संततधार; नदी-नाले ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:37 PM2018-07-11T22:37:34+5:302018-07-11T22:38:54+5:30

सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत आहे. मागील २४ तासांत सरासरी २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक ९० मिमी व धारणी तालुक्यात ७० मिमी पाऊस कोसळला. पावसाने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत.

Sage; River-Nale 'Overflow' | संततधार; नदी-नाले ‘ओव्हरफ्लो’

संततधार; नदी-नाले ‘ओव्हरफ्लो’

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळ महामार्ग दोन तास बंद नांदगावात अतिवृष्टी, दोन तालुक्यात शोध व बचाव पथकाचे रेस्क्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत आहे. मागील २४ तासांत सरासरी २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक ९० मिमी व धारणी तालुक्यात ७० मिमी पाऊस कोसळला. पावसाने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. बुधवारी सकाळी माहुली (चोर) येथील नाल्याला पूर आल्याने अमरावती- यवतमाळ तसेच बेंबळा नदीला पूर आल्याने नागपूर-औरंगाबाद महामार्ग दोन तासपावेतो बंद राहिला. चांदूर रेल्वे व नांदगाव तालुक्यात रेस्क्यू आॅपरेशन करून पुजाऱ्यासह चार शिक्षकांना जिल्हा शोध व बचाव पथकाने सुखरूप काढले.
जिल्ह्यात मान्सून सलग तीन दिवसांपासून बरसत आहे. पावसामुळे चांदूर रेल्वे, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घरांचीदेखील मोठी पडझड झाली. यंत्रणेद्वारा याची पाहणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत २४४.४ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ३००.९ पाऊस झाला. ही टक्केवारी १२३.३ आहे. मागील वर्षी याच तारखेला १२०.३ मिमी पावसाची नोंद होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३७ टक्के पाऊस ४० दिवसांत झालेला आहे.
पावसात मेळघाट माघारले
सलग तीन दिवस पाऊस असल्याने गावागावांतील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा व धारणी वगळता सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ४३४.४ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाला. अमरावती २८७.५, भातकुली २५२.१,चांदूर रेल्वे ३५७.४, धामणगाव रेल्वे ३०४.१, तिवसा २८६.१, मोर्शी २७९.६, वरूड ३११.५, अचलपूर २८९.४,चांदूर बाजार २६५.२, दर्यापूर ३०३.४, अंजनगाव सुर्जी २६५, धारणी २६४.८, तर चिखलदरा तालुक्यात ३१२.६७ मिमी पाऊस पडला आहे.
सिद्धेश्वर मंदिराला वेढा, पुजाऱ्याला काढले सुखरूप
चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरी व रायबोली नाल्याला पूर आल्यामुळे एकपाळा येथील सिद्धेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. मंदिरात पुजारी प्रमोद देवतळे हे अडकून पडल्याचे समजताच तलाठी व गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती विभागाला सूचना दिली. बुधवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या शोध व बचाव पथकाने पुजाºयाला सुखरूप बाहेर काढले. पथकात गणेश बोरोकर, विजय धुर्वे, वैभव पत्रे, गुलाब पाटणकर, प्रवीण आखरे, प्रशांत कदम, कैलाश ठाकरे, राहूल काटकर, उदय मोरे, गौरव पुसदकर, संदीप पाटील आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस चिखलदऱ्यात
जिल्ह्यातील १२ तालुक्यांनी सद्यस्थितीत पावसाची सरासरी ओलांडली. चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा तालुक्यात ३९१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ३१२ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८० आहे. ते धारणी तालुक्यात २९८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, २६५ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८९ आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १८० टक्के पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाला, तर सर्वात कमी ८० टक्के चिखलदरा तालुक्यात झाला आहे.
माहुली नाला ओव्हरफ्लो यवतमाळ मार्ग बंद
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगळवारी अतिवृष्टी झाली व बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला. माहुली (चोर) येथील नाला ओव्हरफ्लो झाल्याने अमरावती- यवतमाळ राज्य मार्गावरील वाहतूक दोन तासपावेतो खोळंबली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
सावंगी संगमचे चार शिक्षक रेस्क्यूद्वारे सुखरूप
चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी संगम येथील दोन नाल्यांना पूर आला. या दोन्ही नाल्यांच्या मध्ये रस्त्यावर चार शिक्षक अडकल्याची माहिती बुधवारी सकाळी प्राप्त होताच तहसीलदार पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी व शोध व बचाव पथकाने रेस्क्यू आॅपरेशन करून त्यांना सुखरूप काढण्यात आले. याविषयी आ. वीरेंद्र जगताप यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोदोरी हरव या गावात नाल्याला पूर आल्यामुळे काही झोपड्यांना पाण्याचा वेढा होता. येथील धनंजय कांबळे हा १५ वर्षीय युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला. त्या शोधण्यासाठी पथक ठाण मांडून आहे.

१८ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत बºयाच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच १५ ते १८ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. पावसाची सद्यस्थिती पुढील चार-पाच दिवस कायम राहील. १६ जुलै रोजी कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारतातदेखील पाऊस सुरूच राहणार असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सर्व मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना गावातच राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी

Web Title: Sage; River-Nale 'Overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.