नरेगांतर्गत ८८५ विहिरींची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:12 AM2017-11-28T00:12:18+5:302017-11-28T00:12:46+5:30
जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी नरेगाअंतर्गत बोअरवेलसह विंधन विहिरींचे बांधकाम करण्यात येते.
इंद्रपाल कटकवार ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी नरेगाअंतर्गत बोअरवेलसह विंधन विहिरींचे बांधकाम करण्यात येते. मात्र जिल्ह्यात ८८५ विहिरींची कामे अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी सदर कामे पूर्ण करण्याचे सुचना दिल्या आहेत.
धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत (नरेगा) भंडारा जिल्ह्यातील एकूण ४०८३ (एमआयएस)विहिरींचे बांधकाम करायचे आहे. त्यापैकी २५५१ सिंचन विहिरींचे बांधकाम झाले आहे. प्रत्यक्षात मात्र तांत्रिक बाबींमुळे सद्यस्थितीत सातही तालुक्यातील ८८५ विहिरींचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहेत. सदर कामे उन्हाळयापूर्वी होणार काय असा सवाल आहे.
विदभार्तील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २००६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकºयांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली.
तसेच धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण आणि प्रगतीपथावरील सिंचन विहिरी वगळता शिल्लक असलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अनियमित, अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकºयांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत करण्यात येते.
नागपूर विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात भूगर्भात पाण्याची अधिक उपलब्धता असूनही विहिरींची संख्या कमी असल्याने सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची खंत नेहमी व्यक्त केली जाते. उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता या ठिकाणी शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात विहिरी घेण्यात याव्यात, असे शासनाचे निर्देशही आहेत.
नरेगांतर्गत ८८५ विहिरींपैकी ६३६ विहिरींच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसारच कामे सुरू आहेत.
-मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी
रोहयो तथा पुनर्वसन विभाग, भंडारा