खान्देशात भाजपा-सेना युतीची वाट खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:56 PM2018-06-11T22:56:07+5:302018-06-11T22:56:07+5:30

भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शाह व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीनंतर युती आणि स्वबळ यासंबंधी दोन्ही पक्षांमधून विसंगत विधाने येत आहे. राज्याप्रमाणे खान्देशातही युतीची वाट खडतर राहणार आहे.

BJP-Shiv Sena alliance in Khandesh | खान्देशात भाजपा-सेना युतीची वाट खडतर

खान्देशात भाजपा-सेना युतीची वाट खडतर

Next

बेरीज वजाबाकी
गुजराथमधील सौम्य आणि कर्नाटकमधील जोरदार धक्क्यानंतर भाजपा आणि मोदी-शाह यांचा रथ जमिनीवर आला आहे. पोटनिवडणुकांच्या निकालाने विरोधकांच्या ऐक्यावर शिक्कामोर्तब झाल्याने भाजपाने ‘शतप्रतिशत’चा नारा गुंडाळून ठेवत पुन्हा ‘राष्टÑीय लोकशाही आघाडी’चे सूर आळवायला सुरुवात केली आहे. शाह-ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ भेटीतील निर्णय यथावकाश समोर येणार असले तरी २०१४ पूर्वी असलेल्या युतीप्रमाणे दोन्ही पक्ष भक्कमपणे मतदारांसमोर जातात काय, यावर दोन्ही पक्षांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
खान्देशचा विचार केला तर भाजपाचा प्रभाव चढत्या क्रमाने राहिला आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते आणि कार्यकर्ते यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले. डॉ.गुणवंतराव सरोदे, एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, डॉ.बी.एस.पाटील, एम.के.अण्णा पाटील, वाय.जी. महाजन, हरिभाऊ जावळे यांच्यासारखी नेतृत्वाची फळी भाजपामध्ये उभी राहिली. ‘शतप्रतिशत’चा नारा देत काँग्रेस, राष्टÑवादी आणि प्रसंगी सेनेतील प्रभावी नेत्यांना उमेदवारी देत भाजपाने पावन करून घेतले. शिवसेनेत तशी नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभी राहिलेली नाही. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून जळगावचा ठाकरे कुटुंबीयांशी संपर्क होता. प्रबोधनकार हे त्या काळातील आघाडीचे दैनिक बातमीदारमध्ये नियमित स्तंभलेखन करीत. नानासाहेब नेहेते यांच्या कुटुंबीयांशी त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध होते. जळगावचे गणेश राणा, चिंतामण जैतकर, प्रकाश जगताप, सदाशिव ढेकळे, चोपड्याचे कन्हैये बंधू, अमळनेरचे डी.एम. सुतार, भुसावळचे राजेंद्र दायमा, दिलीप भोळे, धरणगावचे गुलाबराव वाघ, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक लढवय्या कार्यकर्त्यांची फळी सेनेकडे होती. सेनेचा दबदबा असला तरी त्याचे मतात रूपांतर होत नव्हते. धरणगावचे हरिभाऊ महाजन, गुलाबराव पाटील, शिंदखेड्याचे रामकृष्ण पाटील, पाचोऱ्याचे आर.ओ. पाटील, किशोर पाटील, चोपड्याचे कैलास पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, पारोळ्याचे चिमणराव पाटील या नेत्यांनी समाजकारक व राजकारण यांचा ताळमेळ साधला. आमदार म्हणून त्यांना जनतेने संधी दिली. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना भाजपाचे १० तर सेनेचे ३ आमदार निवडून आले. सेनेचे यश खचितच प्रशंसनीय ठरले.
लोकसभेच्या खान्देशातील चार जागा युतीमध्ये भाजपाकडे राहिलेल्या आहेत. गेल्यावेळी प्रथमच नंदुरबारची जागा भाजपाने जिंकल्याने सर्व चार जागांवर कमळ फुलले. २०१९ ची लोकसभा निवडणूक सेनेने गांभीर्याने घेतली आहे. भाजपावर कठोर प्रहार करणाºया खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी सेनेने सोपवली आहे. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाने राऊत यांनी चमक दाखवली आहे. स्वत: राऊत हे दोनदा खान्देशात येऊन गेले आहेत तर त्यांचे क्षेत्रप्रमुख संजय सावंत, विलास पारकर, बबन थोरात, के.पी. नाईक यांचे नियमित दौरे सुरू आहेत. रावेरसाठी कैलास पाटील व जळगावसाठी आर.ओ.पाटील या दोन्ही माजी आमदारांनी तयारी सुरू केली आहे. नंदुरबार व धुळ्याची नावे स्पष्ट नसली तरी पक्षातील निष्ठावंत तसेच ऐनवेळी इतर पक्षातील बंडोबांना सेना संधी देऊ शकते.
सेनेची भाजपावर खप्पा मर्जी असल्याच्या अनेक कारणांमध्ये खान्देशशी संबंधित दोन कारणे आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याची घोषणा भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी केली होती. त्यामुळे खडसेंवर सेनेची नाराजी चार वर्षात कमी झालेली दिसली नाही. ठाकरे, राऊत हे नेते खडसेंविरोधात विधाने करीत असतात तर मुखपत्रात खडसेंवर टीका असते. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे मूळ सेनेचे आहेत. त्यांनी २००९ मध्ये सेनेतर्फे धुळ्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपात प्रवेश देऊन खासदार म्हणून निवडून आणले. त्या नाराजीचे परिणाम युतीवर अद्याप कायम आहेत.
१५ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचे गणित आणखी क्लिष्ट होत जाणार आहे. भाजपामध्ये जळगावात खडसे, महाजन, धुळ्यात भामरे, रावल व गोटे तर नंदुरबारमध्ये गावीत, पाडवी यांच्यावर भाजपाची धुरा राहील. सेनेत जळगावात गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत सोनवणे, तर धुळ्यात हेमंत साळुंखे, हिलाल माळी, सतीश महाले, नंदुरबारात डॉ.विक्रांत मोरे यांच्याकडे नेतृत्व राहील.
भाजपा हा ‘शतप्रतिशत’च्या मूडमध्ये असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा आमने सामने होते. नंदुरबार पालिका निवडणुकीत सेनेने काँग्रेसशी युती केली. उपनगराध्यक्षपद सेनेला मिळाले. धुळ्यात भाजपा आमदार अनिल गोटे यांच्याविरोधात सेनेचे नेते हे राष्टÑवादी, भाजपाचा दुसरा गट यांच्यासोबत आहेत. त्यामुळे नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषद निवडणूक आणि धुळे महापालिका निवडणुकीत युती होते की, पुन्हा नवीन मित्र हे दोन्ही पक्ष जोडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांची गिरीश महाजन यांच्याशी मैत्री आहे तर खडसेंचे प्राबल्य असलेल्या जिल्हा बँकेत सेनेचे आमदार किशोर पाटील हे उपाध्यक्ष आहेत. महाजन हे जिल्हा परिषदेत गुलाबराव पाटील व अन्य सेना सदस्यांना सांभाळून घेतात. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत खडसे यांना सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे मोठे आव्हान असणार आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत सेनेचे सुरेशदादा जैन आणि भाजपाचे गिरीश महाजन हे युतीसाठी इच्छुक असले तरी खडसे आणि आमदार सुरेश भोळे यांचा युतीला विरोध आहे.
या पाच निवडणुकांवर लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहील. युतीचा बालेकिल्ला असे बिरुद कायम ठेवणे हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या हाती राहणार आहे.
भाजपा-शिवसेना युतीमध्ये खान्देशात भाजपा नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. सेनेने लहान भावाची भूमिका निभावली आहे. लोकसभा मतदारसंघांवर भाजपाचा वरचष्मा तर विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर ठरावीक मतदारसंघात सेनेचा जोर आहे. २० आमदारांपैकी ३ आमदार सेनेचे आहेत. सत्तेचे राजकारण, मतदारसंघातील समीकरण लक्षात घेऊन या आमदारांनी भाजपाच्या नेत्यांशी जुळवून घेतले आहे तर काही ठिकाणी उभा दावा मांडला आहे. सहा महिन्यात होणाºया पाच स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या भूमिकेवर युतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
मैत्री आणि वैर
गेल्या वर्षी झालेल्या नंदुरबार पालिका निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसशी युती केली होती. धुळ्यात भाजपा आमदार अनिल गोटे यांच्याविरोधातील आघाडीत सेनेचे नेते राष्टÑवादीसोबत आहेत. जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद आमदार किशोर पाटील यांना देताना खडसे यांनी सेनेपेक्षा मैत्रीसंबंध आणि राजकीय समीकरण पाहिले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची ‘युती’ पलीकडे मैत्री आहे.
स्वबळाचा नारा देत सेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. धुळे व नंदुरबार मतदारसंघातील इच्छुकांची नावे समोर आली नसली तरी रावेर व जळगाव मतदारसंघासाठी अनुक्रमे माजी आमदार कैलास पाटील, आर.ओ.पाटील यांनी तयारीला सुरुवात केली आहे. जळगाव, धुळे महापालिका, धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद आणि मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या भूमिकेवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत.
मिलिंद कुलकर्णी

Web Title: BJP-Shiv Sena alliance in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.