राज्यात ४० हजारांवर नळ पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:39 AM2018-05-30T05:39:29+5:302018-05-30T05:39:29+5:30

राज्यात पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी ४० हजारावर नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत.

40 thousand Taps Water Supply Scheme in the State | राज्यात ४० हजारांवर नळ पाणीपुरवठा योजना

राज्यात ४० हजारांवर नळ पाणीपुरवठा योजना

चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : राज्यात पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी ४० हजारावर नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत. मात्र, यातील मोजक्याच योजनांच्या नळांना मीटरने पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाणी गळती आणि ते वाया जाण्याचे प्रमाण खूपच मोठे आहे. नळांना मीटरने पाणी दिल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकते. शिवाय पाणीपुरवठा खात्याच्या महसुलातही वाढ होऊ शकते.
राज्यात ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळपाणी योजना, प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, राष्टÑीय पेयजल योजना अशा विविध योजनाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. राज्यातील ८४ टक्के जनतेला नळपाणी पुरवठा योजनांद्वारे तर १६ टक्के जनतेला इतर उपाययोजनाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. जून २०१७ अखेर राज्यात ४० हजार १२० वैयक्तिक तर ६४३ प्रादेशिक नळपाणी योजना अशा ४० हजार ७६३ नळपाणी पुरवठा योजना होत्या. गेल्या वर्षभरात यात आणखी योजनांची भर पडली आहे. यातील ९८१ वैयक्तिक आणि ९४ प्रादेशिक अशा १०७५ योजना कायमस्वरुपी बंद पडल्या आहेत. तर बंद पडलेल्या २८१ वैयक्तिक आणि ९३ प्रादेशिक अशा ३७४ योजना पुनरुज्जीवित होऊ शकतात.
याशिवाय पाणीपुरवठ्याच्या इतर उपाययोजनांमध्ये सौर उर्जेवर आधारीत ३९८० दुहेरी पाणी पुरवठा योजना, विद्युत पंपावर आधारीत २९१५ दुहेरी पाणीपुरवठा योजना आणि झऱ्यावर आधारीत १४१ लघु पाणी योजनांचा तसेच ५१ हजार १७९ शाश्वतता उपायांचा समावेश आहे.
राज्यातील जनतेला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी इतक्या योजना कार्यरत असल्या तरी या योजनांमधील पाण्याची चोरी, गळती हा मोठा गंभीर प्रश्न आहे. नळांना मीटरने पाणीपुरवठा केला जाण्याचे प्रमाण काही शहरे आणि काही गावांपुरतेच मर्यादित आहे. मीटर नसल्यामुळे अनेक जण नळांना तोट्याच बसवत नाहीत यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.

नागपूर : २७० एमएलडी पाण्याचे बिलिंग नाही
नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत. यातील ३ लाख २० हजार ग्राहकांकडे पाण्याचे मीटर आहे. शहरातील यातील २७० एमएलडी पाण्याचे बिलिंग होत नाही. पाणी बिलाची वसुली ४५ टक्के आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४०१ पाणीपुरवठा योजना आहेत. अपवाद वगळता मीटरद्वारे पाणीपुरवठा होत नाही.

सोलापुरात ३० तर बुलडाण्यात २०% गळती
सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये १५०२ नळ पाणीपुरवठा योजना असून, यामधून सुमारे ३० टक्के पाण्याची गळती होते. शहरातील सार्वजनिक आणि खासगी मालकीच्या ८० टक्के नळ्यांना तोट्याच नाहीत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. जिल्ह्यातील ३२ नळपाणी योजना कालबाह्य झालेल्या आहेत.
बुलडाणा : जिल्ह्यात १ हजार २६२ पिण्याचा पाण्याचा योजना आहेत. त्यात १३ योजना प्रादेशिक विभागाच्या आहेत. त्यापैकी १० योजना कालबाह्य झाल्या असून जवळपास २० टक्के पाण्याची गळती आहे.

लातूर : एकाच ठिकाणी मीटर
दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळामुळे पाण्याचे महत्त्व लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे. सध्या ७० टक्के ठिकाणच्या जलवाहिन्या खराब झाल्या आहेत़ त्यामुळे जुन्या गळती होणाºया जलवाहिनीतूनच गावांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात प्रादेशिक पाणी-पुरवठ्याच्या १४ तर १ हजार २६ योजना ह्या ग्रामपंचायती अंतर्गत आहेत़ औसा तालुक्यातील उटी बु़ या गावातील नळांना मिटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़

कोल्हापूर : १९ गावातच नळांना पाणी मीटर
कोल्हापूर जिल्ह्यात १0२७ ग्रामपंचायती असून आजपर्यंत एकूण १२७५ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सध्या २४९ योजनांची दुरूस्ती आवश्यक आहे. काही शहरे वगळता जिल्ह्यामध्ये केवळ १९ गावांमध्ये पाण्याची मीटर बसवण्यात आली आहेत.
अहमदनगर जिल्हयात
१३४९ नळपाणी योजना
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४३ प्रादेशिक, तर १३०६ स्वतंत्र (गावनिहाय) नळ पाणी पुरवठा योजना आहेत. स्वतंत्र सर्व योजना चालू स्थितीत आहेत. परंतु प्रादेशिकमधील ५ योजना वीजबील थकबाकीमुळे बंद पडल्या आहेत. प्रादेशिकमधील सुमारे ३०० गावांना मीटरद्वारे पाणीपुरवठा होतो.

रत्नागिरीत २३०० पाणी योजना
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये २३०० पाणी पुरवठा योजना आहेत़ त्यापैकी १८४ योजना नादुरुस्त असून त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ४५०० बंधारे उभारण्यात आल्याने यंदाची पाणीटंचाई गतवर्षीपेक्षा कमी आहे़

सांगली : ७०० पैकी तीन गावांतच मीटर
सांगली जिल्ह्यातील १३ मोठ्या शहरांपैकी सात शहरात आणि ६९९ गावांपैकी केवळ बिचूद, येडेनिपाणी आणि हरिपूर या तीन गावांमध्येच मीटरने पाणी दिले जात आहे. तसेच नळांना तोट्या नसण्याचे ४० टक्के प्रमाण आहे. जिल्ह्यातील ३६ पैकी ३० प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या असून त्या कालबाह्य झाल्या आहेत .
अकोला : पेयजलच्या ६९ योजना अपूर्ण
अकोला जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांपैकी खांबोरा ६४ खेडी योजना, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे, आलेगाव-नवेगाव-१४ गावे योजना सध्या बंद आहेत. तर लंघापूर ५७ खेडी योजनेतील अनेक गावांचा पाणी पुरवठा स्रोत आटल्याने खंडित झाला आहे. त्याचवेळी पेयजल योजनेतील ७२ पैकी ६९ योजनांची कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यात कुठेच मीटरने पुरवठा होत नाही.
नाशिक : ग्रामीणमध्ये ३० % पाणी गळती
नाशिक जिल्ह्यात १६६८ पैकी १६२९ पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू आहेत. ४८ योजना या नादुरुस्त आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याची गळती ३० टक्के तर प्रादेशिक पाणी योजनेत ४० टक्के गळती आहे. सुमारे ५० टक्के नळांना तोट्या नाहीत.
बीड जिल्ह्यातील २५० योजना कालबाह्य
बीड जिल्ह्यात ११४८ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी २५० योजना कालबाह्य झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात २५९३ योजना
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २ हजार ५९३ पाणी योजना असून, यातील १८ योजना या कालबाह्य झाल्या आहेत. उदभव कमी असल्याने आता १0 ते १५ योजनांचे पाणी बंद आहे. तर विजबील थकीत असल्याने ५ योजना बंद आहेत. गळती व पाणी वाया जाण्याचे प्रमाण १0 ते १२ टक्के आहे. मीटरने ३0 गावांत पाणीपुरवठा केला जातो.
औरंगाबादेत चारशे योजना कोरड्या
औरंगाबाद जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून सध्या ४३८ टँकरद्वारे गावे, वाड्या, वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सन २००६ ते २०१५-१६ पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात भारत निर्माण कार्यक्रम, राष्ट्रीय पेयजल योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून ८६३ नळयोजना मंजूर आहेत. यापैकी ८३३ योजना कार्यान्वित असल्या तरी सद्य:स्थितीत भूजलपातळी घटल्यामुळे जवळपास ४०० नळ पाणीपुरवठा योजना कोरड्या पडल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात ५४ नळयोजना बंद
हिंगोली जिल्ह्यात एकूण ७२४ गावे, वाडी-तांडे असून ६१२ ठिकाणी नळयोजनांची कामे झाली आहेत. त्यापैकी ५४ योजना नादुरुस्त असून ७५ गावांना पाणीपुरवठा करणाºया चार प्रादेशिक योजनाही बंद आहेत. हिंगोली वगळता एकाही शहरात मीटरने पाणीपुरवठा होत नाही
जालन्यात ६५८ योजना
जालना जिल्ह्यात एकूण नळयोजनांची संख्या ही ६५८ आहे. त्यातील २३३ नळ योजनांना देखभाल दुरूस्तीची गरज आहे. जिल्ह्यात नळांना तोट्या बसविण्याचे प्रमाण केवळ ५ टक्के आहे. पाणी गळतीचे प्रमाण सरासरी २२ टक्के आहे. जिल्ह्यात कुठेच मीटरने पाणीपुरवठा होत नाही.
नांदेड जिल्ह्यात ११६ योजना बंद
नांदेड जिल्ह्यात १ हजार ६४७ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी १ हजार ५३८ सुरू असून १०८ योजना कालबाह्य किंवा बंद स्थितीत आहेत, तर एक योजना पुनरूज्जीवित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे १८ प्रादेशिक नळयोजनांपैकी १० योजना चालू स्थितीत आहेत.
परभणी : पाण्याचे मीटरच नाहीत
परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर केलेल्या ७०४ योजनांपैकी २२० पाणीपुरवठा योजना बंद असून, १८४ योजना कालबाह्य झाल्या आहेत़ जिल्ह्यात सरासरी १२़६५ टक्के पाण्याची गळती आहे़ जिल्ह्यातील ४५ टक्के नळांना तोट्या नाहीत़ एकाही शहरात मीटरद्वारे पाणी दिले जात नाही़
सातारा : प्रत्येक गावात तीन योजना !
सातारा जिल्ह्यात एकूण १४९६ गावे आहेत, त्यापैकी प्रत्येक गावात सरासरी ५ योजनांची कामे झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून मिळाली. यापैकी सर्वच योजना सद्य:स्थितीत सुरू आहेत.पाचगणी, सातारा, महाबळेश्वर, कºहाडमध्ये वितरण नलिकांना मीटर बसविले आहेत.
वाशिम : २८ नळपाणी योजना बंदस्थितीत
वाशिम जिल्ह्यात एकूण ६५९ गावे असून, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या एकूण ५५२ नळपाणी योजना आहेत. यापैकी २८ योजना बंदस्थितीत आहेत. शहरी भागात २० टक्के नळांना तोट्या नाहीत. कारंजा शहरात मीटरने पाणी दिले जाते .
खान्देशातील १५८ योजना बंद
जळगाव : खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यात नळपाणी पुरवठा योजनांचे चित्र दिलासादायक आहे. ३२१४ पैकी ३०५६ योजना सुरु आहेत तर १५८ योजना सध्या बंद आहेत. जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही मीटरने पाणीपुरवठा नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेतर्फे मीटरने पाणीपुरवठा होत आहे.

Web Title: 40 thousand Taps Water Supply Scheme in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.