वीटभट्ट्यांचा कहर, कोंडेश्वर जंगल भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:22 AM2018-12-24T01:22:08+5:302018-12-24T01:22:37+5:30

अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वीटभट्ट्यांचा धूर अन् धुळीने शहरवासीय तर त्रस्तच आहेच. पण, कोंडेश्वर जंगलदेखील भकास केल्याचे वास्तव आहे. एकीकडे शासन वनस्पतींच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपए खर्च करीत असताना स्थानिक प्रशासनच त्याला फाटा देत असल्याचे ज्वलंत उदाहरण श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान परिसरात दिसून पडते आहे.

Wreckage, Kondeshwar Jungle Bhakas | वीटभट्ट्यांचा कहर, कोंडेश्वर जंगल भकास

वीटभट्ट्यांचा कहर, कोंडेश्वर जंगल भकास

Next
ठळक मुद्देधूर अन् धुळीने आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे अभय, कारवाई होणार का?

श्यामकांत सहस्त्रभोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वीटभट्ट्यांचा धूर अन् धुळीने शहरवासीय तर त्रस्तच आहेच. पण, कोंडेश्वर जंगलदेखील भकास केल्याचे वास्तव आहे. एकीकडे शासन वनस्पतींच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपए खर्च करीत असताना स्थानिक प्रशासनच त्याला फाटा देत असल्याचे ज्वलंत उदाहरण श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान परिसरात दिसून पडते आहे.
बडनेरा शहरालगत तसेच कोंडेश्वर एमआयडीसी अंजनगाव बारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. अलीकडे वीटभट्ट्या बऱ्याच वाढल्या आहेत. पूर्वी मोजक्याच वीटभट्ट्या होत्या. वाढलेल्या वीटभट्ट्या सर्रास मार्गालगतच उभारण्यात आल्या आहेत. दुतर्फा असणाऱ्या वीटभट्ट्यांमुळे मार्गावरून जाणाºया पायदळ तसेच वाहन चालकांना धूर व धुळीचा प्रचंड मनस्ताप, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची ओरड आहे. बऱ्याच वीटभट्ट्या वनविभागाच्या हद्दीत आहेत. त्याच्या धुराने व धुळीने कोंडेश्वर जंगल भकास झाल्याचे वास्तव आहे. पूर्वी कमी वीटभट्ट्या होत्या. त्याही शहरापासून व जंगलापासून दूर होत्या. त्याचा फारसा त्रास जाणवत नव्हता. अलीकडे या व्यवसायात अनेक जण उतरल्याने शासन नियम धाब्यावर बसविले जात आहे. कोंडेश्वर जंगलालगतच्या वीटभट्ट्यांमुळे जंगल भकास झाले आहे. वनविभाग, महसूल विभाग व प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षामुळेच असे चित्र समोर येऊ लागले आहे.
एकमेव चिमणी भट्टा
कोंडेश्वर मार्गावर एकमेव चिमणी भट्टा आहे. त्याचा धूर हवेत विरतो. मात्र असंख्य वीटभट्ट्या विना चिमण्यांच्याच सुरू आहेत. त्याचे प्रदूषण शहराला व जंगलासाठी धोकादायक ठरत आहे. प्रदूषण विभाग झोपेत असल्यासारखेच काम करीत असल्याचे त्रस्त नागरिकांकडून व वन्यप्रेमी मध्ये बोलल्या जात आहे.

महसूल विभागाचा वरदहस्त, ठोस पावले उचला
प्रशासनाची भीती न बागळगता राजरोसपणे अगदी रस्त्याच्या दुतर्फा वीटभट्ट्या उभारण्यात आल्या. महसूल विभागाचे यावर नियंत्रण असायला पाहिजे. मंडळ अधिकारी व तलाठी नेमके यासाठी करतात तरी काय? त्यांच्यावर कृपा कुणाची. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या हटविल्यास कोंडेश्वर देवस्थानात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल. एमआयडीसी व अंजनगाव बारी मार्गावरून मोठ्या संख्येत नागरिक जात असतात. त्यांनादेखील शारीरिक इजांपासून दिलासा मिळेल.

वीटभट्ट्यांना विरोध नाही, नियमाने चालवा
घरकामांसाठी वीटभट्ट्या असणे जरुरी आहे. तो व्यवसाय आहे. त्याच्या भरवशावर बऱ्याच लोकांची उपजिविका आहे. मात्र, नियमांचे देखील पालन झाले पाहिजे. वाट्टेल तिथे भट्ट्या टाकून नागरिकांच्या जिवीताशी खेळू नका. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या विटभट्ट्या हटविण्यात याव्या, प्रदूषणावर नियंत्रण बसवावे, धुळीसाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने आरखून द्याव्यात.
वनविभाग कारवाई करेल काय?
जंगलालगत व वनहद्दीत काही वीटभट्ट्या आहेत. नियमानुसार तसे करताच येत नाही. शासन वनसंपदेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश दिला जातो. मात्र, त्याला वनविभागच फाटा देत आहे. कोंडेश्वर जंगल भकास करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल पुढे येत आहे. वनविभागाने मूग गिळून बसू नये. जंगल वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

Web Title: Wreckage, Kondeshwar Jungle Bhakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.