इच्छुक उमेदवारांचे देव अद्याप पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:23 PM2019-03-18T15:23:59+5:302019-03-18T15:31:01+5:30

नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. विक्रमी खासदार म्हणून नोंद असलेल्या माणिकराव गावीत यांनी वारसदारासाठी प्रयत्न चालविले आहे. पूत्र भरत यांच्यासाठी ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. आमदार के.सी.पाडवी आणि माजी आमदार पद्माकर वळवीदेखील प्रयत्नशील आहेत. रावेर मतदारसंघाची जागा राष्टÑवादीने अद्याप काँग्रेसकडे सोपवलेली नाही. त्यामुळे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.

Are the efforts of Manikrao's successor to Delhi to get rid of this issue of seniority and integrity? | इच्छुक उमेदवारांचे देव अद्याप पाण्यात

इच्छुक उमेदवारांचे देव अद्याप पाण्यात

Next
ठळक मुद्दे ज्येष्ठत्व, निष्ठा या मुद्यावरुन माणिकरावांचे दिल्लीत वारसदारासाठी प्रयत्न फळाला जातात काय? जळगावच्या उमेदवाराचा शोध संपणार कधी? रावेरच्या जागेवरील दावा सोडण्यात राष्टÑवादीकडून विलंब कशासाठी?

मिलिंद कुलकणी
लोकसभा निवडणुकीचा हा टप्पा म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याच्या काळाची आठवण करुन देतो. तीच धाकधूक, तीच उत्कंठा, तीच काळजी इच्छुक उमेदवारांना आहे. मुंबई आणि दिल्लीतील दरबारी राजकारण काही वेगळेच असते. भल्या भल्यांना तिथला अंदाज येत नाही. लॉबिंग नावाचा प्रकार ज्याला जमला तो यशस्वी ठरतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. जाहीर झालेले तिकीट अचानक कापले जाणे, खात्री असतानाही तिकीट न मिळणे, अचानक कोणता तरी मुद्दा चर्चेत येऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाणे हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. राजकीय जीवन घडणे आणि बिघडण्याच्यादृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा असतो. गॉडफादरचे महत्त्व याच टप्प्यावर कळते.
निवडणुका जाहीर झाल्या. युती आणि आघाडी झाली. परंतु, जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाही. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या जागावाटपाला काही अडचण दिसत नाही. परंतु, रावेरचे त्रांगडे कायम आहे. नगर, रत्नागिरी, औरंगाबाद, यवतमाळ या जागांच्या निर्णयावर रावेरचा निर्णय अवलंबून असल्याची चर्चा रंगत होती. जळगावमध्ये राष्टÑवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीनेही चार पैकी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. ते वगळता कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाही. विद्यमान खासदारदेखील ठामपणे तिकिटाविषयी बोलताना दिसून येत नाही. प्रचार सगळे करतायत, पण डोळे आणि कान मात्र मुंबई आणि दिल्लीकडे लागलेले आहेत.
जळगाव मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीचे गूढ वाढत चालले आहे. दोन टर्म खासदार असलेल्या ए.टी.पाटील यांच्याविषयी ऐन निवडणूक काळात वाद उद्भवला जातो आणि त्यांची उमेदवारी धोक्यात आणली जाते, यावरुन राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर जात आहे, हे लक्षात येते. देवकरांची उमेदवारी जाहीर करुन राष्टÑवादी काँग्रेसने ए.टी.पाटील यांची घरवापसीची शक्यता संपवून टाकली. भाजपाकडून उमेदवारीसाठी रोज नवीन नाव चर्चेत येते. परंतु, एकटे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाच खरे तर उमेदवाराचे नाव निश्चित ठावूक असेल. पण त्यांनी रहस्य कायम ठेवण्याचे ठरविलेले दिसतेय. यावरुन दोन शक्यता संभवतात. निवडणूक तंत्र पूरेपूर अवगत असलेल्या महाजन यांना जळगावच्या जागेची हमखास खात्री वाटत असावी किंवा अलिकडच्या वादाचा मतदारांवर पडलेल्या प्रभावाचा अंदाज तरी ते घेत असावे. त्यासाठी हा काळ जाऊ देणे ते आवश्यक समजत असावे. मात्र त्यामुळे डझनभर उमेदवार इच्छुकांच्या पंक्तीत येऊन बसले आहेत. ऐन दुष्काळात इच्छुकांचे ‘देव’ पाण्यात राहणार हे मात्र निश्चित.
धुळे मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, दोन दिवसांपासून त्यांच्या वयाचा मुद्दा चर्चेत आला असून त्यांच्याऐवजी पूत्र आमदार कुणाल पाटील यांचे नाव अचानक पुढे आले आहे. मालेगावचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे हे देखील चर्चेत आहेत. एकीकडे माणिकरावांना वयाचा मुद्दा घेऊन तिकीट दिले जात नसेल तर पक्षश्रेष्ठी रोहिदासदाजींविषयी तो नियम लावत आहेत, असे दिसते. माणिकरावांनी पूत्र भरत बरोबरच नातीचेही नाव पुढे केल्याची चर्चा आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या कन्येसाठी हा प्रयत्न आहे.

Web Title: Are the efforts of Manikrao's successor to Delhi to get rid of this issue of seniority and integrity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.