मुंबई कुणाची?

By admin | Published: January 15, 2017 01:10 AM2017-01-15T01:10:37+5:302017-01-15T01:10:37+5:30

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. घोडामैदान आता फार दूर नाही.

Who is Mumbai? | मुंबई कुणाची?

मुंबई कुणाची?

Next

- राहुल रनाळकर

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. घोडामैदान आता फार दूर नाही. झाडून सगळे राजकीय पक्ष या निवडणुकीत आपापल्या पक्षाची ताकद आजमावण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी सरसावले आहेत. या रणधुमाळीत कोण बाजी मारणार आणि कोण कुणाला धूळ चारणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली आणि जमवाजमवीचा घेतलेला वेध.

मुंबई कोणाची? ही गेल्या अनेक वर्षांपासून दिली जाणारी घोषणा आता पुन्हा आसमंतात दुमदुमणार आहे. भाजपा पूर्णशक्तिनिशी या निवडणुकीच्या तयारीला गेल्या दीड वर्षांपासूनच लागली आहे. विधानसभा निवडणुकीत ११५ प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त मते मिळाली होती. त्यामुळे युती करताना या प्रभागांवर भाजपा हक्क सांगणार हे उघड आहे. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ आणखी किमान १० दिवस असेच सुरू राहाणार असेच चित्र आहे. मुंबईत आजवर शिवसेना वाटाघाटीत जे देईल, ते घेण्याशिवाय भाजपापुढे पर्याय नव्हता. गेल्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेने भाजपाला ६३ जागा दिल्या होत्या. त्यात हमखास पडणाऱ्या १५ जागांचा समावेश होता. भाजपाने ६३ पैकी ३१ जागा जिंकल्या. समित्यांच्या वाटपातही शिक्षण आणि सुधार समिती भाजपाकडे आली, पण या व्यतिरिक्त महापालिकेत सतत दुय्यम स्थान भाजपाला मिळाले. आता राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने, साहजिकच नेत्यांसह कार्यकर्त्यांना मुंबईत सत्ता आणायची आहे, राजकीयदृष्ट्या त्यात गैर काहीच नाही. राज्यात तब्बल ७१ नगराध्यक्ष आणि १२०० नगरसेवक निवडून आणत भाजपाने आपणच ‘लीडर’ असल्याचे सिद्ध केले आहे. वास्तविक, नोटाबंदीचा निर्णय आणि राज्यात घुसळून निघालेल्या सामाजिक वातावरणामुळे सरकारविषयी नाराजीचा सूर उमटून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला फटका बसेल, असे भाकीत अनेक राजकीय पंडितांनी वर्तवले होते, पण फटका तर सोडाच, पण घवघवीत यश भाजपाने मिळवले. जिवाचे रान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला. राज्यात मिळालेल्या यशात मुख्यमंत्र्यांच्या यशाचा टक्का ९० टक्क्यांहून अधिक आहे. अचूक राजकीय भान असलेला हा नेता आता मुंबईवर नजर ठेऊन आहे. राजकीय मुसद्देगिरीचे अनेक डावपेच त्यांना अचूक ज्ञात आहेत, त्यामुळे पुढचे ८-१० दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भाजपाच्या यशापुढे राज्यात शिवसेना झाकोळली गेली हे स्पष्ट आहे. शिवसेनेचा विचार करता, शिवसेना आत्तापर्यंतच्या निवडणुकांपेक्षाही अधिक आक्रमकतेने यंदा मैदानात उतरणार आहे. शिवसेनेला संपवण्याची भाषा भाजपाच्या काही नेत्यांनी केली. त्यानंतर, शिवसैनिक कमालीचे चवताळून उठले. किंबहुना, शिवसेना संपवण्याची भाषा ही नेहमीच शिवसेनेसाठी फायदेशीर ठरते, असे यापूर्वीही दिसून आले आहे. पुढे मग तो विषय अधिक भावनिक बनत जातो. राजकीय अभ्यासकांच्या मते कोणताही पक्ष, संघटना, विचार संपत नसतो. मुंबईत तर शिवसेना चांगलीच मुरलेली आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खुद्द शरद पवार यांनी अनेकदा पक्ष संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते कसे असावेत, हे स्पष्ट करताना शिवसेना आणि शिवसैनिकांचे उदाहरण अनेकदा कार्यकर्त्यांना दिले आहे. शरद पवार यांच्यासारखा आजच्या घडीला राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेता या पद्धतीने शिवसेनेकडे पाहत असेल, म्हणजे शिवसेना काय रसायन आहे हे कळून येईल. मुंबईचा प्रश्न आला म्हणजे, या संपूर्ण संघटनेत स्फुरण चढते. मुंबईतील ज्वलंत विषयांमध्ये भावनांची सरमिसळ होऊन प्रचाराचा राळ उठवला जातो. अगदी आचारसंहिता जाहीर होईपर्यंत शिवसेना आणि भाजपाकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याची भाषा केली गेली. दोघांनी सगळ््याच म्हणजे, २२७ जागांवर स्वतंत्रपणे लढल्यास काय निकाल लागेल, याचीही चाचपणी केली. दोन्ही पक्षांच्या २२७ उमेदवारांची यादीही तयार आहे. मग अचानक आचारसंहिता जाहीर होताच चर्चा कशी काय सुरू झाली? ‘मी आणि देवेंद्र युतीचा निर्णय घेऊ,’ असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केले. ‘युती अजेंड्यावर होईल,’ असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला ललकारले. शेवटी राजकारण हीदेखील एक स्पर्धा आहे. आजवर केलेल्या कामावर आणि पुढच्या अजेंड्यावर निवडणुकीच्या दंगलीत उतरावे लागते. सत्ता प्राप्त करण्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल, ते सगळे करणे म्हणजे राजकारण होय. कल्याणचा फॉर्म्युला तर भाजपा-सेना मुंबईत पुन्हा वापरत नाही ना? असे वाटायला जागा आहे. निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा घडवून आणायची, शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा ताणून धरायची. मग शेवटी ‘तुझं तू, माझं मी’ करायचे प्रसारमाध्यमांनाही आपल्याच भोवती खिळवून ठेवायचे. विरोधकांना प्रसिद्धीची कोणतीही संधी द्यायची नाही. लोकांसमोरही मग सगळे युतीचेच नेते फिरते ठेवायचे. जो-तो शक्तिनुसार निवडून येईल. एकमेकांवर आरोप करून दोघांनीच ‘मायलेज’ घ्यायचे. विरोधकांना युतीबाबत झुलत ठेवायचे. एकदा का निवडणूक पार पडली की, मग पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचे. कदाचित, यामुळेच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी राष्ट्रवादीशी युती करायचीच नाही, असा पवित्राच जाहीर करून टाकलाय. आत्तापर्यंत झालेय असे की, युती झाली तर आघाडी होणार. त्यामुळे चारही पक्षांमधील सगळेच चित्र अधांतरी. तथापि, निरुपम जरी म्हणत असले, तरी काँग्रेसमधील एका मोठ्या गटाला आघाडी व्हावी असे वाटते. तथापि, मुंबई अध्यक्ष या नात्याने संजय निरुपम यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आघाडीची शक्यताही धूसर आहे. उगीच युती होण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही, हे त्यांना कदाचित पटलेले असावे, शिवाय राष्ट्रवादीची मुंबईतील ताकद एवढी दखलपात्र नाही. काँग्रेसला त्यांच्या असलेल्या जागा तर वाचवायच्या आहेतच, शिवाय त्या वाढवण्यावर त्यांचा भर असेल, हे स्पष्टच आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएमला टक्कर देताना नाकीनऊ येऊ शकतात, हे पाहून काँग्रेसने आधीच ‘मुस्लीम कार्ड’ ओपन केलेय. ज्या प्रभागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मते आहेत, तेथे मुस्लीम उमेदवार देणार, असे निरुपम यांनी जाहीर केलेय. भाजपाला रोखण्याची खरी क्षमता काँग्रेसमध्येच असल्याचे एव्हाना मुस्लीम मतदारांनाही काही अंशी का होईना जाणवलेय. त्यामुळे समाजवादीसह एमआयएमला ते किती पसंती देतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मनसे फॅक्टर नक्कीच काही ठिकाणी डोकेदुखी ठरू शकतो, तर काही प्रभागांमध्ये अनपेक्षित लाभाचाही मानकरी ठरू शकतो. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांची, प्रभागांची अ, ब, क अशी वर्गवारी केली जाते. त्यात सर्वाधिक निवडून येण्याची शक्यता असलेले उमेदवार अ गटांत असतात. मनसेत मात्र, दोनच प्रकारची वर्गवारी असावी. एक निवडून येऊ शकणारे आणि दुसरे म्हणजे अन्य पक्षांच्या अ गटांत मोडणाऱ्या उमेदवारांना पाडू शकणारे! राज ठाकरे यांचा करिष्मा निश्चितच आहे. मराठी माणसाच्या मनात त्यांच्याविषयी एक कोपरा नेहमीच आहे, पण तो निवडणुकीच्या रिंगणात मतांमध्ये परावर्तित होऊ शकलेला नाही, हे वास्तव आहे, शिवाय २००७ आणि २०१२च्या निवडणुकांत मनसेला लोकांनी आजमावलेले आहे. त्यामुळे मनसेला असलेल्या जागा टिकविण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागणार आहे. एकूणच पंचरंगी, षटरंगी, सप्तरंगी निवडणुका रंगण्याचीच शक्यता सध्या तरी दिसतेय. नोटाबंदीनंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांप्रमाणेच भाजपाने मुसंडी मारली, तर आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेचीही मुंबईतील तळागाळातील खरी ताकद यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे. जर शिवसेना बहुमताने किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर हा पक्ष अधिक झळाळून निघणार आहे.

भावनिक विषय
शिवसेनेला संपवण्याची भाषा भाजपाच्या काही नेत्यांनी केली. त्यानंतर, शिवसैनिक कमालीचे चवताळून उठले. किंबहुना, शिवसेना संपवण्याची भाषा ही नेहमीच शिवसेनेसाठी फायदेशीर ठरते, असे यापूर्वीही दिसून आले आहे. पुढे मग तो विषय अधिक भावनिक बनत जातो.

- जिवाचे रान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला. राज्यात मिळालेल्या यशात मुख्यमंत्र्यांच्या यशाचा टक्का ९० टक्क्यांहून अधिक आहे. अचूक राजकीय भान असलेला हा नेता आता मुंबईवर नजर ठेऊन आहे. राजकीय मुसद्देगिरीचे अनेक डावपेच त्यांना अचूक ज्ञात आहेत, त्यामुळे पुढचे ८-१० दिवस
अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

- शिवसेनेचीही मुंबईतील तळागाळातील खरी ताकद यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे. जर सेना बहुमताने किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर हा पक्ष अधिक झळाळून निघेल. कल्याणचा फॉर्म्युला तर भाजपा-सेना मुंबईत पुन्हा वापरत नाही ना? निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा घडवून आणायची, शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा ताणून धरायची.

- शरद पवार यांच्यासारखा आजच्या घडीला राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेता या पद्धतीने शिवसेनेकडे पाहत असेल, म्हणजे शिवसेना काय रसायन आहे हे कळून येईल. मुंबईचा प्रश्न आला म्हणजे, या संपूर्ण संघटनेत स्फुरण चढते. मुंबईतील ज्वलंत विषयांमध्ये भावनांची सरमिसळ होऊन प्रचाराचा राळ उठवला जातो. अगदी आचारसंहिता जाहीर होईपर्यंत शिवसेना आणि भाजपाकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याची भाषा केली गेली.

राज ठाकरे यांचा करिश्मा निश्चितच आहे. मराठी माणसाच्या मनात त्यांच्याविषयी एक कोपरा नेहमीच आहे, पण तो निवडणुकीच्या रिंगणात मतांमध्ये परावर्तित होऊ शकलेला नाही, हे वास्तव आहे

काँग्रेसमधील एका मोठ्या गटाला आघाडी व्हावी असे वाटते. तथापि, मुंबई अध्यक्ष या नात्याने संजय निरुपम यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आघाडीची शक्यताही धूसर आहे. उगीच युती होण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही, हे त्यांना कदाचित पटलेले असावे, शिवाय राष्ट्रवादीची मुंबईतील ताकद एवढी दखलपात्र नाही. काँग्रेसला त्यांच्या असलेल्या जागा तर वाचवायच्या आहेतच, शिवाय त्या वाढवण्यावर त्यांचा भर असेल, हे स्पष्टच आहे.

(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत.)

Web Title: Who is Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.