भंडारा शहरातील २८ तलाव व बोडींचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:08 AM2019-04-28T00:08:13+5:302019-04-28T00:08:45+5:30

देशात तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात तब्बल २८ तलाव व बोडी अस्तित्वात आहेत. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

The existence of 28 lakes and bodies in the Bhandara city is in danger | भंडारा शहरातील २८ तलाव व बोडींचे अस्तित्व धोक्यात

भंडारा शहरातील २८ तलाव व बोडींचे अस्तित्व धोक्यात

Next
ठळक मुद्देसंरक्षणाकडे दुर्लक्ष । तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी जिल्हा सुधार समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात तब्बल २८ तलाव व बोडी अस्तित्वात आहेत. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या तलावांची योग्य देखभाल दुरुस्ती केली नाही तर भंडारा शहरातील तलाव लुप्त होण्याची भीती आहे.
भंडारा शहरात मोठ्या संख्येत असलेल्या या तलावांमुळे विहिरींना मुबलक पाणी होते. हिवाळ्यात विदेशी पक्षी तलावावर विहार करीत असायचे. त्यासोबतच तापमानावरही नियंत्रण राहायचे. या तलावांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने आता बोटावर मोजण्याइतके तलाव शिल्लक आहेत.
शास्त्री नगर परिसरात नवतलाव हा २७ एकरात पसरलेला आहे. त्यावरुन एकेकाळी सिंचन होत होते. या तलावावर खासगी मालकी सांगून अवैध पद्धतीने कोरडे पाडण्यात आले. आता हा तलाव केवळ पाच एकराचा उरला आहे. या तलावात प्लॉट पाडून विकण्याचा घाट काहींनी घातला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि डॉ.माधवी खोडे यांच्या हस्तक्षेपाने हा प्रयत्न हाणून पाडला होता.
मिस्कीन टँक हा १६.१ एकरात असून आता हा तलाव केवळ ६ एकर उरला आहे. २०१४ मध्ये ५०० ट्रॅक्टर भरण टाकून अवैध वस्ती विस्तारीत करण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात भंडारावासीयांनी आंदोलन केले. परिसरातील वस्तीचे घाण पाणी या तलावात सोडले जाते. या तलावाच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम या तलावाचे मोजमाप करण्याची गरज आहे.
डॉ.व्यास हॉस्पीटल जवळ असलेली बोडी बुजविण्यात आली असून जकातदार शाळेजवळील जोगीतलाव, सहकार नगराजवळील बोडी, पोलीस ग्राउंडलगतचा तलाव सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तलावांचे अस्तित्व वाचविण्यासाठी आता भंडारा जिल्हा सुधार समितीने पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या निवेदनावर अध्यक्ष डॉ.नितीन तुरस्कर, विजय खंडेरा, प्रतीक तांबोळी, विकास मदनकर, शीतल तिवारी, अ‍ॅड.शिशीर वंजारी, अजय मेश्राम, शैलेश श्रीवास्तव, नितीन कुथे, विजय निचकवडे, संजय मते, मयूर बिसेन आदींच्या स्वाक्षºया आहेत.
शहराचे वैभव खांब तलाव
महानुभाव पंथाच्या पवित्र लीळाचरित्र ग्रंथात उल्लेख असलेला खांब तलाव शहराचे वैभव आहे. ९०० वर्षे प्राचीन या तलावाला चक्रधर स्वामींचा पदस्पर्श लाभला आहे. तलावाच्या काठावर विविध देवळे आहेत. त्यामुळे या परिसराला धार्मीक महत्व आहे. २००४ ते २००९ दरम्यान राष्ट्रीय समविकास योजनेअंतर्गत खांब तलावाचे चुकीच्या पद्धतीने सौंदर्यीकरण करण्याचा आरोप आहे. पाण्याचा येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. तलाव बंदीस्त झाला. या तलावाचा मुळ आकार कमी झाला. यानंतर वर्षभरापूर्वी एमटीडीसी तर्फे सुरु असलेल्या कामामध्ये तलावाचा आणखी आकार कमी झाला आहे. प्रवाह सुरु ठेवण्यासाठी छिद्रे ठेवण्याची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Web Title: The existence of 28 lakes and bodies in the Bhandara city is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी