Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 06:44 PM2019-05-13T18:44:11+5:302019-05-13T19:00:12+5:30

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणी टंचाई

sad strory of the Chief Minister Devendra fadanvis's adopted village; big water crisis | Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

googlenewsNext

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असूनही या गावातील १० हजार लोकांना टँकरच्या एक घागर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नव्हे, तारेवरची कसरत करीत आडातून पाणी शेंदून घ्यावे लागते.  


निलंगा तालुक्यातील हलगरा या गावात तेरणा नदीवरून कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गावात ३६ मिनी वॉटर योजना सुरु केल्या, पण या योजनांपैकी केवळ केवळ दोन मिनी टाक्या सुरू आहेत. २१ विंधन विहिरीपैकी एक चालू असून २० बंद पडल्या आहेत. ११ हातपंप बंद असून आठ जुने पुरातन काळातील बांधकाम केलेले आड बंदच आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत बंद पडल्याने एका टँकरद्वारे तीन आडामध्ये तीन दिवसाला एकदा पाणी सोडले जाते. पाणी आडात पडताच महिला, मुले आणि अबालवृद्धांची एकच धावपळ होते. घागर दोरीने शेंदून पाणी घेण्यासाठी आडावर एकच झुंबड उडते. टँकरमधून पडत असलेले पाणी घागरीत शेंदून घेण्यासाठी लगबग सुरू होते. सदर पाणी टंचाई लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात चार बोअर, विहीर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यातील दोन अधिग्रहणाचे स्रोत आटले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आणखी एका टँकरची व अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून त्यास मान्यता मिळाली नसल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले. 


हलगरा या गावात जलयुक्त शिवार व गावकºयांच्या श्रमदानातून चांगले काम झाले होते. याची दखल घेत २०१७ मध्ये मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गावात भेट देऊन श्रमदान केले व गाव दत्तक घेतले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या गावास भेटही दिलेली नाही. यावर्षी भीषण दुष्काळ पडला. या भागातून वाहणाºया तेरणा, मांजरा नद्या आटल्या आहेत. गावाजवळील शिरसी तळे आटले आहे. पाणी टंचाई तीव्र झाली. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ग्रामस्थ पाणी टंचाईचे चटके निमूटपणे सहन करीत आहेत.  


आडात शेकडो घागरींची गर्दी...
गावाची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून तीन आडात टँकरचे पाणी दोन दिवसाला एकदा सोडले जाते. पाणी आडात पडण्याअगोदरच शेकडो रिकाम्या घागरी आडात दोरीच्या साह्याने पाणी पडण्याची वाट पाहात भर उन्हात थांबतात. घरातील कर्ता पुरुष, महिला, आजी, मुले, मुली हातात कळशी, घागर घेऊन धावत सुटतात. जीव मुठीत घेऊन या आडावर पाणी भरले जात आहे.


 

पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाकडे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही लक्षच दिले नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांनी सोमवारी येथे भेट देत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनास भाग पाडू, असे आश्वासन दिले. हलगरा गावात तातडीने टँकर पाठविण्यासाठी तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना फोनवरून सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, किशोर लंगोट, देवदत्त पाटील, मंगेश चव्हाण, भरत पाटील, समीद्दीन देशमुख, सुधीर मसलगे, सुरेश रोळे, दत्ता भिडे, आशीतोष मसलगे, संतोष गंगठडे, दत्ता जोशी, नंदकुमार जोशी आदी उपस्थित होते. 


दुसऱ्या टँकरसाठी प्रस्ताव...
हलगरा गावात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. चार विंधन विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. त्यापैकी दोन बंद पडल्या. एका टँकरने आडात पाणी टाकले जात आहे. दुसºया टँकरच्या मागणीसाठी १० दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला असल्याचे ग्रामसेवक निखिल माळी यांनी सांगितले.

Web Title: sad strory of the Chief Minister Devendra fadanvis's adopted village; big water crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.