या कवितांना मरण यावं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:15 AM2019-04-20T00:15:28+5:302019-04-20T00:15:33+5:30

उदय कुलकर्णी काही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू ...

These poems should die! | या कवितांना मरण यावं!

या कवितांना मरण यावं!

googlenewsNext

उदय कुलकर्णी
काही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू तिचं मरण.
आपल्या कवितेला अमरत्व लाभावं असं अनेकांना वाटतं; पण विंंदा करंदीकरांसारखा कवी मात्र आपल्या एका कवितेला या देशात मरणच येत नाही, अशी सल मनात ठेवून हे जग सोडून गेला. १९५२ साली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंदांनी ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता लिहिली. कवितेच्या काही ओळी अशा होत्या,
‘गोड गोड जुन्या थापा,
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग,
तुम्ही तरी काय करणार?, आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यांमधे, पुन्हा पुन्हा तोच पाय
जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी.
(जिकडे टक्के तिकडे टोळी),
ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता!’
लोकसभेची आताची निवडणूक ही सतरावी निवडणूक; पण १९५२ साली लिहिलेली ही कविता तितकीच ताजी असल्याचा अनुभव येतो आहे ना?
मंगेश पाडगांवकर हे मराठीतील आणखी एक प्रख्यात कवी. त्यांनी ‘सलाम‘ ही कविता लिहिली. या उपहासात्मक कवितेला आजही टाळ्या मिळतात. ही कवितादेखील मरत नाही. पाडगांवकरांनी लिहिलं होतं,
‘या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम
या देशाच्या सुउदात्त, सुमंगल, सुपरंपरेला सलाम
सर्व बिलंदर घोषणांना सलाम
जातिभेदाच्या उकीरड्यांना सलाम
या उकीरड्यांतून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम
निवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाम
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम
सलाम प्यारे भाईयों सबको सलाम!’
रामदास फुटाणे हे विंंदा व पाडगांवकरांच्या नंतरच्या पिढीतले; पण त्यांची ‘भारत कधी कधी माझा देश आहे!’ ही कविता सुद्धा अमरत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याचं प्रत्यंतर येतंय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान एव्हाना पार पडलं आहे. निवडणुकीत कोणाचे प्रचाराचे मुद्दे कोणते हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरते आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या विरोधात होते त्याच पक्षाची उमेदवारी घेऊन अनेक उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. आपलं कोण आणि परकं कोण, हेच कळू नये अशी स्थिती आहे. सुबुद्ध मतदार त्यामुळं हतबुद्ध झालेला आहे. थेट पंतप्रधानही मागास जातीमुळं आपल्याला लक्ष्य बनवलं जातंय, यासारखे आरोप विरोधकांवर करताना दिसत आहेत. उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी कमीअधिक प्रमाणात ज्या त्या मतदारसंघातील विविध जातिधर्माचे मतदार किती, याचा विचार केला आहे. दुसरा महत्त्वाचा निकष, निवडून येण्याची कुवत म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची कुवत!
गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित. १९७१ साली ‘मेरे अपने’साठी त्यांनी एक गीत लिहिलं होतं, ‘हाल-चाल ठीक-ठाक है.’ बेकारीची समस्या आणि देशात नावापुरतं कायद्याचं अस्तित्व यावर या गीतात बोचरी टीका होती. या निवडणुकीच्या वेळीही मतदारांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न बेरोजगारीचा आहे. पुढे गुलजार यांनी ‘आँधी’सह विविध चित्रपटांतून देशातल्या परिस्थितीवर आपली लेखणी परजली होती. एकदा त्यांनी लिहिलं, ‘हमारे वोट खरीदेंगे हमको अन्न देकर, यह नंगे जिस्म छुपा देते हैं कफन देकर.’ देशात ज्या पद्धतीनं धर्मवाद नव्यानं हातपाय पसरतोय त्याविषयी लिहिताना गुलजारनी लिहिलं, ‘लोग बंटते ही खुदा बंटने लगे हैं, नाम जो पूछे कोई डर लगता है, अब किसे पूजे कोई, डर लगता है.’ असं लिहिणाºया कवींची सत्ताधाऱ्यांना भीती वाटावी यात नवल नाही. वसईतील अनेक कवींना पोलीस खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्याची गोष्ट तीन-चार दिवसांपूर्वीचीच आहे. एका इराणी चित्रपटात दाखवलं होतं की, स्रीला आपल्यासाठी कोणत्याही नमुन्याचं कुलूप निवडायचं याचं स्वातंत्र्य दिलं जात असे. आपल्या देशातही कुलूप निवडण्याचं स्वातंत्र्य देणारी लोकशाही कधी काळी अस्तित्वात येणार नाही ना, अशी भीती काहीजण व्यक्त करतात; पण गुलजारांसारख्या कवींना सामान्य माणसाच्या जगण्याच्या व तगून राहण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते लिहितात, ‘मारो, कुटो, कत्ल करो या फूँक दो इनको, लोगों में जिंंदा रहने की लामत नही ताकत होती है!’ सामान्य माणसात ही ताकद आहे म्हणूनच तर मरण न येणाºया कवितांना कधी ना कधी मरण येईल, हा विश्वास जागा आहे!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: These poems should die!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.