ब्रिटीश शासनकाळाची साक्ष देतोय सिरोंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:15 PM2019-05-21T22:15:32+5:302019-05-21T22:15:48+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.
कौसर खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.
तत्कालीन चांदा (चंद्रपूर) जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९ हजार ३१२ चौ.किमी एवढे होते. त्यात सिरोंचा व गडचिरोली हे दोन मुख्य तालुके १८८० पर्यंत अस्तित्वात होते. १९०७ मध्ये चांदा जिल्ह्याचे चांदा, वरोडा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व सिरोंचा या पाच तालुक्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. १९५१ मध्ये औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्यात असलेला राजुरा तालुका चांदा जिल्ह्याला जोडण्यात आला. त्यानंतर चांदा जिल्ह्यात सहा तालुके निर्माण झाले. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ १९ हजार १२७ चौ.किमी होते. तर लोकसंख्या १२ लाख ३७ हजार ८० एवढी होती. विस्ताराने खूप मोठे तालुके असल्याने १९८० मध्ये या तालुक्यांचे विभाजन करून नवीन १८ तालुके निर्माण करण्यात आले. सिरोंचा तालुक्याची निर्मिती मात्र १८७४ साली ब्रिटीश कालावधीतच झाली. १९०५ मध्ये अहेरी जमिनदारीतील २ हजार ६०३ चौ.मैल क्षेत्र सिरोंचा तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. ब्रिटीशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रशासनाचे मुख्य केंद्र होते. गोदावरी, प्राणहिता नदी पार केल्यानंतर पहिले मोठे गाव सिरोंचा हेच पडत असल्याने ब्रिटीशांनीही अनेक वास्तू सिरोंचात उभारून सिरोंचा शहराला आकार देण्याचा प्रयत्न केला.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सिरोंचा तालुक्याचेही विभाजन करण्यात आले. हळूहळू विकासाला गती मिळाली. सिरोंचा तालुक्याचा परिसर गोदावरीचा खोरा म्हणून ओळखल्या जाते. येथील काळ्या कसदार जमिनीत कोणतेही पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येते. शासनाने सिंचन विहीर, लहान-मोठे तलाव, बोड्यांची निर्मिती केली. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. सिरोंचा तालुका प्रामुख्याने कापूस, धान, मिरची, मका व भाजीपाला या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे नदीकाठचे शेतकरी बारमाही उत्पादन घेण्यात व्यस्त राहतात.
पुलांमुळे विकासाला उभारी येण्याची आशा
सिरोंचा तालुका गोदावरी नदीने वेढला आहे. हा तालुका जरी गडचिरोली जिल्ह्यात असला तरी येथील संस्कृती, भाषा तेलंगणा राज्याशी बरीच मिळतीजुळती आहे. गोदावरी नदी असल्याने पावसाळ्यात आवागमनास अडचण निर्माण होत होती. नावेने धोकादायक प्रवास करून तेलंगणा गाठावे लागत होते. आता मात्र गोदावरी, प्राणहिता नद्यांवर पुलांचे बांधकाम केले जात आहे. सिरोंचाजवळील पूल बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुकर झाली आहे. परिणामी तेलंगणातील नागरिकांसोबत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे व्यवहार वाढले आहेत.