‘त्या’मृत नवजातांच्या पालकांना प्रत्येकी दोेन लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:04 PM2017-08-18T17:04:35+5:302017-08-18T17:04:35+5:30
अमरावती, दि. 18 - : स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) चुकीच्या इंजेक्श्नमुळे मृत पावलेल्या ‘त्या’ चारही नवजातांच्या पालकांना जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. २९ मे रोजी मध्यरात्री डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनआयसीयूत ही घटना घडली होती. हे प्रकरण राज्यभरात गाजले होते, हे विशेष.
या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरली होती. परिचारिकेने बाळांना दिलेल्या चुकीच्या औषधोपचारामुळेच चार नवजात दगावल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी एक निवासी डॉक्टर व दोन परिचारिकांना अटक केली. मात्र, शिशुंच्या मृत्युसाठी पीडीएमसीतील काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या पालकांनी केला होता. दोषींवर कारवाई व्हावी, ही मागणी घेऊन मृतांचे पालक न्यायासाठी धडपडत होते. दरम्यान पोलीस चौकशी पूर्ण होऊन गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ जून रोजी दिलेल्या निर्णयात मृताच्या पालकांना दोन लाखांची आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाला दिले. त्यानुसार मृत शिशुंचे पालक पूजा आशिष घरडे, शिल्पा दिनेश विरूळकर, माधुरी बंटी कावरे, आफरीन बानो अब्दुल राजीक यांनी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर केले होते. ९ आॅगस्टपर्यंत मृतांच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी, असे उच्च न्यायालयाने बजावले होते. त्यानुसार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडून चारही पालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.