नळाला गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:15 AM2019-04-19T00:15:59+5:302019-04-19T00:17:20+5:30

शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही.

Turbulent water | नळाला गढूळ पाणी

नळाला गढूळ पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारा शहर : नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरु असला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर जीवनवाहिनी वैनगंगा नदी असतांना शहरवासीयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. घरटॅक्स नियमित भरत असल्याने नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह विविध सुविधा नगर परिषद प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. परंतू अद्याप तरी लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षीतपणाने शहरवासीयांना पाण्याची समस्या कायमच भेडसावित आहे.
शहरातील अत्यंत नावाजलेल्या खात रोड परिसरात वैशाली नगर, केशव नगर, मातृस्मृती नगर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पायपीट करावी लागत आहे. अनेकजण बोअरवेल खोदत आहेत. परंतू ३०० फुटापर्यंतही पाणी नसल्याने बोअरवेलचाही कोणताही उपयोग होत नाही. भूजल पातळी खालावली असताना प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. राज्यशासनाकडून पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसतात. परंतू भंडारा नगर परिषदेकडून मात्र याबाबत कोणतीही जनजागृती झालेली दिसत नाही. त्यातच शहरात असणारी झाडांची मर्यादीत संख्या वाढते तापमान व दरवर्षीच भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहे. शहरालगतच्या भागात सार्वजनिक नळांवर महिलांची गर्दी वाढत असल्याने तिथे त्यांना आपसात भांडण करावा लागत असल्याचे पण चित्र दिसत आहेत. पाण्यासाठी महिला पुरुष आपल्या छोट्या मुलांना सुद्धा बोअरवेल, सार्वजनिक नळ, विहिरीवर नेत असल्याचे बोलके चित्र आहे.
शहरालगतच्या भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाऱ्याने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
नाग व कन्हानच्या दूषित पाण्याचा फटका
जीवनदायीनी वैनगंगेचे पाणी नागनदी व कन्हान नदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आणि कित्येक वर्षापासून वैनगंगेच्या पाण्यावर जीवन जगून आयुष्यभर तृष्णा भागविणारे तरुण, म्हातारे व महिलासुद्धा वैनगंगेच्या पाण्याकडे वाकडी नजर करून आर.ओ. महागड्यावर जीवन कंठीत आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या सणासमारंभापासून घरगुती दैनंदिन पाणी पिण्यासाठी सुद्धा आर.ओ. चे पाणी महागात खरेदी करून पिण्याची फॅशनच झाल्यासारखे दिसते.
प्रशासनाचा हलगर्जीपणा
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यंदा मार्च महिन्यात शहराचा टंचाई आराखडा तयार करुन वॉर्ड निहाय परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागात पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. प्रशासनाना केवळ बोअर अधिक प्राध्यान्य दिले जात आहे. परंतू तात्पूरत्या नळ दुरुस्तीसह इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायम स्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासनाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
उंच भागात अल्प पाणी
शहरात असणा-या तलावात, विहिरीत पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात उंच भागात तर पाणी पुरवठाच होत नाही तर काही भागात अल्प पाणी येत आहे तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरड सुरु आहे.

Web Title: Turbulent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.