रात्रभर झालेल्या दमदार पावसाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:00 AM2019-07-21T11:00:42+5:302019-07-21T11:01:27+5:30
११ दिवसांनंतर हजेरी
जळगाव : गेल्या ११ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्री दमदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वच जण सुखावले आहेत.
यंदा वरुणराजाने जून महिन्यात काहीशी दमदार हजेरी लावली असली, तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पूर्णत: दडी मारली होती. विशेष म्हणजे ऐन पावसाळ््यात आठ ते दहा दिवसापासून मे हिट सारखे कडक ऊन पडत होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवारी सकाळपासून अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सायंकाळी सातनंतर वातावरणात अचानक बदल होऊन, जोराने वारे वाहत होते.
विजादेखील चमकत होत्या. त्यानंतर रात्री ठीक साडेदहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा वेग कमी होऊन, काहीवेळ रिमझिम सुरु होती. मात्र मध्यरात्री एक वाजेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रभर पाऊस सुरुच होता. दरम्यान, नेहमी प्रमाणे शहरातील विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.