‘त्यांना’ पोलिसांचे नव्हे गुन्ह्याचे भय वाटते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:13 AM2018-02-24T04:13:50+5:302018-02-24T04:13:50+5:30

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते

'They' do not fear police or crime! | ‘त्यांना’ पोलिसांचे नव्हे गुन्ह्याचे भय वाटते !

‘त्यांना’ पोलिसांचे नव्हे गुन्ह्याचे भय वाटते !

Next

एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांची मात्र सध्या याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. परवा तर येथील लूटमारीच्या आरोपातील दोन गुन्हेगार चक्क हातात एक फलक घेऊन फिरताना दिसते. त्यावर लिहिले होते, ‘भविष्यात मी कुठलाही अपराध करणार नाही. मेहनत मजुरी करून आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करेन.’ गेल्या आठवड्यात एक अट्टल चोर पोलीस चौकीत पोहोचला अन् ‘साहेब, माझ्यावर १५ हजारांचेच बक्षीस आहे मला अटक करवून घ्या’ अशी विनवणी करू लागला. यापैकी काहींनी गावकºयांसह ठाण्यात येऊन कानाला खडा लावत यापुढे गुन्हेगारी बंद अशी ग्वाही दिली. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न पडणारच. विशेष म्हणजे असे शेकडो फरार आणि बक्षीस जाहीर असलेले गुन्हेगार ‘पाऊले चालती पोलीस ठाण्याची वाट...’ असे गात स्वत: पोलीस ठाण्यांमध्ये चालत येऊ लागले आहेत. खून, दरोडे, लूटमार करण्यातच कर्तृत्व मानणाºया या गुंडांचा अचानक असा वाल्याचा वाल्मिकी कसा व्हावा? हा योगींचा प्रभाव म्हणायचा की एन्काऊंटरचे भय? माहिती अशी आहे की गेल्या ५-६ महिन्यात या राज्यातील १४२ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. २६ गुंड जामीन मिळाल्यावरही कारागृहातच थांबले. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे ७१ गुन्हेगारांनी जामिनासाठीचा बॉण्ड रद्द करून पुन्हा जेलमध्ये परतण्यातच आपली खैर मानली. या सर्वांच्या मनात एकच दहशत आहे, एन्काऊंटरमध्ये मारले जाण्याची. उत्तर प्रदेशात १९ मार्च २०१७ रोजी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून मागील नऊ महिन्यात १,२४० चकमकी घडल्या आणि त्यात ४० गुन्हेगार ठार तर ३०५ जखमी झाले. या धरपकड मोहिमेत गुन्हेगारांची १४७ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली.
राज्याच्या पोलीस विभागाने यासंदर्भातील अहवाल नुकताच जारी केला आहे. गुन्हेगारांचे आत्मसमर्पण जगजाहीर करण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातोय. योगी सरकार या मोहिमेद्वारे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरले असले तरी एन्काऊंटरच्या विक्रमामुळे मात्र वादाच्या भोवºयात अडकले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या चकमकी बनावट असल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रकरण राष्टÑीय मानवाधिकार आयोगाकडे गेले आहे. पण योगी मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसतात. बंदुकीची भाषा समजणाºयांना बंदुकीनेच उत्तर दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे मोठ्या गुन्हेगारांना कायद्याचे दळण दळत न बसता यमसदनी धाडणेच योग्य असल्याचे काही लोकांनाही आता वाटू लागले आहे. परिणामी ‘कठोर प्रशासक’ अशी आपली प्रतिमा बनविण्यास इच्छुक अनेक नेते या चकमकींची वकिली करताना दिसतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या चकमकी खरंच बनावट असतील तर एकाअर्थी कायद्याचे शासन अमान्य करण्याचा हा प्रकार आहे. गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे पण कायद्याचा. गुन्हेगारी ही प्रवृत्ती आहे. केवळ काही गुन्हेगारांना संपवून ती नियंत्रणात येणार नाही. त्याऐवजी लोकांच्या मनात कायद्याचा वचक कसा निर्माण होईल यादृष्टीने प्रयत्न होणे अधिक चांगले.
- सविता देव हरकरे

Web Title: 'They' do not fear police or crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.