मुंबईतला माणूस जगतोय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:07 AM2018-07-07T04:07:54+5:302018-07-07T04:08:11+5:30

या आठवड्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पूल कोसळला आणि दिवसभर मुंबई कोलमडली. दुसरा दखल घेण्यासारखा विषय म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आलेला ‘संजू’ हा चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद.

 Man is alive in Mumbai, Rambhosa | मुंबईतला माणूस जगतोय रामभरोसे

मुंबईतला माणूस जगतोय रामभरोसे

Next

- डॉ. उदय निरगुडकर
(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)

या आठवड्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पूल कोसळला आणि दिवसभर मुंबई कोलमडली. दुसरा दखल घेण्यासारखा विषय म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आलेला ‘संजू’ हा चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद.

सात वाजता सकाळी।
भोंगा वाजवी भूपाळी।
सुरू पहिली पाळी।
मोठ्या डौलात।
नारायण सुर्वे यांच्या कवितेतली ती कष्टकऱ्यांची पहिली पाळी तर केव्हाच मुंबईतून हरवली. आता मुंबई जागी होतेय ती विमान कोसळून, जमीन खचून, पाणी तुंबून, आग लागून, चेंगराचेंगरीतून किंवा पूल कोसळून. मुंबईत सगळ्या गोष्टींची हमी आहे...शाश्वती आहे. रोजगाराची हमी आहे. शाश्वती नाही ती फक्त जगण्याची. ज्याच्यासाठी ही सर्व धडपड चालू असते त्याचीच. इथे दिवसाला रेल्वेत लोंबकळूनच ८-१० माणसं सहज मरतात. पण दुसरा पर्याय काय असतो? जगायचं असेल तर उठावं लागतं. तोंडावर पाणी मारून पुन्हा धावत सुटावं लागतं. मरणाची वाट पाहत. अशी आताची अवस्था आहे. बाहेर पडलेला माणूस घरी परतेल, याची कोणतीही शाश्वती आज इथं नाही. गुरं जरी वाहनातून न्यायची म्हटली तरी त्याच्या संख्येवर मर्यादा आहे. पण इकडे रेल्वेत माणसं किती कोंबून जातात, त्याची गणतीच नाही. इलाज नाही, म्हणून मुंबई जगतेय. पण कोणतीही जबाबदारी नाही, यंत्रणा नाही, समन्वय नाही, कणखर नेतृत्व नाही, नियोजन नाही, व्यवस्थापन नाही, अंमलबजावणी नाही. आहे तो फक्त घोषणांचा सुकाळ. त्यामुळेच अंधेरीतला पादचारी पूल पडण्याला जबाबदार कोण, यावरून चिखलफेक सुरू झाली, यात काहीही नवल वाटत नाही. दरवर्षी तेच नाले तसेच तुंबतात, दरवर्षी नवे नवे पूल पडत राहतात. मृत्यूची कारणं वेगवेगळी, मृत्यू फक्त खात्रीशीर. भीती घालायची, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव किंवा स्वप्नं दाखवायची, मुंबई-पुणे २० मिनिटांत. शेवटी मेट्रोमॅन ई श्रीधरननाच चपराक द्यावी लागली की बुलेट ट्रेन नको जगणं सुधारा. श्रीधरननी व्यक्त केला तो जनतेचा आक्रोश होता. अंधेरीला जे घडलं ते सत्य होतं. पुलाचं नाव फक्त सकाळी लिहिलं गेलं. अन्यथा कोणताही पूल पडण्याच्याच अवस्थेत. स्ट्रक्चरल आॅडिट करून सहा-सात महिन्यांतच जर पूल पडत असेल तर कुठल्या पुलाची शाश्वती द्यायची. इंग्रजांनी बांधलेले पूल पडत नाहीत. एकवेळ गोरे इंग्रज परवडले. हे काळे इंग्रज जास्त घातक. इथं माणूस रामभरोसे जगतोय आणि अल्लाला प्याराही होतोय. हे सगळं कधी थांबणार? याची जबाबदारी कुणाची? चिखलफेक कधी बंद होणार? ९/११ला झालेल्या विमान हल्ल्यात परिस्थिती हाताळणारा न्यूयॉर्कच्या महापौरांसारखा कणखर महापौर आपल्याला कधी मिळणार?
मुंबईकरांच्या लोकल ट्रेनच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्यांना बुलेट ट्रेनची स्वप्नं दाखवली जातात. कचºयाचे ढीग दूर होत नाहीत आणि मुंबईला शांघाय करण्याच्या बाता केल्या जातात. यातून मुंबईकरांची सुटका करायची इच्छा असेलच तर खमके निर्णय घेणारे प्रशासकीय अधिकारी हवेत आणि अशा अधिकाºयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे राजकारणी हवेत. भीती घालून किंवा स्वप्नं दाखवून मुंबईचा विकास होणं शक्य नाही. इथल्या मुर्दाड यंत्रणा जोपर्यंत हलत नाहीत, तोपर्यंत इथल्या मृत्यूचा आकडा हलतच राहणार.

संजू : आक्र मण की आव्हान!
संजू चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. चार हजार चित्रपटगृहांतून लाखो प्रेक्षक तो बघताहेत आणि काही महिन्यांत टीव्हीवर येऊ कोट्यवधी प्रेक्षक तो बघतील. सहा दिवसांतच त्यानं १६७ कोटींचा गल्ला गाठला. हा चित्रपट चालतो कारण यात गॉसिप आहे, मसाला आहे, क्र ाईम आहे, सेक्स आहे. या चित्रपटाच्या बाजूनं आणि त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातून गदारोळ उडालाय. हिटलर, दाऊद, हसीना पारकर, अरुण गवळी अशा खलनायकी व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट आलेले आहेत. तसेच श्यामची आई, गांधी, दो आँखे बारह हाथ असेही चित्रपट आलेले आहेत. मुळात समाज चांगल्या चित्रपटांनी सुधारतो आणि वाईट चित्रपटांनी बिघडतो, असे ठोकताळे आपल्याला बांधता येणार आहेत का? मुळात असे चित्रपट बनतात, हे कशाचं लक्षण आहे? थ्री इडियटसारखे चित्रपट देणाºया प्रतिभावंत दिग्दर्शकाला संजूसारखे चित्रपट केले पाहिजेत, असं का वाटतं? आणि म्हणूनच संजू हा चित्रपट आक्रमण आहे की आव्हान आहे, असा प्रश्न निर्माण होतो. हा चित्रपट नेमका काय आहे? संजय दत्तची आत्मकथा असेल तर ती ज्या वस्तुनिष्ठपणे, तटस्थपणे मांडली गेली पाहिजे, तशी मांडली गेली का? संजय दत्तवर जे हँडग्रेनेड, बंदुकांचे आरोप झाले होते, ते या चित्रपटात का टाळले? वास्तवाशी फारकत का घेण्यात आली? काही लोकांना यातून संस्कारक्षम पिढीवर वाईट संस्कार होतील असं वाटतंय? यातून दोन्ही बाजू समोर याव्यात. या चित्रपटातून देशद्रोहाचं उदात्तीकरण केलं जातंय असं वाटतंय. सेक्स आणि ड्रग्जचं उदात्तीकरण होतंय असंही वाटतंय. आजचा चित्रपट हा उद्याचा इतिहास बनतोय. ऐतिहासिक दस्तावेज म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. मग असं असेल तर या चित्रपटाला गंभीरपणे घ्यायलाच हवं. मुळात हा चित्रपट येऊच नये असं वाटणारा वर्ग आणि यावा असं वाटणारा वर्ग. मग लोक सूज्ञ नाहीत का? तसं असेल तर त्याकडे तरुण का आकर्षित होतायत. चाळीशीतल्या पिढीला या प्रकणातलं तथ्य माहीत आहे. पण आज जी पिढी १६-१८ वर्षांची आहे त्यांना काय माहीत असणार? त्यांच्यासाठी चित्रपटातला संजू हाच खरा संजय दत्त नाही का? खरोखरच माध्यमं एखाद्या अँटी हिरोच्या पतनाला कारणीभूत असतात का? मुळात समाजात अशा गोष्टी आहेत, हे आदर्शवादी मंडळी अमान्य का करतायत? पूर्वीच्या काळी व्हिलन म्हणून जमीनदार असायचे, मग सावकार, मग स्मगलर, मग बिल्डर, मग राजकारणी आणि आता मीडिया नवा खलनायक बनणार आहे? गुन्हेगाराचं उदात्तीकरण करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे का?
कोणताही बायोपिक करताना एकप्रकारची वस्तुनिष्ठता आवश्यक असते. हा चित्रपट हे अशा दुष्कृत्यांवरचं स्पष्टीकरण का वाटतो? काय दाखवता आणि काय दाखवत नाही, हे जरी तुमचं क्रिएटिव्ह स्वातंत्र्य असलं तरी चित्रपट बनवण्याचा हेतू निखळ, पारदर्शी असला पाहिजे. तो संजूच्या बाबतीत आहे का? हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा फरक आहे. आज तरुण मुलं हा चित्रपट बघतायत. त्यांना संजूचं आकर्षणही कदाचित वाटलं असेल. पण त्यातल्या अनेकांना तसं व्हायचं नाही, असंही वाटत असेल. हीच काय ती उद्याची आशा आहे.

Web Title:  Man is alive in Mumbai, Rambhosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.