संपादकीय - या फांदीवर पुन्हा येईल ती सोन्याची चिमणी

By विजय दर्डा | Published: July 17, 2023 09:11 AM2023-07-17T09:11:49+5:302023-07-17T09:12:32+5:30

मी काय म्हणतो, हे आज तुम्हाला पटणार नाही कदाचित; पण वास्तव्यासाठी सर्वोत्तम देश 'भारत' ठरेल, तो दिवस फार दूर नाही

Editorial - The golden sparrow will return to this branch, india's economy growth excellent | संपादकीय - या फांदीवर पुन्हा येईल ती सोन्याची चिमणी

संपादकीय - या फांदीवर पुन्हा येईल ती सोन्याची चिमणी

googlenewsNext

विजय दर्डा

'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा, वो भारत देश है मेरा... साधारणतः ५८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर-ए-आजम' या चित्रपटातील हे गाणे आठवते? गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले हे गाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जरूर ऐकवले जाते. तुम्ही विचाराल, स्वातंत्र्य दिन पुढच्या महिन्यात आहे. शिवाय भारतात आता सोन्याचा धूरही निघत नाही, मग या गाण्याची चर्चा आता का?

भारतातून मी आपला देश आणि जगभरातले इतरही देश पाहिले आहेत. वेगवेगळ्या वंशाच्या आणि संस्कृतीच्या लोकांशी माझा संवाद झालेला आहे. इंग्रजांनी या देशाला रंगवले होते; त्यात काय चुकले हे आता संपूर्ण जगाला दिसते आहे. या देशात एकेकाळी सोन्याचा धूर निघत असे. मुगल आणि पोर्तुगीजांपासून डच डॅनिश, फ्रेंच आणि इंग्रज इथे आले याचे कारणच मुळात भारताच्या समृद्धीची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. आपण साधे सरळ लोक होतो; ते चतुर, चलाख आणि लूट करण्याच्या कलेत निपुण लोक होते.
गारुडी आणि मदारी लोकांचा देश म्हणून मुगल कशी लूट करायचे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. १४९८ मध्ये भारतात पोहोचलेल्या पोर्तुगालच्या वास्को-द- गामाने येण्या-आण्यावर जितका खर्च केला त्याच्या साठ पट जादा नफा येथे कमावला. इंग्रजांनी काय केले याचा पंचनामा खासदार शशी थरूर यांनी ऑक्सफर्ड युनियनमध्ये केला आहे. त्यांनी पुराव्यानिशी हे दाखवून दिले की ब्रिटिश आले तेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा सुमारे २३ टक्के इतका होता, इंग्रज परत गेले तेव्हा हा आकडा चार टक्क्यांवर पोहोचला. 

जागतिक व्यापारात भारताचा वाटा २७ टक्के होता, तो दोन टक्क्यांपर्यंत घसरला. भारतातून लुटून लुटून नेलेल्या पैशांवर ब्रिटनचे औद्योगिकीकरण झाले. १७६५ पासून १९४७ पर्यंत इंग्रजांनी आपल्या देशाच्या खजिन्यातून ४४ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त लूट केली हे केवळ शशी थरूर नव्हे, तर इतकी मोठी लुटालूट करणाऱ्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आता भारताने मागे टाकले आहे. आपण आज पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत; आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा आधारभूत संरचना तेवढ्याच वेगाने विकसित होतात, २०४७ पर्यंत एक विकसित देश म्हणून भारताला जगाने ओळखावे, असे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे.
जगातल्या इतर देशांशी तुलना केल्यावर लक्षात येते की काही अडचणी आपण दूर करू शकलो तर भारत रहिवासासाठी जगातला सर्वांत चांगला देश ठरेल. 

आपल्या समृद्धीमुळे अमेरिका जगाला आजही आकर्षित करते; परंतु तेथील सामाजिक ताणेबाणे विसविशीत होत आहेत. कोणीही माथेफिरू कुठेही जाऊन गोळीबार करतो. युरोपची परिस्थिती तर सगळे जग पाहते आहे तसेही युरोपचा काळ आता मागे पडला आहे. युरोपकडे आज पूर्वीची ताकद उरलेली नाही. स्वित्झर्लंड साधनसंपन्न असल्याने जगातले सधन लोक कायमच्या मुक्कामासाठी तिकडे खेचले जातात, हे मात्र खरे! दुसरीकडे दुबईनेही मोठ्या वेगाने पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. सर्व ऐशआराम तिथे आहेत. जगभरातून लोक तेथे जातात, काम करतात, राहतात; परंतु तेथे मोकळेपणा नाही, वैचारिक आणि सामाजिक खुलेपणा तेथे नाही, तिथे राहायचे असेल तर व्यक्तिगत स्वातंत्र्याशी मोठी तडजोड करावी लागते, विचारस्वातंत्र्य तर फार दूरचे सिंगापूरही शानदार आहे; परंतु तेथेही सगळे काही पिंजऱ्यात अडकलेले आहेत. सुविधांच्या बाबतीत चीन जगातल्या प्रत्येक देशाशी टक्कर देत आहे. परंतु तेथेही स्वातंत्र्य' अस्तित्वात नाही. सरकारी धोरणावर प्रश्न करणाऱ्या जॅक मा सारख्या उद्योगपतीला चीनने उद्ध्वस्त केले; धनवानांची ही गत तर सामान्यांचे काय होत असेल. 

अशा परिस्थितीत सगळ्या जगाची नजर भारताकडे असणे स्वाभाविक होय. या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. हवामानात वैविध्य आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारताच्या मूळ स्वभावातच सगळ्यांना आपले म्हणण्याची 'अतिथी देवो भव' ही सांस्कृतिक परंपरा आहे. कट्टरतेची काही उदाहरणे जरूर घाबरवतात; परंतु आपला सामाजिक, सांस्कृतिक ताणाबाणा नष्ट करू शकतील एवढी ताकद त्यांच्यात नाही.. या एका गोष्टीकडे मात्र भारताने डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे. 

सगळ्या जगाला आपल्याकडे आकर्षित करावयाचे असेल तर आपल्याला शिक्षण, आरोग्य आणि सरकारी कामांमध्ये सुगमता आणण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दिशेने काम होत आहे, हे नक्की. परंतु, त्याचा वेग वाढवावा लागेल. जेव्हा आपल्या देशात जागतिक पातळीवरील अध्ययन होऊ शकेल, रोजगाराच्या भरपूर संधी असतील तर कोणीही तरुण परदेशात कशाला जाईल? सर्वांना हे कळते, की परके देश कितीही चांगले असोत ते आपले देश नाहीत. एखादी अत्यंत स्नेहपूर्ण महिला आपल्या आईची जागा कशी घेऊ शकेल.  

भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघावा असे वाटत असेल तर सरकार त्याच्या बाजूने सर्वकाही करीलच, पण नागरिकांनाही आपल्या परीने समर्पण भावाने काम करावे लागेल, तेव्हाच आपण सगळे खऱ्या अर्थाने जाऊ शकू. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा...

vijaydarda@lokmat.com 
(लेखक लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

Web Title: Editorial - The golden sparrow will return to this branch, india's economy growth excellent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.