इतर पक्षांचे आंदोलनापुरतेच स्थान

By Admin | Published: May 26, 2016 11:31 PM2016-05-26T23:31:15+5:302016-05-27T00:15:39+5:30

केविलवाणी अवस्था : सत्ता भोगायला दुसरेच, समाजाचाही कायमच दुटप्पीपणा -- पक्षाचा 'राज'रंग -शिवसेना

Place for the movement of other parties | इतर पक्षांचे आंदोलनापुरतेच स्थान

इतर पक्षांचे आंदोलनापुरतेच स्थान

googlenewsNext

जिल्ह्याच्या राजकारणातील प्रस्थापित दोन्ही काँग्रेस व त्यांच्या विरोधातील शिवसेना-भाजप हे पक्ष सोडल्यास इतर पक्षांची स्थिती फारच केविलवाणी आहे. रस्त्यावरील आंदोलने, सामाजिक चळवळी करायला हे पक्ष आणि राजकीय सत्तेसाठी मात्र दुसरेच, अशी स्थिती अनेक वर्षांपासून आहे. या पक्षांनी नवे नेतृत्व, नवे लोक जोडलेले नाहीत; त्यामुळे आहे त्या पक्षांची खुराडी बनली, लोक तुटले आणि फक्त पक्षाची बॅनर्स राहिली, असा अनुभव येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांशिवाय स्वाभिमानी, जनसुराज्य, शेका पक्ष, जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट, रिपब्लिकन पक्ष, मनसे, आप यांचे अस्तित्व राजकारणात आहे; परंतु त्यांपैकी स्वाभिमानी पक्षाचीच स्थिती व संघटनात्मक पातळीवर काहीतरी घडामोडी सुरू आहेत. इतर पक्षांची स्थिती बरी, तर काहींची दयनीय आहे. लोकांना आपला विचार ते पटवून देऊ शकलेले नाहीत. सत्तेच्या साठमारीत आर्थिक ताकद कमी पडत असल्याने पक्ष आणि कार्यकर्तेही जिवंत ठेवणेही अवघड बनले आहे.
उसाच्या आंदोलनाच्या चळवळीतून जन्माला आलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पुढच्या टप्प्यात स्वाभिमानी पक्षात रूपांतर झाले. या पक्षाचा गेली दहा वर्षे राजू शेट्टी यांच्या रूपाने खासदार निवडून येत आहे. शेट्टी यांच्या राजकारणाचा शिरोळ तालुका हा पाया. त्यामुळे त्या तालुक्याच्या राजकारणात आजही या पक्षाचा दबदबा आहे; परंतु इतर तालुक्यांत अजूनही या पक्षाला दबदबा निर्माण करता आलेला नाही. आता आजरा कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचा एक संचालक निवडून आला. ‘स्वाभिमानी’च्या पाठबळामुळे आजऱ्यात सत्तांतर झाले व ते गडहिंग्लजमध्ये होऊ शकले नाही, असा दावा पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्यात काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे. निव्वळ राजकारण हा या पक्षाचा पिंडच नव्हे. ऊसदरासह शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला दर मिळण्यासाठीची आर्थिक चळवळ हा या पक्षाचा मूळ उद्देश. त्यामुळे त्याच्यासाठीचा लढा सुरू आहे; परंतु त्यातही यावर्षी अनेकदा तडजोडीची भूमिका घ्यावी लागली आहे. खासदार शेट्टी यांनी काँग्रेसवाल्यांना विरोध म्हणून भाजपची संगत केली. त्यांनी संघटनेची मदत घेतली; परंतु सत्ता आल्यावर आमच्या ताकदीवर आम्ही जिंकलो, असा भ्रम करून घेतला. त्यामुळे संघटनेसह इतरांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडले. परिणामी सत्ताधारी पक्षाचा घटक असूनही संघटनेला त्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यापेक्षा आंदोलनाची भाषा करावी लागली. त्यात पुन्हा सदाभाऊ खोत यांच्या राज्यमंत्रिपदाचे गाजर दाखविल्यावर संघटनेची पुन्हा कोंडी झाली. सहनही होईना व सांगताही येईना, अशी पाळी त्यांच्यावर आली. ही अगतिकता असली तरी शेट्टी यांच्या नेतृत्वावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. एक हाक दिली तर पाच-पन्नास हजार लोक रस्त्यावर आणण्याची ताकद त्यांच्या नेतृत्वात आहे. हेच संघटनेचे बळ आहे; परंतु हे बळ फक्त शेट्टी यांच्या विजयासाठी पुढे सरसावते. त्यांच्या शिलेदारांना मात्र यश मिळवून देत नाही, ही संघटनेच्या वाढीतील महत्त्वाची खीळ बनली आहे.
कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याची आस बाळगून स्थापन झालेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थिती सध्या फारच नाजूक आहे. या पक्षाचे जिल्हा परिषदेत सहा सदस्य आहेत. पन्हाळा नगरपालिका, पंचायत समिती, कोल्हापूर बाजार समितीत त्यांची चांगली ताकद आहे; परंतु कोरे हे या पक्षाचे काय करणार आहेत, याचेच कोडे कार्यकर्त्यांना उलगडेना झाले आहे.
एकेकाळी कोल्हापूर हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता; परंतु या पक्षाची आता पुरती पडझड झाली आहे. भोगावती कारखान्यात सात व बाजार समितीत त्यांचा एक संचालक आहे. करवीर पंचायत समितीत दोन सदस्य आहेत. विधानसभेला करवीर मतदारसंघातून शेकापच्या जागेवर राजू सूर्यवंशी जनसुराज्यच्या चिन्हावर लढले. इतर मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना पडलेली मते नामुष्कीजनक आहेत. या पक्षाची स्थिती भग्न राजवाड्यासारखी झाली आहे. एकेकाळी त्या वाड्याने ऐश्वर्य अनुभवले; परंतु आता त्या वाड्याची कोसळणारी भिताडे सावरायला कुणीही नाही. जे आहेत त्यांनी एककाळ गाजविला; परंतु त्यांना अजूनही सत्ता सोडवत नाही. बाबासाहेब देवकर यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला पक्षाने कधीतरी संधी दिली पाहिजे; परंतु तसे घडताना दिसत नाही. आर्थिक चणचण आहे. कार्यकर्त्यांची वानवा आहे आणि पक्षीय निवडणुकीचा रंगढंग बदलला असल्यामुळे हे पक्ष त्यात मागे पडत आहेत.
‘शेकाप’सारखीच स्थिती जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट पक्षांची आहे. शेकापला जेवढा कोल्हापूरच्या राजकारणात जनाधार मिळाला, तेवढा या पक्षांना कधीच मिळाला नाही. जनता दलाची काही काळ हवा होती; परंतु आता या पक्षात काम कोण करते व ते काय काम करतात, हेच लोकांना समजत नाही, अशी स्थिती आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर भाकपमध्येही सगळेच आलबेल आहे. नेते चार आणि दिशा सोळा, अशी सगळी स्थिती आहे. माकपचे अस्तित्व कोल्हापूरपेक्षा इचलकरंजीत जास्त होते. कोल्हापूर शहराने पानसरे यांना आमदार केले नाही; परंतु इचलकरंजीने के. एल. मलाबादे यांच्यासारख्या लढाऊ नेत्याला एकदा आमदार केले; परंतु तिथेही हा पक्ष आता अस्तित्वासाठी झगडत आहे. मनसे, आप हे पक्ष छोटी-मोठी आंदोलने करून अस्तित्वाचा दाखला देत असतात. रिपब्लिकन पक्षाला मानणाराही मोठा वर्ग आहे; परंतु हा पक्ष इतक्या गटबाजीमध्ये व राहुट्यांमध्ये अडकला आहे की त्याची दखल समाजाला घ्यावीशी वाटत नाही.
ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंद पानसरे असोत, प्रा. एन. डी. पाटील, संपतराव पवार असोत की खासदार राजू शेट्टी. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारी ही माणसे; पण या माणसांनी दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला वाव दिला पाहिजे व त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या विचारांची थोडी तरी शिदोरी घेऊन समाजासाठी काम करणारी फळी तयार केली पाहिजे; परंतु तसे होताना आता दिसत नाही. पानसरे यांच्या निधनानंतर ही उणीव खूप प्रकर्षाने भासली. ही जेवढी या नेत्यांची जबाबदारी आहे, तेवढीच ती समाजाचीही आहे. एक राजू शेट्टी इतक्या जणांना वठणीवर आणू शकतो, तर असे दहा शेट्टी उभे राहिले तर त्यातून समाजाचे भलेच होईल; परंतु दुर्दैव असे की, तसे घडताना दिसत नाही. या पक्षांच्या पीछेहाटीमागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. काहींनी नेहमीच सत्तेची ऊब घ्यायची आणि इतरांनी नुसतेच समाजकारण करीत मोर्चे काढायचे, अशी विभागणी एकूण विकासाला मारक ठरणारी आहे.

जनसुराज्य पक्षात सध्या संघटनात्मक बांधणी नाही, कार्यकर्त्यांना कार्यक्रम नाही, नवे काही घडत नाही. जे घडते आहे, ते कोरे यांच्या बदनामीत भरच घालणारे आहे. त्यामुळे सावकर पक्ष चालविणार की गुंडाळून ते स्वत:च भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा अधूनमधून चालते.
भाजपलाही त्यांच्यासारखा काहीतरी व्हिजन असलेला नेता हवाच आहे. कोरे यांच्या नेतृत्वाखालील संस्था सध्या आर्थिक अडचणीतून जात आहेत. अशा स्थितीत त्यांना फार काळ सत्ताधाऱ्यांच्या आधाराशिवाय लांब राहणे अवघड आहे.

पक्षाची स्थिती नाजुक असतानाही कोरे स्वतंत्र्य अस्तीत्वाची धडपड करीत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांना भाजपची आॅफर असताना ती धुडकावून त्यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले.


विश्वास पाटील

Web Title: Place for the movement of other parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.