Varah Jayanti 2022: आज वराह जयंती; जाणून घ्या या अवताराचे वैशिष्ट्य आणि त्यामागील सखोल विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 04:21 PM2022-08-30T16:21:03+5:302022-08-30T16:21:22+5:30

Varah Jayanti 2022: 'वराह'चा शब्दशः अर्थ न घेता त्या अवताराची पार्श्वभूमी जाणून घ्या!

Varah Jayanti 2022: Today is Varah Jayanti; Know the features of this avatar and the deep thought behind it! | Varah Jayanti 2022: आज वराह जयंती; जाणून घ्या या अवताराचे वैशिष्ट्य आणि त्यामागील सखोल विचार!

Varah Jayanti 2022: आज वराह जयंती; जाणून घ्या या अवताराचे वैशिष्ट्य आणि त्यामागील सखोल विचार!

googlenewsNext

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराह जयंती (Varah Jayanti 2022) असते. ती आजचीच तिथी!

नील वराहाचा अवतार हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता. तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रहायला जागाच शिल्लक नव्हती. महाप्रलय आला होता. सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वने सुकली. समुद्राचे पाणीपण आटले. ज्वालामुखी जागृत झाले. अतीव उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचे ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला. त्यातच वादळे झाली आणि बघता बघता सर्व पृथ्वी जलमय झाली.

हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली. त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या वि़ष्णूला अवतार घेण्यास सांगितले. आणि मग विष्णूने नील वराहाच्या रूपात प्रकट होऊन पृुथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला. पुराणकार म्हणतात की या काळात नील वराह आपली पत्नी नयनादेवीच्या बरोबर संपूर्ण डुक्करसेना घेऊन आला होता. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लत्ताप्रहारांनी, दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले. त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले.  त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने, पुष्करिणी व सरोवर निर्माण झाले. लतावृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले. पृथ्वीचे आणि समस्त जीवांचे रक्षण करणाऱ्या वराह अवताराची आज जयंती निमित्त पूजा केली जाते. 

परंतु अनेक जणांचा गोंधळ होतो. वराह अवतार म्हणजे डुक्कर नाही किंवा जंगलात राहणारा रानडुक्कर देखील नाही. वेंगुर्ल्याचे भूषण दिगंबर जोशी या अवताराबद्दल लिहितात, वराह अवताराचे पूर्ण नाम यज्ञवराह आहे. भागवत महापुराणात या यज्ञवाराहाचे वर्णन आलेय.

जितंते जितंते तेऽजित यज्ञभावन त्रयी तनुं त्वां परिधुन्वते नम:।
यद्रोमगर्तेषु निलिल्युरध्वरा स्तस्मै नम: कारणसूकराय ते।। 

ऋषि म्हणतात, भगवान अजित आपला जयजयकार असो हे यज्ञपते आपले वेदत्रयीरूप शरीर थरथरवीत आहात, आपणास नमस्कार असो आपल्या रोमरोमात सर्व यज्ञ समाविष्ट आहेत पृथ्वीला वर आणण्याकरता वराह रूप धारण केलेल्या आपणाला नमस्कार असो.

हे रुप दुराचारी लोकांना दिसणार नाही कारण हे यज्ञरुप आहे. याच्या त्वचेत गायत्री छंद, रोमांमध्ये कुश, डोऴ्यांमध्ये तूप, चार चरणांमध्ये होता, उद्गाता, अध्वर्यु व ब्रह्मदेव हे चार ऋत्विज आहेत.

सुक्र तुण्ड आसीत्स्रुव ईश नासयो रिडोदरे चमसा:कर्णरन्ध्रे।
प्राशित्रमास्ये ग्रसने ग्रहास्तु ते यच्चवर्णं ते भगवन्नग्निहोत्रम्।।

हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी स्रुक (यज्ञात तूप घालण्याची पऴी) नासिका छिद्रात स्रुवा (पऴीचाच एक प्रकार) पोटात इडा म्हणजे यज्ञीय भक्षण पात्र, कानामधे चमस पात्र, मुखामधे प्राशित्र (ब्रह्मभाग पात्र) व कंठ छिद्रात ग्रह म्हणजे सोमपात्र आहे व आपण जे चर्वण करत आहात ते अग्निहोत्र आहे. 
यज्ञ स्वरुपात विविध अवतार घेणे हे दिक्षणीय इष्टि (यज्ञ) आहे, आपली मान  ही उपसद आहे (तीन इष्टि) , दोन्हि दाढा या प्रायणीय व उदयनीय (दीक्षा ग्रहणानंतर व यज्ञ समाप्ती) ची इष्टि आहे. जीभ हे प्रवर्ग्य आहे, मस्तक हे सभ्य (होमरहित अग्नि) व आवसथ्य आहे व प्राण हे इष्टिकाचयन आहे.

(श्रौतयज्ञात विविध प्रकारचे इष्टि नामक यज्ञ असतात पंचाग नीट काऴजीपूर्वक पाहिले तर प्रतिपदा तिथी च्या पुढे "इष्टि " असे दिलेले आढऴेल. अग्निहोत्री ब्राह्मण या दिवशी यज्ञ करतात)

देवा आपला पराक्रम (वीर्य)  हे सोम आहे, आपले आसन हे प्रात:सवनादी तीन सवन आहेत, शरीरातले सप्तधातू हे हे अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम उक्थ , वाजपेय, षोडशी, अतिरात्र व अप्तोर्याम असे सात श्रौत यज्ञसंस्था आहेत. शरीराचे सर्व सांधे हे सत्र यज्ञ आहेत व अशा रुपातले आपण संपूर्ण यज्ञ स्वरुप (सोम रहित) व क्रतू (सोम सहित) यज्ञ रुपच आहात. यज्ञ इष्टि या आपल्या मांसपेशी आहेत.

 गाय, बैल, सर्प, मत्स्य, कूर्म, वराह सर्व प्राणिमात्रांत ईश्वरच भरलाय हे आमचा धर्म शिकवतो त्यामुऴे आम्ही त्यांना पूजतो. यज्ञवराह हा भगवंतांचा अवतार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे.त्याचा नैवेद्य अन्न हे यज्ञात समर्पण करण्यात येणारे हविर्द्रव्य आहे. भगवान महाविष्णु हे प्राणिमात्रांविषयी अत्यंत कनवाळू आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह हे अवतार याचे प्रतिक आहेत त्याच सोबत राम अवतारात जटायु, व वानर सेना, जांबुवंत  या सर्वांवर भगवंतांनी कृपा केली होती. श्रीकृष्ण हे स्वत:च्या नावामागे "गोपाल" म्हणजे गायींचे पालन करणारा असे बिरुद मिरवत असत.हे समस्त देव प्राण्यांविषयी कनवाऴुच आहेत. हत्ती, मोर, नंदि, मूषक, सिंह व्याघ्र असे प्राणी आमच्या देवतांची वाहने आहेत आम्ही देवतांसोबत त्यांचे देखील पूजन अवश्य करतो. हिंदू धर्म आम्हास भगवंत सर्वत्रच आहेत ही दृष्टि देतो. 

Web Title: Varah Jayanti 2022: Today is Varah Jayanti; Know the features of this avatar and the deep thought behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.