कामाला लागा! मग काय, लगाव बत्ती...

By सचिन जवळकोटे | Published: November 18, 2018 06:01 AM2018-11-18T06:01:13+5:302018-11-18T06:02:03+5:30

(लगाव बत्ती) थोरले काका बारामतीकर यांचा ‘कामाला लागा’ हा शब्द खूप लाडका. तसा कार्यकर्त्यांसाठीही अत्यंत परवलीचा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...

Do Work! Then what... | कामाला लागा! मग काय, लगाव बत्ती...

कामाला लागा! मग काय, लगाव बत्ती...

Next

(लगाव बत्ती)

थोरले काका बारामतीकर यांचा ‘कामाला लागा’ हा शब्द खूप लाडका. तसा कार्यकर्त्यांसाठीही अत्यंत परवलीचा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शब्द काकांच्या तोंडून निघताच भले-भले कामाला लागतात, हा निकालानंतरचा अनुभव. आता तुम्ही म्हणाल... मध्येच हा शब्द आम्हा पामराला कुठून आठवला ? तर सध्या या शब्दाचं मार्केटिंग करताहेत देशमुखांचे प्रभाकर... माढा मतदारसंघात जाऊन प्रत्येकाला ते सांगताहेत की, काकांनी म्हणे त्यांना खाजगीत संदेश दिलाय... कामाला लागा ! मग काय, लगाव बत्ती...

देशमुख अद्याप राजकारणात नवीन
थोरल्या काकांची ‘घड्याळ’ पार्टी म्हणजे प्रस्थापितांचाच दरबार. तालुक्यातला मातब्बर नेता हाच त्यांच्या पार्टीचा बेस. त्याच्या जीवावर पक्ष मोठा करायचा... परंतु पक्षापेक्षा नेता मोठा होऊ लागला की, त्याच्या छाताडावर दुसरा नेता आणून बसवायचा. एकवेळ कोंबड्यांची झुंज परवडली, रेड्यांची टक्करही परवडली... परंतु तालुक्यातल्या या दोन नेत्यांची राडेबाजी कार्यकर्त्यांसाठी सहन होण्याच्या पलीकडची. ही सारी गंमत मात्र बारामतीकरांनी गालातल्या गालात हसत पाहायची. मग या झुंजीत जो जिंकला तो लाडका. जो हरला त्याचा पडला कांडका. याच न्यायानं आजपावेतो जिल्ह्यातले अनेक नेते शब्दश: कामाला लागलेले.
दहा वर्षांपूर्वी लोकसभेला माढ्याच्या रणांगणात खासदारकीचा मुकुट पटकाविल्यानंतर याच थोरल्या काकांनी नवी रणनीती आखलेली. अकलूजच्या पाटलांचा वाडा सोडून त्यांनी पहिल्यांदाच माढ्यातल्या शिंदेंच्या गढीत पाहुणचार घेतलेला. त्यावेळी याच काकांनी म्हणे शिंदे घराण्याच्या कानात सांगितलं होतं की, ‘कामाला लागा !’ त्यानंतर पंढरपूर विधानसभेला कोण ‘कामाला लागला’, हे सर्वश्रुतच. मात्र तो संदेश तेवढ्यापुरताच डोक्यात न ठेवता संजयमामांनी नंतर जी झपाटून मोहीम सुरू केलीय, ती काही आजही संपता संपेना झाली की राव.
आगामी लोकसभेसाठी माढ्यात सध्या अकलूजच्या रणजितदादांचा बोलबाला. केवळ त्यासाठीच म्हणे संजयमामांनी अवघा जिल्हा गोळा केला. मात्र मामाही राहिले बाजूला. दादाही राहिले बाजूला... माणदेशातल्या प्रभाकरांना ‘कामाला लागा’ची जी चावी बारामतीकरांनी दिलीय ती धक्कादायक. या नव्या उमेदवारीतून थोरल्या काकांना नेमकं कुणाला कामाला लावायचंय, याचा शोध म्हणे अकलूजचे दादा, फलटणचे राजे अन् माढ्याचे मामा घेताहेत. शोध लागेल तेव्हा लागेल... तोपर्यंत आपलं काम आपण चालू ठेवू या... लगाव बत्ती !

नाना म्हणाले दादांना...  .. चला जनतेच्या कोर्टात !
राजकारणात कालचा शत्रू आज मित्र असतो. आजचा मित्र कदाचित उद्या शत्रू असतो. त्यामुळे राजकीय नात्यांइतकी लवचिकता जगात कुठंच नसते. सांगायचा मुद्दा हा की, कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात गेलेली मंडळी आज पुन्हा स्टेजवर मांडीला मांडी लावून बसलीय. गळ्यात गळे घालून मतांचा जोगवा मागू लागलीय.
अकलूज कारखान्याच्या प्रचारात धुरळा उडविण्यासाठी पंढरीचे भारतनाना उत्सुक बनलेत. ‘रणजितदादांचा विजय निश्चित’ असं आज छातीठोकपणे सांगणा-या भारतनानांनी याच घराण्याला काही दिवसांपूर्वी ‘विजय शुगरचा पैसा अनिश्चित’ म्हणत बिल वसुलीसाठी कोर्टात खेचलं होतं.
पंढरीच्या मैदानात कधी दादा अन् नाना एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकतात काय... नंतर उसाचा बिझनेस अडचणीत येताच एकमेकांना साथ देतात काय.. मग बिलाचे पैसे अडकल्यावर एकमेकांविरुद्ध कोर्टाची पायरीही चढतात काय... अन् शेवटी पुन्हा पंढरीच्या पंतांंकडं बघून ‘दोघांचा शत्रू एकच’ म्हणत एकाच स्टेजवर एकत्र येतात काय... सारंच अचंबित करणारं... अनाकलनीय वाटणारं..
मात्र एक खरं... जनतेच्या कोर्टात असली  वकिली जास्त दिवस लपून राहत नाही. ‘व्यासपीठावरची दुश्मनी’ जेव्हा ‘व्यवहारात दोस्ती’ बनते, तेव्हा याला काळच उत्तर... तोपर्यंत लगाव बत्ती !

पक्षप्रेमाइतकीच म्हणे तानाजीनिष्ठाही महत्त्वाची..
खूप वर्षांनंतर गावोगावी भगव्या उपरणांचं वादळ उठलं. त्यांची गर्जना आसमंतात घुमली. शेट्टींच्या नावानं कारखानदारांनीही कधी मोडली नसतील, एवढी बोटं कडाकडा वाजली. थयथयाटाचा जाळ पेटला. तळतळाटाचा धूर सुटला. हे पाहून सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषणाला बसलेल्या शेट्टी समर्थकांच्याही पोटात खड्डा पडला. आता हा उपाशीपोटी होता की भयापोटी, हे केवळ त्यांनाच माहीत... परंतु गेले तीन-चार दिवस जिल्ह्यात ‘भगव्यांचा गवगवा’ जाहला, हे मात्र शंभर टक्के निश्चित.
मात्र बिच्चा-या जनतेला शेवटपर्यंत काही समजलं नाही की, हा वाद कारखानदार सावंत अन् शेतकरी नेते शेट्टी यांच्यातला होता की सेना अन् संघटनेतला..  मात्र उस्मानाबादमधल्या सावंतांच्या खाजगी कारखान्यातला बिलाचा वाद पक्षपातळीवर नेऊन सोलापूरच्या सैनिकांनी रस्त्यावर आंदोलनाचा धुरळा उडविला. यात पक्षप्रेमापेक्षा तानाजीनिष्ठा अधिक महत्त्वाची ठरली, हेही लोकांना स्पष्टपणे जाणवलं. कारण ‘उद्धों’विरोधात आजपावेतो राज, अजितदादा अन् इतर नेत्यांनी जेव्हा-जेव्हा खालच्या पातळीवर रान उठविलं होतं, तेव्हाही कधी ही फौज एवढं चवताळून उठल्याची दिसली नव्हती.
असो. दोष या शिवसैनिकांचा नाही. सत्तेत असूनही विरोधकांचं भोग भोगणा-या या बिच्चा-या मंडळींना सावंतांमुळं थोडीफार ‘ऊर्जा’ मिळाली असेल, तर हे बिच्चारे कुठं चुकले; कारण भाळवणीत गाळे बांधून किंवा ति-ह्याच्या टोलनाक्यावर गाड्या अडवून किंवा बांधकामात ‘लक्ष्मी’च्या विटावर विटा चढवून जेवढा फायदा होत नसेल, त्याहीपेक्षा जास्त सावंतांशी प्रामाणिक राहून होत असेल तर लगाव बत्ती.. उडवा अजून धुरळा ! पण या सा-या गदारोळात ‘महेशअण्णा’ गप्पच राहिले. कदाचित महापालिकेतल्या जुन्या खोक्याला जागावं की विधानसभेतल्या आगामी कमळाला सांभाळावं, याचा गुंता काही सुटला नसावा.

टीप : नऊ-नऊ कारखान्यांच्या मालकानं शेतक-यांची थकविलेली एफआरपी लक्षात ठेवण्यासाठी किमान एखादा कॅल्क्युलेटर तरी जवळ ठेवावा; कारण जनतेची मेमरी लय शार्प असते म्हणे !

 (लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Do Work! Then what...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.