कृषी पंपासाठी अडीच हजार शेतकरी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 09:32 PM2018-04-27T21:32:39+5:302018-04-27T21:32:39+5:30

Two-and-a-half thousand farmers wait for agricultural pumps | कृषी पंपासाठी अडीच हजार शेतकरी वेटींगवर

कृषी पंपासाठी अडीच हजार शेतकरी वेटींगवर

Next
ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडीक ठेवण्याची वेळ : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतीला सिंचनाची सोय झाल्यास दुबार पीक घेता येईल व कृषी पंपाच्या मदतीने उत्पादनात वाढ करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र वीज वितरण कंपनीने मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी न दिल्याने शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्ह्यातील २ हजार ७१९ शेतकरी कृषी पंपासाठी अद्यापही वेटींगवर असल्याची बाब पुढे आली आहे.
राज्य सरकारने राज्यातील कृषी पंपाचा अनुशेष भरुन काढण्याची घोषणा केली होती. कृषी पंपासाठी अर्ज केलेला एकही शेतकरी वीज जोडणीपासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुध्द चित्र आहे. जिल्ह्यातील २ हजार ७१९ शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी करुन देण्यात आली नाही. २०१८-१९ या वर्षात २ हजार ८१९ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जोडणी देण्याचे उद्दिष्टय देण्यात आले आहे.
२०१७-१८ या वर्षात २ हजार २१३ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर मागील वर्षी गोंदिया तालुक्यातील ३६८ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ४६४ शेतकरी जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. गोरेगाव तालुक्यात २७४ शेतकºयांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ४५० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. तिरोडा तालुक्यात २७० शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी करुन देण्यात आली. तर ३६० शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४६२ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ५३४ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. देवरी तालुक्यात १३४ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.
आमगाव तालुक्यात २३५ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ११० शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. सालेकसा तालुक्यात ९९ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २६४ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ३७१ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. ३२२ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात २२१३ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २७१९ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. शेतीला सिंचनाची गरज असते. मात्र आधुनिक काळातही जिल्ह्यातील शेतकºयांना निसर्गावर अवलंबून रहावे लागत आहे.
एक-एक पैसे जोडून शेतकऱ्यांनी शेतात बोअरवेल केले. परंतु बोअरवेलमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी न दिल्यामुळे ते केवळ नाममात्र ठरत आहे. शेतकऱ्यांना बोअरवेल खोदण्याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय सिंचनाअभावी दुबार पीक घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
वीज बिल वाढवून दिल्याच्या तक्रारी
विद्युत वितरण विभागाने मार्च महिन्याचे वीज बील एप्रिल महिन्यात वाटप केले त्या वीज बिलाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करुन पाठविल्याची ओरड अनेक वीज ग्राहकांची आहे. मीटरची योग्य रिडिंग घेतली जात नाही. ग्राहकांना कमी-जास्त वीज देयक पाठवून नंतर वसुलीची कारवाई करण्यासाठी ग्राहकांकडे कर्मचारी तगादा लावत असल्याची ओरड आहे.
विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष
कृषी पंपासाठी वीज बीलाचे दर अत्यल्प असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी पंपांसाठी कनेक्शन सहजासहजी दिले जात नाही. वारंवार विद्युत वितरण कंपनीच्या चकरा मारल्यानंतरही कृषी पंपासाठी विद्युत जोडणी करुन दिली जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: Two-and-a-half thousand farmers wait for agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती