‘समन्वय’साठी सलग ७२ तास फलंदाजीचा विश्वविक्रम

By Admin | Published: January 15, 2017 01:06 AM2017-01-15T01:06:35+5:302017-01-15T01:06:35+5:30

शिवाजी पार्क मैदानाच्या गौरवाला शोभेल असा रोमहर्षक क्षण क्रिकेट चाहत्यांना नुकताच पाहायला मिळाला. या वेळी कोणत्या दिग्गज खेळाडूची खेळी अथवा राजकीय व्यक्तिमत्त्वाचे भाषण

World record for 72 consecutive hours for 'coordination' | ‘समन्वय’साठी सलग ७२ तास फलंदाजीचा विश्वविक्रम

‘समन्वय’साठी सलग ७२ तास फलंदाजीचा विश्वविक्रम

googlenewsNext

- प्रवीण दाभोळकर

शिवाजी पार्क मैदानाच्या गौरवाला शोभेल असा रोमहर्षक क्षण क्रिकेट चाहत्यांना नुकताच पाहायला मिळाला. या वेळी कोणत्या दिग्गज खेळाडूची खेळी अथवा राजकीय व्यक्तिमत्त्वाचे भाषण नव्हते तर काळाचौकीला राहणारा मुकुंद गावडे याने सलग ७२ तास फलंदाजी करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. हा अजुबा पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. समन्वय सामाजिक संस्थेचा स्वयंसेवक असलेला मुकुंद याने या माध्यमातून गोळा झालेला निधी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचे जाहीर केले. मुकुंदच्या या विश्वविक्रमाच्या औचित्याने समन्वयचे सामाजिक कार्यही अधोरेखित झाले. या अनुषंगाने समन्वयच्या कार्याचा घेतलेला आढावा.
शहरी, ग्रामीण आणि आदिवासी समाजातील परस्पर सहकार्य वाढवून ग्रामीण-नागरी सातत्य दृढ करण्यासाठी समन्वय ही संस्था काम करीत आहे. पालघर तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी समाजाच्या नव्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर, सुशिक्षित, सुजाण व उच्चविद्याविभूषित असावा या उद्देशाने १५ - २० तरुण मित्र-मैत्रिणींनी समन्वयच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व रोजगार अथवा व्यवसाय मार्गदर्शनासाठी प्रयत्न करण्याचे काम पालघर जिल्हा व तालुक्यातील नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमधील पेणंद या आदिवासी पाड्यात फेब्रुवारी २०१६पासून सुरू केले. सध्या ३० जणांची टीम येथे कार्यरत आहे.
पेणंद गावात समन्वयला विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र स्थापन करावयाचे आहे. या ग्रंथालयाचा फायदा फक्त पेणंदमधीलच नाही, तर पेणंद, उचावली, नांगरमोडी, तळेखल, घाटीम, दहीवाळे, दारवेपाडा, बेलपाडा, जांभूळपाडा, नवघर, करवाळे, पाटीलपाडा, रांजणपाडा, उंबरपाडा, वाळूतळेपाडा यांसारख्या १६ ते १८ गावांतील शेकडो विद्यार्थ्यांना होईल. तसेच प्रत्येक विद्यार्थी हा संगणक साक्षर होईल.
मुंबई, ठाण्यासारख्या प्रगत शहरांपासून १०० किमीपेक्षाही कमी अंतरावर असणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील बरेचसे आदिवासी पाडे आजही अन्न, पाणी, निवारा, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाची साधने यांसारख्या मूलभूत व महत्त्वाच्या गरजांपासून वंचित राहिलेले आहेत. तसेच कुपोषण, बेरोजगारी, निरक्षरता, बालविवाह, व्यसनाधीनता यांसारखे गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. हे समन्वयसमोरचे मोठे आव्हान असल्याचे समन्वयच्या अध्यक्षा गौरी जागुष्टे या सांगतात.

पेणंद येथील संस्थेचे उपक्रम
- उत्कर्ष शिकवणी उपक्रम - दर रविवारी इयत्ता ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. दर रविवारी सरासरी १०० विद्यार्थी शिकवणीसाठी उपस्थित असतात.
- बाल बौद्धिक विकास उपक्रम - दर रविवारी इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून ‘ज्ञानरचनावादी’ पद्धतीने शिकविण्यात येते. दर रविवारी सरासरी ४५ विद्यार्थी शिकण्यासाठी उपस्थित असतात.
- पायाभूत संगणक प्रशिक्षण उपक्रम - दर रविवारी इयत्ता ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याच्या उद्देशाने पायाभूत संगणक प्रशिक्षण दिले जाते.
- पायाभूत इंग्रजी प्रशिक्षण उपक्रम - विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती कमी करण्यासाठी व त्यांच्यात इंग्रजी भाषा संवाद कौशल्य निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
- खिचडी उपक्रम - दर रविवारी शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारचा आहार म्हणून खिचडी देण्यात येते. दर रविवारी सरासरी १२० विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.
- पेणंद जलवृद्धी उपक्रम - दर उन्हाळ्यात पेणंद गावात उद्भवणारी टंचाईसदृश परिस्थिती बदलण्यासाठी, भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो.
- विद्यार्थी दत्तक योजना - हुशार व होतकरू अशा गरजू विद्यार्थ्यांच्या किमान दोन वर्षांच्या शिक्षणाचा खर्च या उपक्रमामार्फत करण्यात येतो. सध्या पेणंदमधील ३, तळेखलमधील १, नांगरमोडीतील १, करवाळेमधील १ व दारवेपाड्यातील २ अशा एकूण ८ विद्यार्थिनींच्या पुढील दोन वर्षांचा शैक्षणिक खर्च संस्था करीत आहे.
- पेणंद गृहउद्योग उपक्रम - गावातील महिला व अशिक्षित तरुणींना गृहउद्योगाच्या मार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या पाड्यातील ४ महिलांना पापड उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समन्वयशी जोडलो गेलो. तिथल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मी स्वत: काही आर्थिक मदत करण्यास असमर्थ होतो. म्हणून माझे कलागुण वापरून काही मदतनिधी उभारला जाईल आणि सर्वांना या कामाची ओळख होईल असे काही करता येईल का हा विचार होता. त्याच प्रेरणेने विश्वविक्रमापर्यंत पोहोचलो. 
-मुकुंद गावडे, सलग ७२ तास फलंदाजी करणारा, समन्वय स्वयंसेवक 

आज जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याशी, त्यांच्या कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांतील स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे.
- अक्षय वणे, सचिव, समन्वय

Web Title: World record for 72 consecutive hours for 'coordination'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.