भाजपमध्ये ‘नवा भिडू -नवा राज ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 06:24 PM2019-06-17T18:24:12+5:302019-06-17T18:26:50+5:30

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळात न झालेला समावेश आणि त्यांनी लगेच केलेली बोचरी टीका लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी खान्देशातील नेतृत्वातील बदलावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. तसे तीन वर्षांपासून हळूहळू सत्तेचा केंद्रबिंदू सरकत होता. पण इतक्या झपाट्याने असे होईल, याची अपेक्षा नव्हती. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या दमदार पुनरागमनानंतर अडवाणी-जोशी, सुमित्रा महाजन यांचा न्याय लावत खडसे यांना ‘ज्येष्ठ नेत्यां’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्रिकुटाला तिकीट दिले नाही तर खडसेंना मंत्रिपदापासून वंचित ठेवले.

BJP's 'new Bhadu-Nava Raj' | भाजपमध्ये ‘नवा भिडू -नवा राज ’

भाजपमध्ये ‘नवा भिडू -नवा राज ’

Next
ठळक मुद्देएकनाथराव खडसे यांच्या नाराजीकडे पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष ; अडवाणी-जोशींच्या न्यायाने ज्येष्ठतेवर शिक्कामोर्तबखान्देशातील नेतृत्वाची कूस बदलली ; गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांच्याकडे पक्षीय नेतृत्वाची धुरा




मिलिंद कुलकर्णी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर महाराष्टÑातील तिकीट वाटप खडसे यांनी केले होते. आता याच भूमिकेत गिरीश महाजन आले आहेत. यशोशिखर निसरडे असते आणि त्यावर दावा करणारे अनेक असतात, ते लगेच जागा भरुन काढतात असे जे चिंतनसूत्र आहे, त्याचा प्रत्यय अशावेळी येतो. भाजप आता अधिक तरुण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची टीम आता निवडली आहे, त्या टीमसोबत ते विश्वासाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
भाजपमधील नेतृत्वाने कूस बदलली आहे. एकनाथराव खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन हे आता खान्देशचे एकमुखी नेतृत्व झाले आहे. खडसे वगळता त्यांना आता कोणीही प्रमुख प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. खडसे यांच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याने आता महाजन यांची ‘बुलेट ट्रेन’ अधिक सुसाट धावेल, असे म्हणता येईल.
खान्देशाला सक्षम, सबळ नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. नंदुरबारमध्ये सुरुपसिंग नाईक, धुळ्यात रोहिदास पाटील, अमरीषभाई पटेल, जळगावात मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, प्रतिभाताई पाटील, के.एम.बापू पाटील, सुरेशदादा जैन, ईश्वरलाल जैन या मूळ काँग्रेसी विचारसरणीच्या मंडळींचा मोठा दबदबा होता. अनेक वर्षे या नेत्यांनी मंत्रिमंडळ आणि पक्षसंघटनेत ठसा उमटविला.
काँग्रेस पक्षाची अनेकदा शकले उडाली. नेते विखुरले. कधी पुन्हा एकत्र आले तर कधी पुन्हा स्वतंत्र झाले. पक्षाची ताकद कमी झाली आणि नेत्यांना हेवेदावे भोवले. त्याच काळात एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व भाजपमध्ये उदयास आले. संघटनकौशल्य, फर्डे वक्ते, अभ्यासू वृत्ती, विधिमंडळाच्या आयुधांची जाण आणि प्रशासकीय यंत्रणेवरील पकड या गुणांमुळे खडसे यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेले सख्य, भाजपने बहुजन नेतृत्वाला दिलेली संधी यातून खडसेंची दमदार वाटचाल सुरु झाली. युती सरकारच्या पहिल्या काळात वजनदार खाती त्यांच्याकडे होती. २००९ ते १४ या काळात विरोधी पक्षनेतेपद आल्याने खडसे हे महाराष्टÑ पातळीवरील नेते बनले.
नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये पारंपरिक राजकारणाऐवजी रणनीतीवर भर देण्यात सुरुवात झाली. ‘नवा भिडू-नवा राज’ हे तत्त्व चलनात आले आणि खडसे यांचे ज्येष्ठत्व डावलत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले. महसूल, कृषीसारखी १२ खाती देऊनही खडसे हे समाधानी नव्हते. पंढरपूर असो की, मुक्ताईनगर ते नाराजी बोलून दाखवत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने खडसे यांचा मोठा पाठीराखा हरपला. सत्तासुंदरीपुढे भल्याभल्यांची मती फिरते असे म्हणतात. तसा अनुभव खडसे यांना आला. ज्यांना आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी केले, त्यांनी संकटकाळात समर्थन करण्याऐवजी पाठ फिरवली आणि खडसे एकाकी पडू लागले. पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांना बळ दिले आणि महाजन यांनीही कौशल्याने पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले. तरुण नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधून उत्तर महाराष्टÑाचे नेते म्हणून स्वत:ला सिध्द करुन दाखविल्याने महाजन यांनी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास संपादन केला.

Web Title: BJP's 'new Bhadu-Nava Raj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.