...आणि आरटीओंना समजल्या अडचणी
By Admin | Published: June 22, 2016 12:34 AM2016-06-22T00:34:02+5:302016-06-22T00:53:46+5:30
औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते
औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते. मात्र, जेव्हा खुद्द आरटीओंनाही त्याचा फटका बसतो तेव्हा प्रवाशांच्या अडचणींची जाणीव होते. तेव्हा कुठे त्यांनी ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पाऊल उचलले.
अनेकदा ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून मनमानी कारभार केला जातो. त्यातून प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. एसी बंद करणे किंवा अचानक एसी वाढविणे, लघुशंका, इतर कारणासाठी बस न थांबविणे अशा समस्यांना अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. या प्रकारांची ऐन प्रवासात तक्रार करावी कोठे, असा प्रश्न प्रवाशांसमोर असतो. आरटीओ कार्यालयाकडून खाजगी बसेसविरुद्ध कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. एका ट्रॅव्हल्समधून नुकतेच आरटीओंना चालकाच्या गैरवर्तनाचा अनुभव आला. मुंबई येथील बैठकीसाठी ते ट्रॅव्हल्स बसमधून निघाले होते. यावेळी काही प्रवाशांनी महत्त्वाच्या कामासाठी बस थांबविण्याची विनंती चालकाकडे केली. परंतु चालकाने दुर्लक्ष करून काही अंतरावर बस नेऊन थांबविली.
प्रवाशांनी विनंती केल्यावरही बस का थांबविली नाही, याबाबत आरटीओंनी चालकाला विचारणा केली. त्यावेळी चालकाने थेट त्यांच्याशीही अरेरावी केली. मुंबईहून परत येताच त्यांनी प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याची तक्रार नोंदवून संबंधित ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारला.
ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना आलेल्या अनुभवानंतर आरटीओंना प्रवाशांच्या व्यथा कळाल्या. परंतु नियमितपणे कारवाई झाल्यास ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभारावर कायमचा चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.