तृतीयपंथियांच्या मंदिराची दुरवस्था!
By Admin | Published: August 24, 2014 09:06 PM2014-08-24T21:06:36+5:302014-08-24T21:06:36+5:30
या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात.
अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे तृतीयपंथियांचे एक मंदिर असून, या मंदिराची सध्या दुरवस्था होत आहे. या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी मंदिराच्या विटा काढून नेत असल्याने, भिंती खचत असून, मंदिर परिसरात सर्वत्र गवत व घाण साचली आहे.
मूर्तिजापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर हातगाव नावाचे एक छोटेसे खेडे आहे. या गावाबाहेर मुस्लिम धर्मस्थळाच्या धाटणीतले एक घुमट आहे. यालाच तृतीयपंथियांचे मंदिर म्हणतात. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून तृतीयपंथी येत असतात. गत काही वर्षांपासून या मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याने दर्शनार्थींची संख्या रोडावली आहे.
मंदिराच्या विटा पडत आहेत. भिंतीच्या विटा पाण्यावर तरंगतात, ही माहिती परिसरात पसरल्याने नागरिक भिंतीच्या विटा काढून नेतात. मंदिरात फारसे कुणाचे जाणे येणे नसल्याने, परिसरात गवत वाढले आहे. या परिसराचा वापर गावातील नागरिक शौचासाठी करीत असल्याने, दुर्गंधी पसरली आहे.
मंदिरात अधूनमधून तृतीयपंथी येऊन, पूजा करतात, असे गावकर्यांनी सांगितले. मंदिर परिसरात एक दर्गा असून, समाधीसाठी बांधलेले काही घुमट आहेत.
या दग्र्यांच्या विटाही पाण्यावर तरंगतात. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आले असल्याचे गावातील नागरिक सांगतात. मंदिराचे बांधकाम कुणी व का केले, याची नेमकी माहिती गावकर्यांना नाही. मंदिरात कोणत्याही देवाची मूर्ती नाही. अनेक वर्षांपासून येथे तृतीयपंथी येतात. पूर्वी येथे त्यांची यात्राही भरायची. गावातील नागरिकांनी ही जागा त्यांच्यासाठीच सोडली आहे.
** तृतीयपंथीच करणार मंदिराचा विकास
मंदिराचा विकास स्वत:च करण्याचा निर्णय तृतीयपंथीयांनी घेतला आहे. त्यांनी हातगाव ग्रामपंचायतशी संपर्क साधून, या मंदिराचा आणि स्थळाचा विकास करण्याचे म्हटले आहे. पैसे तृतीयपंथीच देणार असून, विकास ग्रामपंचायतकडून करून घेणार आहेत. मंदिरापर्यंत रस्ता तसेच आवारभिंत बांधून, परिसराची साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती गावकर्यांनी दिली.
** विटा तरंगतात पाण्यावर
मंदिराच्या विटा खास पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. या विटा साधारण विटांच्या तुलनेत वजनाने अतिशय कमी आहेत. विटा बनविताना आतमध्ये हवेची पोकळी ठेवण्यात आली असल्याने, त्या पाण्यावर तरंगतात, असे मंदिर परिसरातील गावकरी सांगतात.