गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 04:48 PM2018-10-04T16:48:27+5:302018-10-04T16:49:15+5:30

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे.

BJP's condition in Goa is poor, but mid-term election no one wants! | गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

Next

- राजू नायक

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनारोग्याचा परिणाम जसा सरकारवर झालाय तसा तो भाजपावरही झाला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे. लोक या पक्षाला व सत्तेत भागीदार असलेल्या पक्षांनाही अद्दल घडविण्याची भाषा बोलताहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाची काही खैर नाही, तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या तर या पक्षाची संख्या १४ वरुन एक आकडी संख्येवर येईल.

गेले सहा महिने मुख्यमंत्री आजारी आहेत. मधला बराच काळ ते गोव्याबाहेर होते. या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकाही झालेल्या नाहीत आणि विधानसभा अधिवेशनही आटोपते घ्यावे लागले. राज्यात खाणी बंद आहेत. रोजगाराचा प्रश्न तीव्र बनला आहे. सरकारच आजारी असल्यासारखी परिस्थिती आहे. कारण दोन मंत्री इस्पितळातच बराच काळ होते. त्यानंतर आठवडाभरापूर्वी फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना डच्चू देऊन नवे मंत्री घेतले आहेत. परंतु मंत्रिमंडळ बैठक घेतली जात नाही. मुख्यमंत्री दिल्लीत २६ खाती घेऊन बसले आहेत. त्यांचे पुनर्वाटप होत नाही आणि योजनांना अर्थिक मंजुरी मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक व्हावी असे सुचविण्यात आले होते. परंतु बुधवारी बैठकीस चार मंत्री अनुपस्थित राहिल्याने बैठक बारगळली. त्यामुळे मंत्रिमंडळातील बरेच सदस्य नाराज  झाले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी या नाराजीवर आपला पक्ष विधानसभा निवडणुकीला तयार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या मते लोकसभेबरोबर निवडणुका घेतल्या गेल्यास त्यांच्या पक्षाला कसलाही धोका असणार नाही. एक गोष्ट खरी आहे की, मगोपची सदस्य संख्या २०१७ च्या निवडणुकीत केवळ तीनवर आली आहे. ती त्याच्या खाली येणार काय, असे विचारले जाते. परंतु या पक्षाचे दोन मंत्री - बाबू आजगावकर व दिपक पाऊसकर हे मगोपात फारसे खुश नाहीत. दोघांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांची सत्ता असेल तेथे जाण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे.

गोवा फॉरवर्ड या पक्षासमोर अस्तित्वाचे संकट आहे. हा पक्ष काँग्रेसने ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे स्वतंत्रपणे लढला व त्यांचे पहिल्यांदाच तीन सदस्य जिंकून आले. या काळात भाजपाला साथ दिल्यामुळे त्यांचा पारंपरिक ख्रिस्ती मतदार खवळला व तो पक्षाला धडा शिकविण्याची भाषा बोलतोय. परंतु या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी याकाळात एक नविनच रणनीती आखून मनोहर पर्रीकर यांच्या निकट जाणे पसंत केले. या पक्षाला लागलीच निवडणूक नको असली तरी तो काँग्रेसला नामोहरम करणारी नवी चाल खेळण्याची शक्यता आहे. मधल्या काळात काँग्रेसने गोवा फॉरवर्ड वगळता मगोपला आपल्या बाजूने वळविण्याचे बरेच प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा पदरात पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेसने चालविले आहेत. परंतु त्यांना फळ येत नाही. काँग्रेसने 'एकाला चलो' नीती स्वीकारली तर ती जोखीमच असेल. या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणालाच निवडणूक नको आहे. सारे पक्ष लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि त्यातल्या त्यात राजस्थान निवडणुकीचा निकाल काय लागतो यावरून ते राज्यात निवडणुकीचे आडाखे बांधणे चालू करणार आहेत. 
भाजपा निवडणुकीला सामोरी गेली तर चौदापैकी चारजण तरी जिंकून येतील का, हा प्रश्न आहे आणि मगोपाचे सुदीन ढवळीकर वगळता इतर दोघे निवडून येणे कठीण आहे. गोवा फॉरवर्डचे भवितव्य अनिश्चित आहे पण काँग्रेसचा प्रश्न आहे, तो या पक्षात नेत्यांची संख्या जास्त व कार्यकर्त्यांचा अभाव आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचे आहे. काँग्रेस सहज सत्तेवर येईल असे वातावरण बनले तर नेते एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याचीच शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये असेच घडून नेत्यांचा अहंकार व आत्मकेंद्रीपणा पक्षाला नडला होता. याचा अंदाज पक्षश्रेष्ठीना असल्याने मध्यावधी निवडणुकीचा आग्रह त्यांनी सोडून दिला आहे.


(लेखक गोवा लोकमतचे संपादक आहेत.)

Web Title: BJP's condition in Goa is poor, but mid-term election no one wants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.