जिप्समला उत्पादनबंदीचा आदेश
By Admin | Published: March 6, 2017 03:26 AM2017-03-06T03:26:27+5:302017-03-06T03:26:27+5:30
जिप्सम कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला
वाडा: तालुक्यातील नारे ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या जिप्सम कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे.
या कंपनीत जिप्सम पावडर व शीटचे उत्पादन घेतले जाते. सन २००४ पासून सुरू असलेल्या या कंपनीच्या प्रदूषणामुळे मागील सात आठ वर्षांपासून गावात जमीन, पाणी व हवेचे प्रदूषण होऊन ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन व आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार ग्राम पंचायतीने विविध शासकीय पातळीवर व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या.या तक्र ारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वेळा तपासणी करून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कंपनीने ५ व २३ जानेवारी रोजी खुलासा केला होता, परंतु तो प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला होता. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन यांनी २ मार्च रोजी त्यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन व तक्रारदार ग्रामपंचायत यांची सुनावणी घेतली. त्यात तक्र ारदारांनी सादर केलेले पुरावे , प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सादर केलेले तपासणी अहवाल यानुसार कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात पाणी प्रदूषण. नियंत्रण व नियमन कायदा १९७४, हवा प्रदूषण नियंत्रण व नियमन कायदा १९८१, व धोकादायक वस्तूंची विल्हेवाट लावणे कायदा २००८ यांचा भंग करत असल्याचे सिद्ध झाले. व्यवस्थापन याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा करू शकले नाही. त्यामुळे कंपनीला ७२ तासात उत्पादन बंद करण्याचा आदेश त्यांनी दिला. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कंपनीचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात येतील असेही म्हटले आहे.
दरम्यान तक्रारदार उपसरपंच सुधीर पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश हा ग्रामस्थांनी केलेला संघर्ष, ग्राम पंचायतीने केलेला पाठपुरावा व या मुद्यावर वृत्तपत्रांनी दिलेला पाठिंबा या हा विजय आहे. या पुढेही कंपनीच्या अन्य बेकायदेशीर कामांबाबत आमचा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले.