ग्लोबल वॉर्मिंग आहेच, पण...
By admin | Published: July 5, 2015 02:58 AM2015-07-05T02:58:07+5:302015-07-05T05:48:03+5:30
गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलेले असताना किनारपट्टीजवळच्या असलेल्या पाकिस्तानात का आली उष्णतेची लाट , का दिसतोय असा ‘ड्रास्टिक’ बदल?
- जी. पी. शर्मा
(लेखक स्कायमेट व्हेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट या हवामानविषयक संस्थेत उपाध्यक्ष आहेत.)
गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलेले असताना किनारपट्टीजवळच्या असलेल्या पाकिस्तानात का आली उष्णतेची लाट , का दिसतोय असा ‘ड्रास्टिक’ बदल? का वाढतो आहे पर्यावरणातील असमतोल? जाणून घेऊ थेट स्कायमेटमधील तज्ज्ञांच्या शब्दांत...
‘एल निनो’चा प्रभाव या वर्षीच आहे, असे नाही. तो गेल्यावर्षी होता, यावर्षीही आहे आणि पुढील वर्षीही राहील. त्यात बदल झालेला नाही. गतवर्षीच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव होता तेव्हाही चांगला पाऊस पडलाच होता. उलटपक्षी यावर्षी त्याचा प्रभाव कमी झाला आहे.
सगळ्या घटनांना ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा ‘क्लायमेट चेंज’ जबाबदार आहे असे म्हणतो, तेव्हा सरसकट असे म्हणता येत नाही. जागतिक तापमानवाढ ही समस्या आहेच. मात्र तत्काळ या घटनांचा त्यांच्याशी संबंध जोडता येत नाही आणि जोडला तरी अभ्यासाअंती निष्कर्ष काढावे लागतात. सरतेशेवटी एवढेच, की ‘नॉट अॅट आॅल टू क्लायमेट चेंज...’
ऐन मान्सूनच्या प्रवासादरम्यान दक्षिण आशियातील वातावरण ढवळून निघाले असून, पाकिस्तानात उष्णतेची लाट येण्यापूर्वी भारतात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शिवाय देशातील मुसळधार पावसानंतर जुलै महिन्यात ठिकठिकाणी उष्णतेचे चटके जाणवू लागले आहेत. वातावरणातील या बदलांना ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची पार्श्वभूमी आहे, असे चटकन म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मान्सूनपूर्व आणि नंतरचे वातावरणीय बदल याआधी समजावून घेणे आवश्यक आहे.
हिंदी महासागरात दाखल झालेला मान्सून अंदमान-निकोबारसह केरळमध्ये येण्याचा अंदाज स्कायमेटने व्यवस्थित वर्तविला होता. तो तंतोतंत नसेलही, पण देशात मान्सून दाखल होण्याबाबत संस्थेने वर्तविलेली सरासरी तारीख बरोबर होती. अंदमान-निकोबारनंतर महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील म्हणजे उत्तरेकडील प्रवास वेगाने झाला आणि वेळेआधी मान्सूनने देश व्यापला. अगदी याच कालावधीत पाकिस्तानच्या काही भागात उष्णतेची लाट आली. या उष्णतेच्या लाटेला पश्चिम प्रकोप (वेस्टर्न डेस्टर्बन्स) कारणीभूत होता. एका अर्थाने मान्सूनपूर्व उष्णतेची लाट म्हणून या घटनेला संबोधता येईल. उष्णतेच्या लाटेदरम्यान येथील काही भागांतील कमाल तापमान तब्बल ४५ अंशाच्या घरात गेले आणि त्या उष्णतेच्या लाटेत सुमारे हजारएक जणांचा बळी गेला. हे सर्व का झाले? कारण या काळात येथे मान्सून सक्रिय झाला नव्हता. त्याचवेळी येथे पश्चिमी प्रकोप निर्माण झाल्याने उष्णतेची लाट आली होती. म्हणून पाकिस्तानातील काही भागांचे तापमान वाढले होते. मान्सूनदरम्यान अरबी समुद्रात किंवा गुजरातमध्ये जी स्थिती निर्माण झाली; ती स्थिती येथे निर्माण झाली नाही. मान्सून अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशेने उत्तर भारताकडे सरकला. त्यामुळे झाले असे, की पाकिस्तानच्या दक्षिण भागातील कमाल तापमानात वाढ झाली.
आता जुलै महिन्याचा विचार केला तर मान्सून स्लो डाऊन आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिण भारतात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात, तेलंगणामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र त्याचवेळी पहाडी क्षेत्रात पावसाने वेग पकडला आहे. देशाच्या विविध भागांत निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र वातावरणात बदलाव आणत असते. आता नेमके तेच होते आहे.