बीडमध्ये ‘होल वावर इज आवर’
By Admin | Published: January 7, 2015 12:48 AM2015-01-07T00:48:02+5:302015-01-09T00:52:45+5:30
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात अन् स्वच्छतागृहे पाच या न जुळणाऱ्या गणितामुळे शहरात सध्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड
शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात अन् स्वच्छतागृहे पाच या न जुळणाऱ्या गणितामुळे शहरात सध्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. वाढती लोकसंख्या पाहता स्वच्छतागृहांची संख्या देखील वाढिवणे आवश्यक आहे. मात्र न.प.च्या उदासिनतेमुळे व दुर्लक्षामुळे संपूर्ण उघड्या परिसरात जणू न.प.नेच लघुशंका करण्याची अप्रत्यक्ष परवानगी दिली असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
संपूर्ण शहरातील नागरिकांकरिता केवळ पाच मुताऱ्या तर १७ सार्वजनिक शौचालये आहेत. शहराची लोकसंख्या वाढली मात्र स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या वाढली नाही. त्यामुळे शहरात वावरताना पुरूष-महिलांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबना होत आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात किती स्वच्छतागृहे आहेत याबाबत लोकमत ने सर्व्हेक्षण केले. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहिमेचा बोलबाला असला तरी स्वच्छतेचे मुळ असलेल्या स्वच्छतागृहाचांच विसर नगरपालिकेला पडत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, प्रशासकिय कार्यालये आदी ठिकाणी स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. मात्र जागोजागी स्वच्छतागृहे नसल्याने नागरिक उघड्यावरच लघुशंका करताना दिसत आहे. तर महिलांकरिता शहरात एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे नगरपालिकेत जरी महिलाराज असले तरी शहरात वावराताना महिलांनाच मुलभूत सोई-सुविधा दिल्या जात नाहीत. शहरात पेठ बीड भागात १, शिवाजी नगर येथे २ तर सुभाष रोड या मध्यवर्तीच्या ठिकाणी केवळ २ स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे. त्यामुळे शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य झाले आहे. न.प.ला स्वच्छतेचे कोणतेही गांभीर्य नसून नागरिकांनाच स्वच्छतेविषयीचे डोस दिले जात आहेत. शहरातील २ लाख नागरिकांकरिता केवळ ५ स्वच्छतागृहे तर १७ शौचालये आहेत.
स्वच्छतागृहे हे किमान पंधरा दिवसांतून तरी स्वच्छता करणे हे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे काम सफाई कामगारांकडे वर्ग करण्यात आले आहे. याकडे न.प. चे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी शहरात अणखीण ४० स्वच्छतागृहे तर २५ शौंचालये आवश्यक आहे. मात्र न.प. कडून याबाबत कोणताही निर्वाळा मिळालेला नाही.
प्रत्येक विभागाअंतर्गत स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याचे नगरसेविका जयश्री विधाते, वैशाली अंबेकर यांनी सांगितले. याबाबत नगराध्यक्षा यांना विचारले असता नो कॉमेंट च्या पवित्र्यातच राहणे त्यांनी पसंद केले.
कधी होणार सुधारणा
बीड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न काही केल्या मार्गी लागायला तयार नाही. नागरीक स्वच्छतेबद्दल समस्येचा पाढा वाचून दाखवतात तर पालीका याकडे दुर्लक्ष करते, अशा या चक्रामध्ये मात्र समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कधी मार्गी लागणार आणि पालीका कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोठे असावे शौचालय ?
शौचालय कोणत्या ठिकाणी असावे, यासंदर्भात पालीकेला नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. रहदारी असावी, प्रायव्हेट व्यवसायीक नसावे यासारखे नियम पालीकेला घालून दिले आहेत़