Shivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने

By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2018 06:28 PM2018-10-19T18:28:07+5:302018-10-19T18:29:01+5:30

सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. पण गेल्या काही दसरा मेळाव्यांप्रमाणेच यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण नुसती टीका, इशारे आणि आव्हाने देणारेच ठरले.

Shivsena Dasara Melava 2018: Just criticism, warnings and challenges | Shivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने

Shivsena Dasara Melava 2018 : नुसती टीका, इशारे आणि आव्हाने

सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख पक्षाचे शक्तिकेंद्र मानल्या जाणाऱ्या शिवतीर्थावरून निवडणुकांसंदर्भात काहीतरी मोठी घोषणा करतील, अशी अटकळ वर्तवली जात होती. अशी घोषणा ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमले होते, तर लाखो शिवसैनिक मीडिया आणि सोशल मीडियावरून शिवाजी पार्कवरील घडामोडींकडे लक्ष ठेवून होते. पण गेल्या काही दसरा मेळाव्यांप्रमाणेच यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण नुसती टीका, इशारे आणि आव्हाने देणारेच ठरले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत असत, तेव्हा त्यांचे विचार शिवसेनेची पुढील वर्षभराची दिशा ठरवणारे असत. पण या दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी ना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली, ना शिवसैनिकांना तशी काही दिशा दर्शवली.  

 मेळाव्याच्या सुरुवातीच सुभाष देसाई, संजय राऊत, रामदास कदम आदी नेत्यांनी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका करून वातावरण तापवले. मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, पाकिस्तान, दहशतवादी आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरले. पण सत्ता सोडण्याच्या आपल्या घोषणेचे काय झाले. तसेच भाजपाला विरोध असूनही आपण सत्तेत का आहोत याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुखांनी दिले नाही.   

2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केलेला विश्वासघात शिवसेना आणि शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता. त्याची सल त्यांना अद्यापही बोचत आहेत. त्यातच शिवसेनेचे बोट धरून आलेला भाजपा राज्यात बघता बघता मोठा पक्ष झाला, ही बाबही शिवसेनेला पचवता आलेली नाही. पण भाजपाला रोखण्यासाठी ठोस रणनीती आखणे सेनेला शक्य झालेले नाही. त्यामुळेच भाजपाचा ''सामना'' करण्यासाठी सकाळ संध्याकाळ धनुष्यातून टीकेचे बाण सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सेना नेतृत्वाकडून सुरू आहे. दसरा मेळाव्यातही त्याचा पुढील अध्याय लिहिला गेला. 
भाजपाला अयोध्येत राम मंदिर बांधता येत नसेल तर ते बांधण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे आव्हानही शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी दिले. तसेच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात अयोध्येकडे कूच करण्याची घोषणाही केली. कालच्या दसरा मेळाव्यातील हीच काय ती मोठी घोषणा आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे पुढच्या दिवसांमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. पण त्याचा शिवसेनेला फार मोठा राजकीय लाभ होण्याची शक्यता नाही. 

 आधीच न्यायप्रविष्ट असलेल्या राम मंदिराच्या विषयावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपाची गोची झाली आहे. आता आपणही अयोध्येकडे कूच करून  सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठायचे आणि दबाव आणून आधीच अडचणीत असलेल्या भाजपकडून हवे ते मान्य करून घ्यायचे, असा सेनेचा डाव असू शकतो. त्यात आता ते कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागेल. 

बाकी पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाऊबंदकीतून विरोधक झालेल्या मनसेचा नामोल्लेखही या दसरा मेळाव्यातून करण्यात आला नाही, हे विशेष. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर आसूड ओढले जात असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र कुठेही उल्लेख केला नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा देऊन  भाजपाशी कितीही वाद असला, परिस्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे छुपे संकेतही दिले. मात्र एकंदरीत विचार केल्यास शिवसेना पक्षप्रमुखांनी दसरा मेळाव्यातील संबोधनामध्ये टीका, इशारे आणि आव्हानेच दिल्याने शिवसेनेच्या पुढील निवडणुकीतील भूमिकेबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.   
 

Web Title: Shivsena Dasara Melava 2018: Just criticism, warnings and challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.