बिगरशेती रद्दचा प्रशासनाचाही नकार
By admin | Published: June 1, 2014 01:28 AM2014-06-01T01:28:22+5:302014-06-01T01:30:01+5:30
‘आयआरबी’ला दिलेली जागा : कृती समिती गप्पच
कोल्हापूर : ‘आयआरबी’ला देण्यात आलेल्या टेंबलाईवाडी येथील जागेचा बिगरशेती दाखला चुकीच्या पद्धतीने तसेच खोट्या माहितीच्या आधारे देण्यात आल्याचे टोलविरोधी कृती समितीने कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने तक्रार करणारे हितसंबंधी पक्षकार नाहीत, असे कारण देत बिगरशेती दाखला रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही आता आयआरबीच्या प्रभावाखाली काम करीत असल्याचे यावरून अधोरेखीत झाले. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी महिन्यापूर्वीच हा निकाल दिला असताना कृती समितीने तातडीने प्रतिक्रिया का दिली नाही, असा सवाल कृती समितीमधील काही सहकारी उपस्थित करीत आहेत. आरआरबी कंपनीने केलेला करार चुकीचा आहे, टेंबलाईवाडी येथे दिलेली जागा कशी चुकीच्या पद्धतीने दिली, या जागेचा बिगरशेती दाखला कसा खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिला, याचा पर्दाफाश सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने वेळोवेळी केला. टेंबलाईवाडी जागेचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने कसे उठविले, याची सर्व माहिती समाजासमोर आणली होती. तरीही महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन आयआरबीला पाठीशी घालत असल्याचे कोल्हापूरकरांनी पाहिले. टेंबलाईवाडी येथील जागेवर असणारे टिंबर मार्केटचे आरक्षण उठवून आणि तेथील नाला नकाशावरून गायब करून बिगरशेती दाखला घेतला. कृती समितीने याबाबत काही कागदपत्रे मागवली होती. त्यावरून बिगरशेतीसाठी खोटी माहिती पुरविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृती समितीने जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे व माहिती देऊन बिगरशेती दाखला रद्द करावा अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी माने यांनी मागविलेल्या वस्तुनिष्ठ अहवालावरून बिगरशेतीसाठी राबविणारी प्रक्रिया चुकीची होती हे स्पष्ट झाले. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने जबाबदारी झटकली. तक्रार अर्ज करणारे हितसंबंधी पक्षकार नाहीत, असे कारण देत बिगरशेती दाखला रद्द करण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिला आहे. (प्रतिनिधी)