सरकार वाचवायचे असेल तर राज्यकर्त्यांनो वेळीच जागे व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:44 AM2018-12-06T11:44:54+5:302018-12-06T11:49:41+5:30

रेशनदुकानदार व शिधापत्रिका धारकांचा जळगावात भव्य मोर्चा

Save the government, then wake up at the rulers | सरकार वाचवायचे असेल तर राज्यकर्त्यांनो वेळीच जागे व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांचा सरकारला इशारा

सरकार वाचवायचे असेल तर राज्यकर्त्यांनो वेळीच जागे व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांचा सरकारला इशारा

Next
ठळक मुद्देशिधापत्रिकाधारक महिलांचा संतापआमदार सुरेश भोळे यांना घेराव

जळगाव : जनतेच्या हक्काचे स्वस्त धान्य त्यांना न देता अनुदान स्वरुपात पैसे देऊन घरात व्यसने वाढविण्यासह घरातील चुली विझविण्याचे काम सरकार करीत असून कुपोषण वाढविण्याचा विडा सरकारने उचलला आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असून आपले सरकार वाचवायचे असेल तर वेळीच जागे व्हा, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा ‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी जळगावात राज्य सरकारला दिला.
स्वस्त धान्य शिधापत्रिका धारकांना थेट अनुदान न देता धान्यच मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन’ व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आवाहनानुसार बुधवारी जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावचीने स्वस्त धान्य दुकानदार व शिधपत्रिका धारकांचा महाधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चापूर्वी शिवतीर्थ मैदानावर झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते.
या वेळी मंचावर मोदी यांच्यासह फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव विश्वंभर बसू, राज्य संघटनेचे अध्यक्ष डी.एन. पाटील, कार्याध्यक्ष तथा रेशन बचाव कृती समितीचे प्रतिनिधी चंद्रकांत यादव (कोल्हापूर), उपाध्यक्ष राजेश अंबूसकर, भागवत पाटील, आर.एस. अंबूसकर, जळगाव जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटिया यांच्यासह तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक जमनादास भाटिया यांनी केले. यात त्यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतील थेट अनुदान योजनेवर (डीबीटी) टीका करीत केवळ निवडणुका होईपर्यंत पैसे जमा होतील, नंतर काय, असा सवाल उपस्थित केला.
कुत्र्यालाही पैसे नको असतात, जनता कसे स्वीकारेल?
एखाद्या कुत्र्यासमोर एका बाजूला अन्न व दुसऱ्या बाजूला पैसे ठेवले तर कुत्रा अन्न खाईल, पैशाकडे पाहणारही नाही. कुत्रा पैसे पाहत नाही आणि हे सरकार जनतेला अन्न नाकारून पैसे देऊ पाहत आहे, अशा शब्दात प्रल्हाद मोदी यांनी या योजनेची तुलना केली. यातून जनतेत प्रचंड आक्रोश आहे. चुकीच्या धोरणामुळे यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांना आपले सरकार गमवावे लागले आहे, त्यामुळे ‘रेशन दुकानदार व शिधापत्रिका धारकांना वेठीस धरून फडणवीस, तुम्हाला पुन्हा सरकार स्थापन करता येणार नाही, असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद ्रमोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी दिला.
प्रत्येक ठिकाणी भाजपा अयशस्वी
थेट अनुदान योजना हे केंद्र सरकारचे धोरण नाही तर राज्य सरकारची ही नीती आहे. या पूर्वी पॉण्डेचेरी, झारखंड येथेही असे प्रयोग झाले, मात्र तेथील सरकारला नंतर ते निर्णय बदलावे लागले. असे सांगत प्रत्येक ठिकाणी भाजपा अपयशी ठरत आहे, अशी जोरदार टीका मोदी यांनी भाजपा सरकारवर केली. इतकेच नव्हे आपण केलेल्या कामावरच भाजपा सरकारचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे, असेही मोदी म्हणाले.
इंग्रज, काँग्रेसनंतर आता पुन्हा भाजपाकडून गुलाम बनविण्याचा उद्योग
या पूर्वी इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले असे सांगत मोदी यांनी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारवरही टीका करीत जनतेला त्यांनी गुलाम बनविले होते व आता पुन्हा भाजपा सरकार वेगवेगळ््या योजना लादून जनतेला मूर्ख बनवित आहे व गुलाम बनवून ठेवण्यचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका मोदी यांनी केली. यूपीए सरकारनेही अशाच प्रकारे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये डीबीटी योजना आणण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा प्रयत्न रोखला होता. आता पुन्हा फडणवीस सरकार ही योजना आणू पाहत आहे, असेही मोदी म्हणाले.
कुपोषण वाढविण्याचा प्रकार
केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरणाच्या नावावर सुरू असलेल्या कारभारावर मोदी यांनी टीका करीत स्वस्त धान्याचा निधी थेट महिलांच्या खात्यावर जमा केला तरी काही मद्यपी पती त्या पैशातून मद्यपान करतील व घरात धान्य येणार नाही. यातून कुपोषण वाढीस लागेल, असेही मोदी म्हणाले. आताच देशात कुपोषण जास्त असताना सरकारकडून हे प्रमाण कमी दाखविले जात आहे, अशी टीकाही प्रल्हाद मोदी यांनी केली.
सरकारच्या धोरणाने रेशन दुकानदार व ग्राहकांना एकत्र आणले
रेशन दुकानदार व शिधापत्रिका धारक यांच्यात नेहमी वैर असते, ग्राहक नेहमी दुकानदारांच्या नावाने ओरडत असतात, ते कधीच एकत्र आले नाही. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे दोघे एकत्र आल्याचा आनंद असल्याचे मोदी म्हणाले.
अन्न-धान्याने स्वावलंबी असताना नकार
आज सरकार रेशन दुकानदारांना जेवढे कमीशन देत आहे त्यापेक्षा पगार दिला तर करोडो रुपये सरकारचे वाचतील, असा हिशेब मोदी यांनी मांडला. मात्र सरकारच्या नियमीमध्ये खोट असल्याने ते कोणाचेच हीत जोपासत नसल्याची टीका मोदी यांनी केली. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावरही मोदी यांनी टीका केली.
उपस्थित पदाधिकाºयांनीही या वेळी मनोगत व्यक्त करीत सरकारवर जोरदार टीका केली.
शिवतीर्थ मैदान फुल्ल
मोर्चा सुरू होण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यास जिल्हाभरातील पाच हजारावर नागरिक सहभागी झाले होते. सकाळी १० वाजेपासून येथे शिधापत्रिका धारकांचा ओघ सुरू झाला होता. दुपारी एक वाजेपर्यंत वाहने भरून नागरिक येथे दाखल होत होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
घोषणांनी दणाणला परिसर
मेळाव्यास्थळी उपस्थितांनी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. सोबतच मोर्चात विविध घोषवाक्य असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.
रणशिंग फुंकले
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर शिवतीर्थ मैदानापासून मोर्चास सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मोर्चात सर्वात पुढे प्रल्हाद मोदी व पदाधिकारी होते. त्यामागे महिला व सर्वात मागे पुरुष अशा शिस्तबद्ध रित्या हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे पोलिसांनी मोर्चा रोखला.
मोदींना पायºया चढता न आल्याने अधिकारी आले खाली
मोर्चेकरांना बाहेर रोखल्यानंतर प्रल्हाद मोदी यांच्यासह पदाधिकारी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यासाठी गेले. तेथे अप्पल जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या दालनात जाताना प्रल्हाद मोदी यांना पायºया चढता येत नसल्याने गोरक्ष गाडीलकर हे खाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या दालनात आले व तेथे गाडीलकर यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी निवेदन स्वीकारले.
जिल्हाधिकारी नसल्याने नाराजी
मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे हजर नव्हते. एवढा गंभीर विषय असताना व यापूर्वीच कळविले असताना जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याबद्दल मोर्चेकरांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी समिती येणार असल्याने जिल्हाधिकारी निंबाळकर तेथे गेले असल्याचे सांगण्यात आले.
आमदार सुरेश भोळे यांना घेराव
सकाळी मेळावा सुरू होण्यापूर्वी आमदार सुरेश भोळे यांनी मेळावास्थळी भेट देऊन या मोर्चास पाठिंबा असून मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. त्यानंतर ते व्यासपीठाच्या खाली उतरताच त्यांना महिलांनी घेराव घातला व धान्य मिळत नसल्याचा पाढा वाचला. धान्य मिळालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी आमदार भोळे यांच्याकडे धरला.
शिधापत्रिकाधारक महिलांचा संताप
मेळाव्यास उपस्थित शिधापत्रिकाधारक महिलांनी मंडपामध्ये उभे राहत धान्य का मिळत नाही, असा सवाल करीत संताप व्यक्त केला. त्यावेळी काहीसा गोंधळ होत असल्याचे स्थिती असताना पदाधिकाºयांनी महिलांची समजूत काढत तुमच्या-आमच्या मागण्यांसाठी एकत्र आलो असल्याचे सांगितले.
११ वाजेचा मोर्चा निघाला दोन वाजता
मोर्चाची वेळ सकाळी ११ वाजेची दिलेली होती. मात्र मान्यवरांचे उशिरा आगमन, त्यानंतर मेळावा, त्यात भाषणे होऊन मोर्चा तब्बल २ वाजता सुरूझाला.
आमदार सतीश पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका
आमदार सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येऊन या मोर्चास व मागणीस पाठिंबा असल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुभकर्णी सरकारला उठवायची भाषा केली, मात्र असे सांगण्यापेक्षा तुम्हीच सरकारच्या बाहेर का पडत नाही, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सरकारच्या प्रत्येक धोरणांवरही नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: Save the government, then wake up at the rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.