धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

By किरण अग्रवाल | Published: August 20, 2023 11:48 AM2023-08-20T11:48:07+5:302023-08-20T11:49:35+5:30

Dam tourism ok, what about safety? : जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.

Dam tourism ok, what about safety? | धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

googlenewsNext

- किरण अग्रवाल

धरणात बुडाल्याच्या किंवा आत्महत्येच्या घटना लक्षात घेता अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.

पावसामुळे निसर्गाचा सृजनोत्सव सुरू असल्याने सध्या लहान मोठ्या प्रकल्पांवर पर्यटकांची गर्दी होत आहे खरी, परंतु येथे पोहताना बुडाल्याच्या अगर आत्महत्येच्या घटना पाहता अशा ठिकाणी व्यक्तिगत व सार्वजनिक सुरक्षेचे मापदंड पाळले जाणे गरजेचे होऊन बसले आहे. दुर्दैवाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाताना दिसत नाही.

दिवस पावसाळ्याचे असल्याने पावसाळी पर्यटनाच्या जागा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणे स्वाभाविक आहे. गोव्याला समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायला न जाऊ शकणारा मध्यमवर्ग दिवसभराचा आनंद आपल्या आसपासची धरणे, बंधारे येथे शोधत असतो. जाण्या येण्यासाठी लागणाऱ्या इंधनाला व पर्यायाने खिशालाही परवडणारी ही ठिकाणे असतात. पण येथे आनंदासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची सुरक्षा जपली जाणे कसे अवघड आहे व त्यातून किती मोठे नुकसान होऊ शकते याची उदाहरणे कमी नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वीच बार्शीटाकळीचे तीन तरुण काटेपूर्णा धरणावर गेले असता पोहोताना त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला तर दोघे कसेबसे बचावले. मागे पोपटखेडच्या धरणावर अकोट येथील एका भगिनीचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. वारी हनुमान येथील मामा-भाच्याचा डोह व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारी भैरवगडच्या डोहात तर नेहमीच अशा घटना घडत असतात. त्यामुळेच धरण असो, की छोटे प्रकल्प वा डोह; अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.

अकोला जिल्ह्यात वाण, पोपटखेड, दगडपारवा, काटेपूर्णा, मोर्णा आदी प्रकल्पांवर शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी फिरायला येणाऱ्यांची गर्दी उसळत आहे. यातील दोन प्रकल्पांवरील अलीकडच्या दोन घटना पाहता कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जाताना आढळत नाही. यातील काही जागा ''युगल क्रीडा''साठी प्रसिद्ध बनू पाहत आहेत, तर काही ठिकाणी पाण्यात उतरण्याला कसलीही बंधने नाहीत. यातूनच दुर्दैवी घटना ओढवत असल्याने पाटबंधारे विभागाने जागोजागी किमान टेहळणी मनोरे उभारून किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या पर्यटनाच्या दिवसात तरी नियंत्रणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सर्वच प्रकल्पांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक असली तरी अधिकतर सुरक्षारक्षक बड्यांच्या पार्ट्यांमध्ये ''वेटरकी'' करतानाच दिसून येत असल्याचेही बोलले जाते. अनेक प्रकल्पांवर तर रात्रीची विद्युत व्यवस्थाही नसल्याने अंधारात काय काय चालते याची चर्चा न केलेलीच बरी, कारण कुणी कुणाला हटकणाराच नाही. दुसरे म्हणजे ऐनवेळी अशा प्रकल्पात काही अघटित घटना घडली तर बुडणाऱ्याचा जीव कसा वाचवावा याचे ज्ञान तेथे असणाऱ्या संबंधितांना अपवादानेच असते. शिवाय त्यासाठीची साधनेही त्यांच्याकडे नसतात. तेव्हा याबाबतचे प्रशिक्षण व साधनांची उपलब्धता यादृष्टीनेही विचार केला जाणे आवश्यक आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेनटाकळी, नळगंगा, ज्ञानगंगा, पलढग आदी धरणांवरही गर्दी होताना दिसते. वाशिम जिल्ह्यात सोनल, एकबुर्जी व अडाण असे मध्यम प्रकल्प आहेत. मागे अडाण धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून त्या धरणात पडल्या व त्यात दोघींचाही मृत्यू झाला होता. अमरावती जिल्ह्यातील मुलीही येथे फिरण्यासाठी आल्या असता एका मुलीचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला होता. एकबुर्जी धरणातही अशा घटना घडून गेल्या असून, मोतसावंगा धरणाच्या सांडव्यात मागे चारजणांचा मृत्यू झाला होता. थोडक्यात, कुठलेही व कोणतेही प्रकल्प घेतलेत तरी तेथे सुरक्षिततेचे पुरेसे उपाय आढळत नाहीत.

धरण क्षेत्र खूप मोठे राहत असल्याने कुठे कुठे लक्ष देणार असा एक भाबडा युक्तिवाद यासंदर्भात केलाही जाईल, परंतु जिथे प्रकल्पांची खोली अधिक आहे किंवा ज्या भागात गाळाचे प्रमाण अधिक आहे तेथे जाण्यापासून किंवा पोहोण्यापासून रोखणारे खबरदारीचे फलक तरी लावता येणारे आहेत. सुरक्षारक्षक व गेट ऑपरेटर्सना वायर रोप, लाइफ जॅकेट्स, टॉर्च आदी साधने उपलब्ध करून देता येणारी आहेत.

सारांशात, पावसाळी पर्यटकांची ठिकठिकाणी होणारी वाढती गर्दी पाहता धरण व लहान प्रकल्पांवरील सुरक्षा व्यवस्थेची खबरदारी घेतली जाणे गरजेचे बनले आहे. यासाठी फार खर्चिक बाबींसाठी चिंताक्रांत होण्याची गरज नाही, तर किमान बाबींनी व खबरदारीनेही जानमालाचे नुकसान टाळता येऊ शकते.

Web Title: Dam tourism ok, what about safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.