चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
By Admin | Published: July 28, 2014 12:46 AM2014-07-28T00:46:33+5:302014-07-28T01:04:02+5:30
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या कौशल्याला संधी देणाऱ्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबने आयोजित केलेल्या स्पर्धेत येथील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या कौशल्याला संधी देणाऱ्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबने आयोजित केलेल्या स्पर्धेत येथील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. २७ जुलै रोजी येथे झालेल्या सर्वांत मोठ्या अशा या स्पर्धेत जवळपास ३७०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
स्पर्धा गट ‘ए’ - (पहिली ते चौथी), गट ’बी’ - (पाचवी ते सातवी) आणि गट ‘सी’ - (आठवी ते दहावी) अशा गटांत झोननिहाय विविध शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा ज्ञानदा स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल, तनवाणी इंग्लिश स्कूल, तापडिया इनोव्हेशन स्कूल, स्वामी विवेकानंद अकॅडमी, एजीपी पब्लिक स्कूल, आॅर्किड स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, तसेच लोकमत भवन येथे घेण्यात आली.
प्रत्येक गटासाठी देण्यात आलेले विषय असे होते. ‘ए’ गट - माझा आवडता ऋतू पावसाळा, ‘बी’ गट - पाण्यात तरंगती होडी, ‘सी’ गट - पर्यावरणाचे संवर्धन. चित्र काढण्यासाठी लागणारे ड्रॉर्इंग शीट ‘लोकमत’ तर्फे देण्यात आले होते. स्पर्धकांनी विचार करून अतिशय उत्कृष्ट चित्रे काढली व रंगविली.
चिमुकल्या स्पर्धकांच्या पालकांचीही ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आपल्या पाल्याने सुंदर चित्र काढावे यासाठी काही पालक सूचनाही करीत होते. त्यांची चित्रे काढून होईपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पालक त्यांची वाट बघत उभे होते. वॉटर कलर, पेन्सिल कलर, रंगपेटी, खडू यांचा स्पर्धकांनी छान वापर केला व वेळेच्या आत चित्र पूर्ण करण्याची धडपड केली.
अनेक चित्रे सुबक होती की परीक्षकही काही वेळ संभ्रमात पडले होते. स्पर्धेचे असोसिएट स्पॉन्सरर केम्ब्रिज चॅम्पस प्री-स्कूल होते.
स्पर्धा दहा वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. तेथे प्रा. उदय भोईर, संतोष थोरात, प्रा. आसोलकर, परेश चव्हाण, अनिल बावणे, श्रद्धा कनक, राम चौरे, सूर्यवंशी, एल्डीन फर्नांडिस, विनोद भोरे, ऋषिकेश गवळी, छाया ब्राह्मणे, नितीन बोर्डे, सीमा सोनवणे, तपस्वी पाठक, गणेश माटे, गणेश सोनवणे, रोहिणी खोपडे, पूजा गार्डे यांनी परीक्षण केले.
विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश...
बेसुमार होणारी वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर, वायू, जलप्रदूषणाच्या समस्येमुळे आगामी काळात ग्लोबल वार्मिंगचा धोका निर्माण होणार आहे.
वृक्षतोड थांबवा, सौर ऊर्जेचा वापर करा, प्रदूषण कसे कमी करता येईल, पाण्याचा, कचऱ्याचा फेरवापर कसा करता येईल आणि या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, पृथ्वीचे संवर्धन करता येईल हे विद्यार्थ्यांनी विविध चित्रांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला.