काही करत नसाल तर निदान मुले तरी जन्माला घाला; साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला अजब सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:15 PM2018-02-19T17:15:39+5:302018-02-19T17:46:25+5:30
इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्याण्यासाठी हिंदुंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला.
औरंगाबाद : इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला. जनुभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर डॉ. विभाश्री, अंबरीश महाराज, नवनाथ महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, शिवाजी शेरकर, संजय बारगजे आदी उपस्थित होते.
संत तुकाराम नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भरण-पोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या न वाढल्यास आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका येईल, असा इशाराही त्यांना दिली.
शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्न केले तरी चालेल, असे वक्तव्य केले. मुलांना बहीण-भाऊ नसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून आत्महत्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढत त्यांनी मुलांची संख्येवरून वाद होणे योग्य नसल्याचे म्हटले.