अभंग रामायण’ महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:09 AM2017-11-07T01:09:25+5:302017-11-07T01:09:41+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात अभ्यासक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा लेख अभंग रारायण महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज

Shri Shankar Maharaj, the author of 'Abhanga Ramayana' | अभंग रामायण’ महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज

अभंग रामायण’ महाकाव्याचे रचयिते श्री शंकर महाराज

Next

‘ श्री शंकर महाराजांनी रामकथेसाठी मुख्यत: तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित मानस या ग्रंथाचा आधार घेतला. त्यांचे अनेक अभंग तुलसीदासांच्या रामायणाचा सुरम्य अनुवाद वाटावा इतके रमणीय आहेत. या कथेच्या निमित्ताने महाराजांनी आपले जीवन आणि भक्तीविषयक तत्त्वज्ञान रेखीवपणे मांडले आहे. मंगलाचरणाचे अभंग लिहिल्यानंतर महाराजांनी एकूण 425 अभंग लिहिले आहेत. यात ते मानव जन्माचे रहस्य उलगडवून दाखवतात, शिकवण देतात. संतांचे गुणवर्णन करताना त्यांची लेखणी कमलिनीप्रमाणे प्रफुल्लित होते तर असताना झोडपून काढताना कमालीची क्रुद्ध होते, गरजते. या 425 अभंगांमधून महाराजांनी भावभक्तीचा आग्रह धरला आहे. या अभंगांमधून संत महिमा, असंत निंदा, शुद्ध भगवद्भक्ती, आचारधर्मावर भर, गीतेचे तत्त्वज्ञान, ज्ञान, कर्म आणि भक्तीयोग, मनाची स्थिती, मातृपितृ सेवा, देव व भक्त संबंध, प्रभुगुण स्तवन, पतिव्रता स्त्री लक्षण, देहाची नश्वरता, आत्म्याचे अमरत्त्व अशा नानाविध विषयांची चर्चा सविस्तारपणे केलेली आढळते. बालकांडाचा भाग या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे आणि ते म्हणजे अंत:साक्ष्यसाठी या विवेचनाचा फार मोठा भाग उपयोगाचा आहे. ‘अभंग रामायण’ या ग्रंथासोबतच महाराजांनी लिहिलेल्या ‘हरिपाठाचे अभंग’, ‘शुद्धात्म ज्ञानबोध’ याशिवाय ‘गीता महात्म्य’ या अपूर्ण काव्यग्रंथाचा समावेश होतो. रामायणाची सुरुवात 425 अभंगांनंतर सुरू होते. रामनाम महात्म्यामुळे गणपती हे वंदनेचे पहिले मानकरी ठरतात, असे सांगितले आहे. रामकथा आई आहे. तीच बापमाय. ती कामधेनू आहे. रामकथेमुळे यमदुतांच्या मुखांना शाई फासली जाईल. रामकथा दु:खमुक्तीचे अमोघ साधन आहे. रामकथा अमृत सरीता आहे. मंदाकिनी आहे. भक्तांच्या जनमानसात राम परमहंस आहे. कुमार्ग, कलह, कपट, वितंडा, अनीती, पाखंड यास जाळण्यासाठी एकमात्र सुगम साधन आहे रामनाम. रामकथा ऐकण्यासाठी साक्षात् जगदंबा शिवाला वंदन करते. तीच कथा महाराज अभंग रूपाने लिहिताहेत. रामाचे गुण अनंत आणि कथाही अनंत. अभंग रामायणातही रामचरित मानसप्रमाणे चार वक्ते आणि चार श्रोते आहेत. बालकांड नव्या अर्थाच्या दृष्टीने आश्चर्यकारक, परिवर्तित असे कांड आहे. रामजन्माप्रमाणे रावणाच्या जन्माचीही नोंद महाराज घेतात. तुलसीदासांनी न वर्णवलेल्या अनेक कथा शंकर महाराजांनी मांडलेल्या आहेत. यातून त्यांच्या प्रत्युत्पन्न मतीचा साक्षात्कार होतो. अयोध्याकांडाचा आरंभ शंकर महाराज तुलसीदासांप्रमाणेच करतात. निषादराज गृह शंकर महाराजांच्या कथेत अयोध्याकांडात न भेटता लंकाकांडाच्या अखेरीस येतो. तुलसी रामायणात येणारा तापस मात्र अभंग रामायणात येतो. दोघांच्या अयोध्याकांडाची समाप्ती भरतभक्तीमहात्म्य वर्णनासोबत होते. अरण्यकांडात शबरीची महत्त्वाची कथा येते. शंकर महाराजांची शबरी आपल्या कुळात प्रभुने जन्म घ्यावा, अशी इच्छा प्रकट करते. किष्किधाकांडात कथाप्रसंगाच्या दृष्टीने नाविन्य वा मतांतराचा भाग नाही. सुंदरकांडात हनुमंताची कथा अधिक नाटय़मयरीत्या येते. कथेच्या नाविन्याच्या दृष्टीने लंकाकांड विशेष महत्त्वाचे आहे. पाताळात वसणा:या अहिरावण महिरावण या राक्षस भावंडांची कथा अभंग रामायणात येते. यात अहिरावण महिरावण यांची जन्मकथा, तपाची हकीकत, मकरध्वज प्रसंग, महिरावणाची प}ी चंद्रसेनेचे रामावर लुब्ध होणे यासारखे कथाप्रसंग 100 अभंगांमधून चित्रित करण्यात आले आहेत. लंकाकांडातील युद्धवर्णनात शंकर महाराजांनी अनेक नवनवे संदर्भ आणि घटनांच्या क्रमात फेरबदल केलेले आहेत. उत्तरकांडात मात्र कथादृष्टय़ा कुठलाही बदल नाही. ‘अभंग रामायण’ अशाप्रकारे महाकाव्याच्या बृहदाकारात सामावलेले काव्य आहे. यातील लंकाकांडात स्तुतीस्तोत्रांची उधळण आहे. तुलसीदासांच्या रामकथेचे इतके ठळक प्रभावबिंदू बालकांडात आढळतात की अनेक ठिकाणी तो मनोरम अनुवाद असावा असे वाटते. काही ठिकाणी शंकर महाराजांनी कथेचा विस्तार नोंदवलाय तर काही ठिकाणी धावता आढावा घेतला आहे. रामकथेचे आकर्षण भारतीय मनाला आहे. शंकर महाराजांच्या बाबतीत एक अतिशय कोवळा भावसंदर्भ यानिमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. रामजन्मातील आपल्या अवतार कार्यात शबरीला मी तुङया उदरी जन्माला येईन हे दिलेले आश्वासन महाराजांनी पूर्ण केले आणि रामकथेची भक्तीयुक्त अंजली प्रभुचरणी समर्पित केली आहे. शंकर महाराज रामकथेचे गान करताना अधिक नाटय़मयता आणतात. कमालीची संवादघन आशयाभिव्यक्ती व्यक्तवतात. शुद्ध आचारधर्माची जपणूक करतात. अप्रतिहत प्रज्ञा, मर्मज्ञ रसविचार, कथावाचकाची अप्रतिम शैली व प्रासादिक लय यामुळे हे रामायण मराठी सारस्वत दरबारातील एक अक्षय लेणे ठरेल.

Web Title: Shri Shankar Maharaj, the author of 'Abhanga Ramayana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.