‘आमदारकी’साठी युतीमध्येच चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:04 PM2019-06-23T13:04:21+5:302019-06-23T13:05:17+5:30

‘आमचं ठरलंय’ म्हणत असले तरी तिढा सोडविताना होणार दमछाक; मात्र तुटण्याइतके ताणले जाणार नाही, काँग्रेस-राष्टÑवादीकडे इच्छुक आहेत; परंतु पक्षश्रेष्ठींची निवडपध्दती आणि पाठबळावर समीकरण अवलंबून

In the alliance for 'MLA' | ‘आमदारकी’साठी युतीमध्येच चुरस

‘आमदारकी’साठी युतीमध्येच चुरस

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भाजपा-शिवसेना युती जोमात आहे. परस्परांवर टीकेची झोड उठविण्याची एकही संधी न सोडणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आता गळ्यात गळा घालून फिरताना दिसत आहे. नाराजी असली तरी ती उघडपणे बोलणे टाळले जात आहे. लोकसभा निवडणुकीत कोणी कुणाचं काम केलं हे जगजाहीर असताना ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ ठेवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. वातावरण चांगले असल्याने युतीचे नेते प्रयोग करण्याची दाट शक्यता असल्याने विद्यमान आमदारांना धाकधूक आहेच.
उत्तर महाराष्टÑातील ८ जागा जिंकून भाजप-सेनेचे एकमुखी नेतृत्व हाती घेतलेल्या गिरीश महाजन यांच्याकडेच विधानसभा निवडणुकीची धुरा असेल हे निश्चित झालेले आहे. महाजन यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता, भाजपसोबतच सेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेनेचे दोन्ही मंत्री गुलाबराव पाटील व दादा भुसे यांच्याशी महाजन यांचा स्रेह आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अडचण येणार नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने भाजप-शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. सेनेच्या पारंपरिक जागांवर भाजपने विजय मिळविला होता. उदाहरणार्थ जळगाव, धुळे, भुसावळ याठिकाणी भाजप प्रथमच लढला आणि विजयी झाला. सेनेला असे यश मिळाले नाही. भाजपने तब्बल १० जागा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात जिंकल्या. काँग्रेसने ५ तर राष्टÑवादीने एक जागा जिंकली. सेनेला तीन जागा मिळाल्या तर अमळनेरला अपक्ष उमेदवार विजयी झाला.
युतीमधील मोठ्या भावाची भूमिका भाजपने स्वीकारल्याने आता युतीमध्ये ताणतणाव राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील ११ जागांपैकी ६ जागा भाजपने जिंकल्या तर सेनेने ३ जागा जिंकल्या आहेत. जागावाटपात त्या तशाच राहतील. पाचोरा, चोपडा आणि जळगाव ग्रामीणमध्ये आताही भाजपकडे समर्थ उमेदवार नाही. पारोळ्याची जागा पारंपरिकपणे सेनेकडे आहे. चिमणराव पाटील, डॉ.हर्षल माने हे तुल्यबळ उमेदवार सेनेकडे आहेत, तसे भाजपकडे नगराध्यक्ष करण पवार, मच्छिंद्र पाटील हे सक्षम उमेदवार आहेत. अमळनेरात अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले असल्याने त्यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ राहील. मात्र माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार स्मिता वाघ या स्पर्धेत आहेच.
धुळे शहर वगळता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सेनेचा फार वरचष्मा नाही. धुळ्यात गेल्यावेळी भाजपने अनिल गोटे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघावर कब्जा मिळविला. आता त्यांच्याकडे डझनाहून अधिक इच्छुक आहेत. सेनेत प्रा.शरद पाटील, सतीश महाले यांच्यासह अर्धा डझन नेते इच्छुक आहेत. शिरपूर, साक्री, धुळे ग्रामीण, धडगाव, नवापूर हे काँग्रेसचे मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. राष्टÑवादीचे आव्हान फारसे नाहीच. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस अशीच लढत राहील. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजप यंदा अधिक जोर लावेल आणि त्यासाठी मातब्बरांबरोबरच उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यांनी लढतदेखील चांगली दिली. अनपेक्षित निकालामुळे उमेदवार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. एक चांगले झाले, की पराभवाचे खापर फोडण्यासाठी आरोप-प्रत्यारोप फारसे झाले नाही. तिकीट मागणाऱ्यांची संख्या कमी असेल, पण स्पर्धा नाही, असे अजिबात राहणार नाही. योग्य उमेदवाराची निवड ही युतीपुढे आव्हान ठरु शकते.

Web Title: In the alliance for 'MLA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.