उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना...

By किरण अग्रवाल | Published: September 21, 2017 09:03 AM2017-09-21T09:03:45+5:302017-09-21T09:06:00+5:30

नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव. चैतन्याने भारलेल्या या पर्वकाळात शक्ती, भक्तीचे प्रतीक असलेल्या देवींची उपासना केली जाते. ‘या देवी सर्व भुतेषु, स्त्री रूपेण संस्थिता’ असा विचार व त्यावर श्रद्धा ठेवणारा आपला समाज असल्याने स्त्री किंवा नारी शक्तीचा मोठा जागर या काळात घडून येतो.

Celebrating 'event' ... | उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना...

उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना...

Next

नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव. चैतन्याने भारलेल्या या पर्वकाळात शक्ती, भक्तीचे प्रतीक असलेल्या देवींची उपासना केली जाते. ‘या देवी सर्व भुतेषु, स्त्री रूपेण संस्थिता’ असा विचार व त्यावर श्रद्धा ठेवणारा आपला समाज असल्याने स्त्री किंवा नारी शक्तीचा मोठा जागर या काळात घडून येतो. या जागरातून लाभणारी सकारात्मक ऊर्जा स्त्रीशक्तीच्या विकासाला नक्कीच चालना देणारी असते हे खरेच; परंतु एकीकडे हे होत असताना दुसरीकडे यासंदर्भातील अडथळ्यांच्या शर्यती संपताना दिसत नसून, महिला-भगिनींवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक ठरत आहे.
 
नवरात्र पर्वात अलीकडे दांडिया, गरबा आदी प्रकारांना अधिक उधाण आलेले दिसत असले तरी त्यामागील मूळ प्रेरणा स्त्रीशक्तीच्या आनंदाची, पूजनाची राहिली आहे. गरबातील टाळ्यांच्या नादातून तेजाची निर्मिती संकल्पिली गेली असून, आदिशक्ती-आदिमायेचे आवाहन त्यातून घडून येते. शिवाय, स्त्रीला देवता मानून पूजणारी आपली संस्कृती आहे. त्यासंदर्भात ‘स्त्रयै देव: स्त्रयै प्राण:’ असे शास्त्रात म्हटले गेले आहे. स्त्री हीच देवता असून, तीच जीवनाची प्राणतत्त्व आहे, असे त्यातून सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे तर, वेदातही नारीच्या गौरवाचा उल्लेख असून, तिच्या शक्तीचे गुणगाण आहे. ‘यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता’ म्हणजे, जेथे नारीची पूजा होते, तिचा आदर केला जातो, तिथे देवतांचा निवास असतो, इतक्या आदरार्थाने नारीचे वर्णन केले गेले आहे.

शास्त्रात वा वेदात तरी डोकावायचे कशाला, साधे घरातले आपल्या समोरचे, आपल्याला दिसणारे उदाहरण घ्या; घराला घरपण मिळवून देणा-या स्त्रीचा ज्या घरात सन्मान राखला जातो ते घर जणू गोकुळाची अनुभूती देणारे ठरते. पण, जेथे ते नसते, तेथे काय दिसते हे न लिहिलेले बरे. त्या अर्थाने स्त्री ही घरातली, समाजातली प्राणतत्त्व आहे, चेतना आहे, ऊर्जा आहे. रूपे विविध असली तरी, घराला बांधून ठेवणारा तो ममत्वाचा धागा आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने याच ऊर्जेची आराधना केली जाते. देवीची पूजा करतानाच समाजातील सेवाभावी, चळवळी महिलांचा; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर, काही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा काकणभर पुढेच राहात आपल्या कर्तव्याची, क्षमतेची पताका फडकविणा-या नवदुर्गांचा गौरव केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेही तसे घडून येते. त्यातून शक्ती, सामर्थ्याचा, संस्काराचा आदर्श इतरांसमोर ठेवला जातो. अवघ्या नारीशक्तीला बळ देणाºयाच या बाबी आहेत. पण, नारीला देवीसमान मानून पुजण्याचे हे उत्सव एकीकडे होत असताना दुसरीकडे तिच्यावरील अन्यायाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. उलट, त्यात वाढच होत आहे. स्त्रियांबद्दलच्या आदरभावाची जपणूक व रुजवणूक अधिक प्रभावीपणे होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित व्हावी.

यासंदर्भात नाशिकपुरतेच बोलायचे झाल्यास, चालू वर्षातील गेल्या आठ महिन्यात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्काराच्या १९, तर विनयभंगाच्या ८० पेक्षा अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. याखेरीज एकतर्फी प्रेमातून शालेय बस अडवून विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकारही घडून गेला आहे. चालू महिन्यात पिंपळगाव (ब.) नजीकच्या चिंचखेड येथील एका विवाहितेच्या लग्नाला अवघे एक वर्षही पूर्ण झालेले नसताना संशयास्पदरीत्या तिचा मृतदेह आढळून आला. मूलबाळ होत नाही या कारणातून छळले गेल्याने नाशकातील इंदिरानगरमधील एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेतल्याची, तर नेपाळमधून प्रेमविवाह करून आणलेल्या एका १९वर्षीय विवाहितेचा चारित्र्याच्या संशयातून खून केला गेल्याची तक्रारही पोलीस ठाण्यांमध्ये गुदरण्यात आली आहे. अशी आणखीही काही उदाहरणे देता येणारी आहेत, ज्याकडे केवळ गुन्हेगारी घटना म्हणून पाहता येऊ नये, तर त्यातून बुरसटलेल्या पुरुषी मानसिकेतेचे प्रत्यंतर यावे. स्त्रीकडे बघण्याची, तिच्या सोबतच्या वर्तनाची अहंकारी वृत्ती या घटनांतून डोकावल्याखेरीज राहात नाही.
विशेष म्हणजे, याच आठवड्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या एका प्रकरणात एकाला जन्मठेप, तर दुसºया प्रकरणात एकाला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेव्हा, कायदा त्याचे काम चोखपणे करतोच आहे. संबंधिताना काय शिक्षा व्हायची ती होत आहे व यापुढेही होणार आहे. पण एकूणच महिलांप्रतिची अवमानजनक किंवा अनादरयुक्त मानसिकता बदलल्याखेरीज या अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसणार नाही. नारीशक्तीचा जागर व तिच्या सन्मानाच्या चळवळी, उपक्रमांना बळ देऊन हा बदल साकारता येणारा आहे. नवरात्रोत्सवात या शक्तीची पूजा बांधतानाही हेच काम घडून यावे, उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना स्त्री सन्मानाचा, आदराचा प्रेरणादायी जागरही घडून यावा, एवढेच यानिमित्ताने...

Web Title: Celebrating 'event' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.