सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

By admin | Published: July 13, 2017 12:40 AM2017-07-13T00:40:34+5:302017-07-13T00:41:33+5:30

२२ जुलैला फैसला : समितीसमोर मांडणार भूमिका

Answers to Sadabhauwa | सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यावर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी सदाभाऊंनी केली असून, येत्या २२ जुलैला ते संघटनेच्या समितीपुढे भूमिका मांडणार आहेत.
संघटनाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांना २३ प्रश्नांबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी त्यांना २२ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी केली आहे. वास्तविक, यामुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे. सदाभाऊंनी उत्तरे सादर केल्यानंतरही तो कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
भाजपशी सदाभाऊंच्या असलेल्या सलगीचा प्रश्न उपस्थित केला असला तरी, प्रत्यक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच भाजपला रीतसर पाठिंबा दिला असल्याने, सदाभाऊंकडून याचा उल्लेख होऊ शकतो. स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या विरोधात सरकारने पत्र दिले असताना, सरकारच्या प्रत्येक गोष्टीत सदाभाऊंचा सहभाग दिसत असल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
वास्तविक, सत्तेच्या काळात आजवर स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून भाजपला पाठिंबाच देत आली आहे. त्यामुळे एकट्या सदाभाऊ खोत यांना या वादात खेचण्यावरही उलट प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
सरकारची धोरणे पसंत नसतील तर संघटनेचे प्रमुख म्हणून राजू शेट्टींनीच त्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज होती. संघटनेने सदाभाऊंंना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराबाबतही विचारणा केली आहे. प्रत्यक्षात विधानसभेवेळी भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांचा प्रचार खुद्द राजू शेट्टी यांनीच केला होता. त्यामुळे हा मुद्दा संघटनेच्याच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखा आहे.
सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिवसेनेशी जवळीक झाली आहे. त्याबद्दल सदाभाऊंकडूनही उलट प्रश्न उपस्थित होऊ शकतो. एकूणच वादाला वाद वाढत जाऊन, त्याचे फलित काहीच निघणार नाही, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरांनी वादाच्या विस्तवाला चालना दिली जाईल.


मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री


दोन्ही बाजूंचे
संभाव्य पर्याय...
१ सदाभाऊंचे म्हणणे फेटाळून संघटना त्यांच्यावर कारवाई करू शकते.
२ सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सदाभाऊंना राजीनामा देण्याचे आदेश
दिले जाऊ शकतात.
३ संघटनेतून हकालपट्टी करून सदाभाऊंचे मंत्रिपद काढून घेण्याची शिफारस सरकारकडे केली जाऊ शकते.
४ नवीन संघटना स्थापन करून सरकारमधील आपले स्थान टिकविण्याची खेळी सदाभाऊंकडून खेळली जाऊ शकते.
५ पक्षीय कारवाईनंतर भाजपकडून सदाभाऊंना प्रवेशाची ‘आॅफर’ दिली जाऊ शकते.
६ म्हणणे ऐकून सदाभाऊंना पुन्हा एक संधी देण्याची औपचारिकता संघटनेकडून पार पाडली जाऊ शकते.


खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १ मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोर तूर आणि कांदाप्रश्नी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आपण आंदोलनस्थळी आलात. त्या आंदोलनात खासदार शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली असताना, आपण विचारपूस करण्याची तसदी का घेतली नाही?
काँग्रेसच्या घराणेशाहीवर आपण वारंवार कठोर टीका केली. मात्र, आपल्या मुलाला निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची घाई केली. ही घराणेशाही नाही का?
खासदार शेट्टी आणि कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दबाव टाकतात, असे वक्तव्य आपण खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्याचा खुलासा करावा.


मी लोकशाही मानणारा व जपणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. संघटनेच्या आदेशाप्रमाणे हजरही राहणार आहे. संघटनेनेच घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून मी चालत आहे.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री


खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी न होता, भाजपच्या शिवार संवाद यात्रेत सहभागी का झालात?
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन् आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते न पाळता, आम्हाला हे शक्य नाही, असे सुप्रीम कोर्टात सरकारच्यावतीने लिहून दिले. ही भाजप सरकारने केलेली फसवणूक आहे, यावर आपले मत काय?

Web Title: Answers to Sadabhauwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.