इतके का मरण स्वस्त ?

By किरण अग्रवाल | Published: April 12, 2018 08:15 AM2018-04-12T08:15:26+5:302018-04-12T08:15:26+5:30

तेव्हा संवेदनशील मन हेलावून गेल्याखेरीज राहात नाही. अपयश वा त्यातून आलेले नैराश्य हे प्रत्येकालाच अस्वस्थ करते

Is so cheap to die? | इतके का मरण स्वस्त ?

इतके का मरण स्वस्त ?

Next

शरीर व तब्येत साथ देत नसल्याने बिछान्यावर पडून का होईना, जगण्याची अनेकांची धडपड एकीकडे दिसून येत असताना दुसरीकडे शुल्लक कारणांपोटी शिकली-सवरलेली तरुण मुलं गळफास लावून घेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तेव्हा संवेदनशील मन हेलावून गेल्याखेरीज राहात नाही. अपयश वा त्यातून आलेले नैराश्य हे प्रत्येकालाच अस्वस्थ करते; पण ते टाळण्यासाठी झगडा करायचा सोडून आयुष्यच संपवायचे, हा विचारच पराभूत मानसिकतेचे निदर्शक ठरावा. आजच्या तरुणपिढीत अशी मानसिकता बळावणे हे केवळ दुर्दैवी नसून, ते समाजाचेही अपयशच अधोरेखित करणारे म्हणायला हवे.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा तसा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. त्यातही तरुणांचा सहभाग होताच. पण, त्याखेरीज म्हणजे शेतीतून बिघडलेल्या अर्थ व कुटुंबकारणाव्यतिरिक्त अन्य कारणांतून ज्या आत्महत्या होतात त्यातही तरुणांचे प्रमाण मोठे दिसून येत असल्याने तरुणपिढीच्या कमकुवत मानसिकतेचा प्रश्न विदारकपणे समोर येऊन गेला आहे. अडचणी वा अपयश पचवता न येण्यातून अगर त्यातून बाहेर पडण्याची उमेदद गमावण्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते आणि उच्च विद्याविभूषित मुलेही अशी हिंमत हारताना दिसून येतात, ही यातील शोचनीय बाब आहे. नाशकातीलच या आठवड्यातली उदाहरणे घ्या, चंदनपुरीचे (मालेगाव) संजय भोसले, पाथर्डी परिसरातील सोनू मनोज गरड यांच्या आत्महत्त्यांपाठोपाठ प्रख्यात उद्योजक उदय खरोटे यांचा संगणक अभियंता असलेला पुत्र अजिंक्य व व्यावसायिक चंद्रकांत बोथरा यांचा सनदी लेखापालाचे शिक्षण घेणारा पुत्र गौरव यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील अजिंक्यने तर तोंडात गॅस सिलिंडरची नळी घेऊन व गॅस पोटात घेऊन जीवन संपविण्याचा अभिनवच मार्ग पत्करला. सुंदर आयुष्याची स्वप्ने पाहण्याच्या काळात का संपवावी त्यांनी अकाली अशी जीवनयात्रा, हा संशोधनाचा वेगळा विषय ठरावा; परंतु आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरू नये म्हणून गॅस ग्रहणाची शक्कल लढवण्यापर्यंतच्या निर्धाराने हे तरुण आपला शेवट करून घेतात, हेच डोके सुन्न करणारे आहे.

यानिमित्ताने आत्महत्यांच्या बाबतीत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, जगभरात दरवर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करीत असल्याची माहिती हाती आली. यातील १७ टक्के आत्महत्या भारतात होतात. प्रतिदिनी ते प्रमाण सुमारे ३०० इतके असल्याचे देशाच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीवरून आढळून येते. या ब्यूरोने देशातील २०१४ मधील आत्महत्यांचा जो आकडा दिला आहे तो १,०९,४५६ इतका आहे. यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक ४७,२४२ इतके होते, तर त्याखालोखाल कौटुंबिक कारणांतून आत्महत्या करणाºयांची संख्या २८ हजारांपेक्षा अधिक होती. याखेरीज लग्नकार्याशी व प्रेमप्रकरणाशी संबंधित तसेच परीक्षेतील अपयश, हुंडा, प्रॉपर्टीचे वाद, गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधिनता आदी अनेकविध कारणांतून आत्महत्या घडून येत असतात. विशेष म्हणजे, लोकप्रिय अभिनेते व नेत्यांच्या निधनानंतर आक्रोश करीत चक्क आत्महत्या करणाºया भक्त वा समर्थकांचे प्रमाण मोठे असणाºया तामिळनाडूपेक्षाही महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. खरोखर चक्रावून टाकणारीच ही बाब आहे.

कशातून घडून येते हे, असा प्रश्न यासंदर्भात उपस्थित होत असला तरी, मानसिक तणाव व मनाच्या खचलेपणातून या आत्महत्या घडून येतात असे त्याचे निर्विवाद उत्तर असते. तेव्हा, हे खचलेपण व विशेषत: तरुणांमधले नैराश्य कसे रोखता येईल हा खरा आणि महत्त्वाचा ठरणारा प्रश्न आहे. आजच्या धकाधकीच्या काळात साºयांनाच धावावे लागत आहे. तरुणवर्गाच्या अपेक्षा मोठ्या असतात, त्या अपेक्षांची पूर्ती चटकन व्हावी यासाठी ते अधिक परिश्रमाने प्रयत्नरत असतात. पण, मध्येच एखादा अडचणीचा ‘गतिरोधक’ आला तर त्यावर आदळून त्यांची मन:स्थिती बिघडते. अशावेळी घरातील कर्त्या किंवा वडिलधाºयांशी त्यांचा संवाद असला तर त्यातून त्यांना धीर मिळून ते सावरले जातात, अन्यथा नैराश्याच्या गर्तेत अडकतात. दुर्दैवाने आज प्रत्येकच जण ‘बिझी’ झाला आहे. ज्याला कुणाला फारसे काम नसते तेही मोबाइलच्या महाजालात इतकके व्यस्त असतात, की पाल्यांकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ मिळत नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळेही यात भर पडून गेली आहे. अनुभवाच्या किंवा युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे आजी-आजोबा गावात आणि कमावती मुले शहरात, असे कुटुंब चित्र आकारास आले आहे. त्यामुळेही कुटुंबातला संवाद हरवला आहे. मुलांशी मित्र बनून वागण्या-बोलण्याची गरजच ओळखली जात नाही, परिणामी मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढीस लागून मानसिक असुरक्षा भेडसावू लागते. त्यातूनच ‘लाथ मारीन, तिथे पाणी काढेन’ यासारख्या आशावादाऐवजी निराशा बळावते. तीच पुढे आत्मघाताच्या मार्गावर नेते. तेव्हा तरुणपिढीशी संवादच नव्हे तर सुसंवाद साधला जाणे व कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात बिंबवणे यासंदर्भात गरजेचे ठरावे. याच अनुषंगाने मुलांना मोठे होऊ द्या, त्यांच्यापरीने त्यांना बागडू द्या, त्याचे स्वातंत्र्यही द्या; पण त्यांचे बोट सुटू देऊ नका, अशी अपेक्षा पालकांकडून केली जाणे गैर ठरू नये.

Web Title: Is so cheap to die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू