औरंगाबाद जिल्ह्यात दररोज १८२ बालकांचा जन्म, मुलींच्या जन्मदरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:13 AM2018-07-11T01:13:09+5:302018-07-11T01:15:05+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या १९५१ मध्ये ११ लाख ७९ हजार ४०४ इतकी होती. २०११ मध्ये ती ३६ लाख ९५ हजार ९२८ इतकी झाली, तर आता ही लोकसंख्या तब्बल ४० लाखांवर गेली आहे.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या १९५१ मध्ये ११ लाख ७९ हजार ४०४ इतकी होती. २०११ मध्ये ती ३६ लाख ९५ हजार ९२८ इतकी झाली, तर आता ही लोकसंख्या तब्बल ४० लाखांवर गेली आहे. गेल्या ६७ वर्षांत तब्बल साडेतीन पटीने जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. मागील सहा वर्षांत अतिशय गतीने वाढ झाली असून, ती तब्बल चार लाखांची आहे. जिल्ह्यात दररोज १८२ बालकांचा जन्म होत आहे.
११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, त्यासाठी उपाय सुचवणे हा त्यामागील उद्देश आहे. औरंगाबाद शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. चिकलठाणा, रेल्वेस्टेशन आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आणि शहराचा विकास व विस्ताराला गती मिळाली. १९८० ते १९९० च्या कालावधीत रोजगार, उद्योग, व्यवसायासाठी खेड्यापाड्यांतून आलेल्यांनी औरंगाबादेत संसार थाटले. पडेगाव, वाळूज, सातारा, देवळाई, हर्सूल, शेंद्रा अशा चारही दिशांनी शहर वाढले. डोंगरांच्या पायथ्यापर्यंत वसाहती निर्माण झाल्या. परिणामी लोकसंख्याही झपाट्याने वाढत गेली. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीच्या माध्यमातून आगामी कालावधीत शहराची आणखी वाढ होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांची लोकसंख्या प्रत्येकी ३ लाखांवर गेली आहे. सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांनी १ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या सहा वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचे हे घड्याळ औरंगाबाद जिल्ह्यात दररोज १८२ वर बालक जन्मास येत असल्याचे दर्शवत आहे. वर्षाकाठी जिल्ह्यात ६६ हजारांवर बालकांचा जन्म होत आहे.
लोकसंख्या वाढीबरोबर नवनवीन प्रश्न उभे राहत आहेत. मुलींच्या जन्मदराबाबत मात्र अजूनही समाजात अधिक जनजागृतीची गरज असल्याचे दिसत आहे.