संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:16 PM2017-11-09T23:16:45+5:302017-11-09T23:17:03+5:30

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे.

Notice to remove Sanjay Gandhi Nagar | संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

Next

अमरावती : राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे वनविभागाने नोटीशीद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमित धारकांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहे. राखीव वनक्षेत्र असल्याने शासन आदेशानुसार सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमित घरे हटविली जातील, असे नोटीशीत स्पष्ट नमूद आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करून स्वत:चे अतिक्रमण स्वत: काढण्यासाठी एक संधी दिली जात असून सात दिवसांत हटविण्यात आले नाही तर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे नोटिसाद्वारे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी स्थानिक रहिवाशांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे.
संजय गांधीनगर हे वनजमिनींवर वसलेले असून गरीब, सामान्यांची नागरी वस्ती असल्याने ती रीतसर नियमित करून न्याय प्रदान करावा, अशी मागणी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे, तर आ. सुनील देशमुख यांनीदेखील शासनाकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संजय गांधीनगर क्रमांक २ या नागरी वस्तीला संरक्षण प्रदान करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
हजारापेक्षा अधिक घरे
वनविभागाच्या नोंदी संजय गांधीनगरात अतिक्रमित २७९ एवढीच घरे असली तरी हजारपेक्षा अधिक घरे तेथे असतील, असा अंदाज आहे. या भागात बहुतांश गरीब, सामान्य, कामगार कुटुंब अधिक संख्येने वास्तव्यास आहेत.
जिल्हाधिकाºयांना साकडे
वनविभागाने सात दिवसांत घरे हटविण्याबाबत नोटिसा बजावताच गुरुवारी संजय गांधीनगर नं. २ येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना घरे वाचविण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. जिल्हाधिकाºयांनी कैफियत ऐकली. याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल, असे त्यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले.
रमाई आवास योजनेचा लाभ
संजय गांधीनगरात लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईने अतिक्रमणासह घरकुलदेखील हटविले जातील.

Web Title: Notice to remove Sanjay Gandhi Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.