‘नारायण, नारायण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:57 AM2017-11-27T00:57:36+5:302017-11-27T00:57:57+5:30

शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले तेव्हाच त्यांच्या लेखी राण्यांना फारशी किंमत नाही हे सा-यांच्या लक्षात आले.

 'Narayan, Narayan' | ‘नारायण, नारायण’

‘नारायण, नारायण’

Next

शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले तेव्हाच त्यांच्या लेखी राण्यांना फारशी किंमत नाही हे सा-यांच्या लक्षात आले. या अमित शहांनी राण्यांना भाजपात येण्याऐवजी आपला वेगळा पक्ष काढण्याची व राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची सावध सूचनाच तेवढी केली. ‘भाजपात नाही पण त्याच्या वळचणीला येऊन थांबा’ असा या सूचनेचा अर्थ होता. मग राण्यांनी कोणत्याही पदलोलुप अगतिकाप्रमाणे आपला ‘महाराष्ट्र स्वाभिमान (?)’ पक्ष काढून तो रालोआत सामील केल्याची स्वत:च घोषणा केली. वर ‘मी मंत्री होणारच’ असे ते महाराष्ट्राला ऐकवीत राहिले. देवेंद्र फडणवीसही त्यांना कधी गोंजारत तर कधी चुचकारत राजी राखत व स्वत:जवळ ठेवत राहिले. पण राण्यांचे मंत्रिपद मात्र त्यांना हुलकावण्या देत दूरच राहिले. या काळात आपली आठवण महाराष्ट्राला राहावी म्हणून राणे मधूनच कधीतरी सेनेला तर कधी राष्ट्रवादी पक्षाला नावे ठेवताना दिसले. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मंत्रिपदासाठी एवढा लाचार झालेला व एवढे दिवस त्याकडे डोळे लावून बसलेला माणूस दुसरा झाला नाही. त्यांची एरवीची प्रतिमा ताठर माणसाची व मुत्सद्दी नेत्याची होती. त्यांच्याजवळ असलेल्या बक्कळ संपत्तीच्या भरवशावर त्यांनी स्वत:सोबत आपल्या दोन्ही मुलांना (भुजबळांच्या पावलावर पाऊल ठेवून) लोकसभेत व विधानसभेतही आणले होते. शिवाय मुलाला त्याची एक स्वाभिमानी म्हणविणारी संघटनाही त्यांनी काढून दिली होती. सा-या कोकणावर आपलीच महासत्ता असल्याच्या तो-यात ते वावरत होते. मात्र गेल्या निवडणुकीने त्यांची पार दैना केली. ते पडले, एक मुलगा पडला आणि त्यांच्या दुस-या मुलालाच तेवढे निवडून येणे जमले. (हेही भुजबळांसारखेच झाले) पण सत्तेची पदे अनुभवलेल्या या पुढा-याला ती पदे सतत खुणावतच राहिली. सत्तेत राहिलो तरच सन्मानासह सारे मिळविता येईल अशी मानसिकता असणा-यांच्या वाट्याला आलेली ही दीनवाणी अवस्था जनमानसात त्यांच्याविषयी करुणा जागविणारी नक्कीच आहे. पण भाजपावाले नाठाळ आहेत. ते राण्यांना खेळवतात आणि सेनेचे ठाकरे त्यांना सरकारच्या दाराबाहेर ठेवण्यात आपली सारी ताकद खर्ची घालतात. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षातील नेते हा केविलवाणा खेळ पाहतात आणि न बोलता आपली करमणूक करून घेतात. राण्यांची अशी अवस्था होण्याचे एक कारण त्यांच्या मागे लागलेल्या इकॉनॉमिक डायरेक्टोरेटच्या चौकशांचे लचांड हे आहे. आपण सत्तेबाहेर आहोत तोवर या चौकशीतील माणसे आपला माग काढणार आहेत याची राण्यांना जाणीव आहे. सध्या या डायरेक्टोरेटचा धाक सत्तेबाहेरच्या साºयाच राजकारणी माणसांना आहे. (ते भुजबळांची स्थिती पाहतही आहेतच) त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर रालोआमार्फत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जाणे ही राण्यांची तातडी आहे. मात्र फडणवीसांचे सरकार सेनेच्या पाठिंब्यावर उभे असल्याने आणि सेनेचा भुजबळांएवढाच राग राण्यांवरही असल्याने तो पक्ष आपल्या सगळ्या मावळ्यांनिशी त्यांच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहे. एकेकाळी ‘सेना नसली तरी आम्ही आहोत’ असे म्हणणारे शरद पवारही राण्यांसाठी तसे म्हणायला सध्या राजी नाहीत. आपण कोणालाच कसे चालत नाही, याचा विचार अशावेळी राण्यांच्याही मनात येत असावा. मात्र त्यांच्यासारखी माणसे आपल्या आत्मपरीक्षणाला फार उशिरा तयार होतात हेच यातले दुर्दैव.

Web Title:  'Narayan, Narayan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.