादिली आणि माघातलं प्रसन्न सोनसळी वातावरण. आजही  कुण्या एकेकाळच्या लाहोरी मेल्याच्या आठवणी काढून सीमेच्या दोन्ही बाजूला अनेक जीव कातर होतात.

2005 पर्यंत हा बसंत असा पंजाब प्रांतात त्यातही लाहोरमध्ये फार दणक्यात साजरा व्हायचा. पण पुढे पतंगबाजीच्या स्पर्धा सुरू झाल्या, विजेत्याला बक्षिसं जाहीर होऊ लागलीे. पतंगबाजीची स्पर्धा म्हणजे मांज्यानं कापाकापी आलीच.  मांज्याला केमिकल लावणं, काचा लावणं असे भीषण प्रयोग सुरू झाले. स्पर्धेत गळा चिरून माणसं मरू लागली. 2005 मध्ये गळा कापून 19 माणसं दगावली आणि 200हून अधिक जखमी झाली. काहीजण न्यायालयात गेले आणि या खेळावर बंदी घालण्यात आली.

साधारण घटनाक्रम असा दिसत असला तरी केवळ माणसांच्या आरोग्यापायी घेतलेला हा निर्णय नव्हता. कट्टर कडवट होत चाललेल्या पाकिस्तानातल्या वातावरणात काही राजकीय धुरिणांनी आणि माध्यमांनी स्वत:ची पोळी भाजायची म्हणून हा बसंत फेस्टिव्हल गैरइस्लामी ठरवला. जे धर्मात नाही ते साजरं करायचं नाही असं         म्हणणा-याची आणि इतकी वर्षे चालत आलेली लोकपरंपरा नाकारणा-याची संख्या वाढली. परिणामी जे बळी गेले त्यांचं भांडवल करत या उत्सवावर बंदी घालण्यात आली.

मग आता एकाएकी ही बंदी का उठवली?- तर पाकिस्तानात आलेली नवी राजवट आणि बदलतं सामाजिक वातावरण. इमरान खानसाहेबांना हे जगाला दाखवायचं आहे की, पाकिस्तान कट्टर-कडवट नाही, आम्ही उदार परंपरेचे पाईक आहोत. दुसरीकडे हेही लक्षात यायला लागलं आहे की, केवळ धर्माच्या आधारे लोकांना नियंत्रित करायला गेलं की स्थानीय परंपरा, लोकभावना, रीती हे सारं मागे पडतं. त्यानं लोकांमध्ये असंतोष होतो. लोकांना सोबत घ्यायचं  तर सांस्कृतिक गोष्टी खुल्या करणं गरजेचं आहे.

 

 सामाजिक-सांस्कृतिक अवकाश धर्माच्या नावाखाली कोंडून घालू नये इतपत भान पाकिस्तानात पुन्हा जागं व्हायला लागल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. म्हणून तर गेल्यावर्षी पाकिस्तानात दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर झाली. होळीचीही सुटी देणं सुरू झालं!

पाकिस्तानातले ज्येष्ठ पत्रकार आणि मानव अधिकार कार्यकर्ते सलाम धारेजो सांगतात, ‘बसंत हा पंजाबी उत्सव आहे, बाकी पाकिस्तानात तो साजरा होत नाही. मात्र पंजाबी माणसांना सोबत ठेवायचं तर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या इमरान खान यांच्या पक्षाला एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं होतं. पीएमएल-एन म्हणजे नवाज शरीफ यांच्या पक्षाचा गड असलेल्या पंजाबात त्यांना शह द्यायचा तर हा लोकप्रिय निर्णय घेणं त्यांना सहज शक्य होतं. त्यानं पंजाबात एकदम वातावरण बदललं. अर्थात या उत्सवात पुन्हा काही गडबड झाली तर नवाज शरीफ गट त्याचा फायदा घेणारच!’

हा निर्णय  ‘राजकीय’ आहे, हे खरंच; मात्र धर्म आणि लोकजीवन, संस्कृती, स्थानिक परंपरा यांची गल्लत करू नये, लोकांना त्यांचे पारंपरिक सणउत्सव साजरे करू द्यावेत, यादिशेनं पाकिस्तानातील नवीन सरकार काम करत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. धर्म आणि संस्कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत, धर्मासाठी संस्कृती नाकारून आपण पाकिस्तानातल्या माणसांच्या जगण्याचा पायाच काढून घेतला असं काहीे बुद्धिजीवी, इतिहासतज्ज्ञ आता तिथं जाहीरपणे बोलू लागले आहेत.

.. बसंत फेस्टिव्हल एक दार नव्यानं उघडतो आहे, इतकंच !


‘..लाहोरीये तो खुश है बस !’

पाकिस्तानच्या काइट फ्लाइंग असोसिएशनचे पदाधिकारी  खलीद मलिक सध्या बेहद खुश आहेत. त्यांना फोन केला तर ते म्हणाले, ‘खुश तो होनेही है, कुछ तो कण्ट्रोल में आया! लाहोरीये तो खुश है बस!’

मग थोड्या गप्पा झाल्या. ते म्हणाले, ‘बसंत साजरं करणं ही धार्मिक गोष्ट नाही हे मला मान्य आहे; पण ती सांस्कृतिक गोष्ट तर आहे !  ऋतूबदल होतो, सुगी येते, ते साजरं करणं कुणाला का आक्षेपार्ह वाटावं? ये बसंत मनाना है ना जी, एकतरह का वे ऑफ एक्स्प्रेसिंग फ्रीडम है ! यहॉँ लाइफ में अपने कण्ट्रोल मे क्या है? है कुछ?’

खलीदसाहेबांना सहज विचारलं, किती मोठे पतंग उडतात लाहोरच्या आकाशात.? ते क्षणभर थांबले. मग म्हणाले, ‘कैसे बताऊ. अब देखो मेरे सामने र्मसिडीज बेन्झ खडी है, उसकी लेन्थ पकडो उससे टू अँण्ड हाफ टाइम बडी रहती कई पतंगे.. लाहोरीये, ऐसेही जिते है. शानसे !’

(लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: 'Basant celebration ' in Pakistan after 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.