चिमूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:44 PM2017-08-16T23:44:33+5:302017-08-16T23:48:01+5:30
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरची क्रांती सुवर्ण अक्षराने नोंदविली आहे. पारतंत्रातही स्वातंत्र्याचा पहिला झेंडा चिमूरमध्ये फडकला.
राजकुमार चुनारकर/अमोद गौरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरची क्रांती सुवर्ण अक्षराने नोंदविली आहे. पारतंत्रातही स्वातंत्र्याचा पहिला झेंडा चिमूरमध्ये फडकला. यासाठी कित्येक लोक शहीद झाले. या शहिदांना व स्वातंत्र्यविरांना नमन करण्यासाठी आलो असून चिमूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीे.
चिमूर क्रांती शहिदांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी या क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी आयोजीत केलेल्या शहीद स्मृती दिन सोहळा २०१७ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री अम्बरीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. मितेश भांगडिया, आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी राज्यमंत्री संजय देवतळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पा राचलवार आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाचा राष्ट्रीय प्रकल्प असलेला गोसेखुर्द प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाची किंमत ३७२ हजार कोटी होती. मात्र आज या गोसेखुर्द प्रकल्पाची किंमत १८ हजार ७४९ कोटी झाली आहे. हा प्रकल्प हनुमानाच्या शेपटीप्रमाणे सपंतच नव्हता. मात्र आमच्या सरकारने हा प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करून विदर्भातील इतर सिंचन प्रकल्पही पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.
चिमूर येथील क्रांतीकारकांनी केलेली क्रांती भारत कधीही विसरणार नाही. कारण या भूमीने देशात प्रथम तिरंगा फ डकाविण्याचा मान मिळविला आहे. क्रांती काय असते, हे चिमूरकरांनी दाखवून दिले आहे. देशाला स्वराज्य मिळाले. मात्र सुराज्य प्राप्त झाले नाही. जोपर्यंत सुराज्य प्राप्त होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चिमूर शहीद स्मृती दिन संकल्प दिवस आहे. मागील सरकारने जे प्रश्न निर्माण केलेत, त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही सत्तेवर प्रेम करणारे नाही तर सत्यावर प्रेम करणारे आहोत. यावेळी ना.गिरीष महाजन, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडीया, आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची समायोजित भाषणे झाली.