२१६३ हेक्टर क्षेत्रांवर ओलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:23 AM2018-02-02T01:23:58+5:302018-02-02T01:24:13+5:30
तालुक्यातील कोरडवाहू २ हजार १६३ हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरणाऱ्या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आल्याचे लेखी पत्र विदर्भ विकास मंडळ (नागपूर) यांच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : तालुक्यातील कोरडवाहू २ हजार १६३ हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरणाऱ्या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आल्याचे लेखी पत्र विदर्भ विकास मंडळ (नागपूर) यांच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. माजी आमदार अरुण अडसड यांनी २००८-०९ पासून शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. ३ जानेवारी रोजी सदर पत्र प्राप्त झाले आहे.
चांदूररेल्वे तालुक्यातील जळका जगताप, आमला विश्वेश्वर, टेंभुर्णी, सावंगी (मग्रापूर), पाथरगाव व सालोरा (खुर्द) ही गावे कोरडवाहू क्षेत्रात समाविष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून २ हजार १६३ हेक्टरचे क्षेत्रातील शेती करोडवाहू क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखले जाते आहे. आमला विश्वेश्वर येथील ज्ञानेश्वर मालखेडे, भगवान वाघ, टेंभुर्णीचे रावसाहेब शेळके, जळका (जगताप) निंभा माने, डॉ. पाचडे, डॉ. राजेश पखाले, ज्ञानेश्वर खेरडे यांनी माजी आमदार अरुण अडसड यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्या भेटीचा धडाका लावून आठ वर्षांनी या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळवून दिली. विदर्भ पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे, अमरावतीचे लांडेकर, अधीक्षक अभियंता ढवळे, वर्धा अपरचे पोटफोडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपसा सिंचन योजनेला मान्यतेसाठी प्रस्ताव वरिष्ठांंकडे दाखल केले होते. गेल्या ७० वर्षांपासून या भागातील शेतकरी कोरडवाहू शेती करीत आहे. पाथरगाव उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित झाली, तर या भागातील शेतकरी ‘सुजलाम् सुफलाम्’ झाल्याशिवाय राहणार नाही. परिणामी शेतकºयांना सुगीचे दिवस येईल.