औरंगाबाद शहराला फक्त नालेच बुडविणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:10 PM2018-06-04T12:10:15+5:302018-06-04T12:27:06+5:30

शहरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित.

Aurangabad city will only douse the nalla ...! | औरंगाबाद शहराला फक्त नालेच बुडविणार...!

औरंगाबाद शहराला फक्त नालेच बुडविणार...!

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या थोड्याशा पावसानेच महापालिकेचे पितळ उघडे पडले. शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत.

औरंगाबाद : शहरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत. हे चित्र आपली महापालिका उघड्या डोळ्याने बघत असली तरी ठोस उपाययोजना करायला तयार नाही. उलट १ कोटी ७० लाख रुपये खर्च करून नालेसफाईचे निव्वळ नाट्य रंगविण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या थोड्याशा पावसानेच महापालिकेचे पितळ उघडे पडले. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे.

रविवारी सकाळी महापालिका पदाधिकारी व आयुक्तांतर्फे शहरातील नाल्याच्या पाहणीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्तांनी ऐनवेळी या मोहिमेतून अंग काढून घेतले. महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांच्यासह अधिकाऱ्यांचा फौजफाटा महापौर बंगल्यावरून नालेसफाईची पाहणी करण्यास निघाला. पदाधिकारी येणार असल्याने अगोदरच महापालिकेची यंत्रणा ठिकठिकाणी अलर्ट होती. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी दरवर्षीचे काही स्पॉट ठरलेले आहेत. याला राजकीय भाषेत पिकनिक स्पॉटही म्हणतात. 

रविवारी सकाळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा ताफा पदमपुरा भागातील दिवेकर आॅटोसमोरील नाल्याजवळ पोहोचला. येथील अरुंद नाला मागील १२ ते १३ वर्षांपासून उघडलाच नव्हता. या नाल्यावरील एका ढाप्याचे वजन १ टनापेक्षा जास्त आहे. क्रेन लावून ढापे काढण्यात आले. नाला गाळाने पूर्णपणे चोकअप झाला होता. कंत्राटदाराने अत्यंत मन लावून नाल्याची सफाई केल्याचे दिसून येत होते. 
येथून पाहणी दौरा थेट महापालिका मुख्यालजवळील नूर कॉलनीत पोहोचला. तेथील परिस्थिती अत्यंत विदारक होती. मनपाने नाल्यातच पाईप टाकले आहेत. त्यामुळे आसपासच्या घरांमध्ये दरवर्षीच पाणी साचते. पाईप काढून नाल्याशेजारी राहणाऱ्यांना अलर्टची नोटीस देण्याचे आदेश महापौरांनी दिले. नारळीबाग भागात माणसे लावून नाला साफ करण्याचे आदेश दिले. येथे एका पोकलेनच्या साह्याने नाल्यातील गाळ काढून काठावरच टाकण्यात येत होता. मोठा पाऊस आल्यास गाळ आपोआप वाहून जातो. १ कोटी ७० लाख रुपयांचे काम घेणारा कंत्राटदार परत नालेसफाईचा दावा करायला ‘मोकळा’ होतो. 

किलेअर्क येथील नाल्याची अवस्था पाहून पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले. नाल्यात थर्माकोल, कचरा, गाळ साचल्यामुळे व अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी जाण्यास जागाच नाही. नाल्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना यंदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. टिळकपथ भागातील औषधी भवन येथील नाल्याची अवस्था बघताना तर धडकीच भरत होती. 
नाल्यात थर्माकोल, केचरकचरा एवढा होता की, पाणी पुढे कसे जाईल हा सर्वात मोठा प्रश्न होता. येथे जेसीबी, पोकलेनही जाऊ शकत नाही. औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मनपाला नाला साफ करण्यासाठी पाच लाख रुपये दिले. या निधीत काय होणार, असा प्रश्न मनपाला पडला आहे. न्यू उस्मानपुरा, गारखेडा, जयभवानीनगर चौक या भागातील नाल्यांचीही पाहणी करण्यात आली.

निविदेच्या अटी धाब्यावर
मनपाने शहरातील नालेसफाईसाठी कंत्राटदार नेमला आहे. ९ झोनमध्ये एकच कंत्राटदार काम करणार आहे. या कंत्राटदाराने जेसीबी, पोकलेन, टिप्पर आदी साहित्य आणावे, अशी अट निविदेत टाकण्यात आली आहे. कंत्राटदाराची किमान १०० वाहने असावीत, असे म्हटले आहे. कंत्राटदाराने रविवारी निव्वळ कारवाईचे ढोंग रचत ११ जेसीबी, ४ पोकलेन आणले.

अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
शहरातील १८ प्रमुख नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेकडे नाल्यांची लांबी, रुंदी आदी माहिती आहे. महाालिका नाल्यांवरील अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करीत आली आहे. नाल्याशेजारील मतांवर डोळा ठेवून राजकीय मंडळी कारवाई करू देत नाहीत. प्रशासनालाही कारवाईचा बराच आळस येतो. अतिक्रमणांचा फटका यंदा बसण्याची शक्यता आहे.

नालेसफाईलाच नागरिकांचा विरोध
नूर कॉलनी, नारळीबाग येथील नागरिक नालेसफाईलाच विरोध करीत आहेत. रमजान  महिना सुरू असून, आमच्या घरासमोर घाण नको असे नागरिकांचे म्हणणे असल्याची ओरड अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांसमोर केली. गांधीनगर भागात तर मनपाच्या कंत्राटदाराला कामच करू देत नाहीत. येथे पोलीस बंदोबस्त मागवून काम करावे, अशा सूचना मनपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाळ्यात अतिक्रमणे न काढता सखल भागातील नागरिकांना स्थलांतर करणे, अतिवृष्टीचा इशारा देण्याचे काम मनपातर्फे करण्यात येणार असल्याची माहितीही महापौरांतर्फे देण्यात आली.

Web Title: Aurangabad city will only douse the nalla ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.